डेस्कावर आयएएस कोरणारी अदीला

‘मुस्लिम समाजात मुलींना शिक्षण घेऊन स्वतंत्र होणं तसं असामान्यच. परंतु, माझे वडील वेगळे होते आणि त्यांच्या दृष्टीने शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व होतं. मलाही राष्ट्र उभारणीच्या कार्यात खारीचा वाटा उचलायचा होता आणि एक प्रशासकीय अधिकारी (आयएएस) होऊन मी सकारात्मक योगदान देऊ शकते’, हे शब्द आहेत २९ वर्षीय आयएएस अधिकारी अदीला अब्दुल्लाचे.

शाळेत असताना मी डेस्कवर ‘आयएएस’ हे तीन शब्द कोरायची आणि माझी सुप्त इ्च्छा व्यक्त करण्याचा तो एकमेव मार्ग होता. मला राष्ट्र उभारणीत योगदान करण्याची मनोमन इच्छा होती आणि आयएएस अधिकारी झाल्यास यामध्ये सकारात्मक योगदान देऊ शकीन, असं मला सारखं वाटायचं.

मुस्लिम मुलींना शिक्षण किंवा कामासाठी प्रोत्साहन न मिळणाऱ्या केरळच्या मलाबार परिसरातील एका छोट्या खेड्यातील मुस्लिम मुलगी अदीला. आपल्या यशस्वी प्रवासाबाबत माहिती देताना ती म्हणाली, केरळच्या कोझिकोडजवळील कुट्ट्यावाडी गावात मी लहानाची मोठी झाले. माझी आई शाळेत शिक्षिका होती. माझं प्राथमिक शिक्षण तेथेच झालं. त्यानंतर मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या चांगल्या शाळेत शिकावं, अशी वडिलांची इच्छा असल्याने त्यांनी मला कोझिकोड येथील निवासी शाळेत टाकलं. माझा मोठा भाऊ-बहिणही आधीपासूनच निवासी शाळेमध्ये होते. दोन्ही मुलींनी स्वतंत्र महिला म्हणूनच वावरावं, अशीच वडिलांची इच्छा होती. परंतु मुस्लिम समुदायात मुलींनी शिक्षित आणि स्वतंत्र असणे दुर्मिळच. वडिलांनी मात्र शिक्षणालाच सर्वोच्च प्राधान्य दिलं. सत्तरच्या दशकात ‘मुलांना शिक्षणाची भेट दे’, असं एका जर्मन महिलेनं आपल्याला सांगितलं होतं, असं वडील सांगतात. मुलगा आणि मुली असा भेदभाव वडिलांनी कधीच केला नाही. शाळेतील वातावरणामुळे मला वाचन, वक्तृत्व, निबंध लेखन, कोडे आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली.

राष्ट्राच्या उभारणीचं स्वप्न

शाळेत असताना मी डेस्कवर ‘आयएएस’ हे तीन शब्द कोरायची आणि माझी सुप्त इ्च्छा व्यक्त करण्याचा तो एकमेव मार्ग होता. मला राष्ट्र उभारणीत योगदान करण्याची मनोमन इच्छा होती आणि आयएएस अधिकारी झाल्यास यामध्ये सकारात्मक योगदान देऊ शकीन, असं मला सारखं वाटायचं. डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्याप्रमाणे शास्त्रज्ञ व्हावं, असंही कधीकधी वाटायचं. परंतु, त्यासाठी आवश्यक असलेला वैज्ञानिक स्वभाव नसल्याची मला कल्पना होती. त्यामुळेच मी प्रशासक होण्याचा निर्णय घेतला. कधीही आयएएस अधिकारी न बघितलेल्या छोट्या गावातील एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातील मुलींच्या दृष्टीने ही खूप मोठं स्वप्न होतं. विद्यार्थी म्हणून पर्याय माझ्याकडे इंजीनियर किंवा डॉक्टर हेच पर्याय होते. एक डॉक्टर म्हणून आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. या विचाराने मी वैद्यकीय क्षेत्र निवडले, असे अदीला म्हणाली.

पेरुत्थलमना येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतरही मी येथील डेस्कवरही आयएएस हेच शब्द कोरायची. हेच आपले अंतिम स्वप्न आहे, अशी आठवण देण्याचा बहुदा तो प्रयत्न असावा. मी वैद्यकीय शिक्षण घेत असले तरी अनेक विषयांचे वाचन सुरू असायचे. वाचनालयात नियतकालिकं आणि वृत्तपत्र वाचण्यात माझा खूप वेळ जायचा. आणखी एका महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रबी सोबत माझी मैत्री झाली. दोघांच्याही आवडीनिवडी जुळत असल्याने आधी मैत्री, चार वर्षे एकमेकांना पुरते जाणून घेतल्यानंतर घरच्यांच्या संमतीने आमचा विवाह झाला, असेही ती म्हणाली.

परंतु, आपला रस इंजेक्शन आणि प्रिस्क्रिप्शन लिहून देण्यात नाही, हे माझ्या पुन्हा लक्षात आले. समाजासाठी काम करण्याची तीव्र इच्छा तर होती. परंतु, ती या माध्यमातून नव्हे. आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पतीने भरपूर पाठिंबा दिला. आपल्या समुदायातून अशाप्रकारचे स्वप्न कुणीही बघत नसलं तरी, मी जर हे स्वप्न पूर्ण केलं, तर आणखी महिलांना या क्षेत्रात येण्यासाठी मी प्रोत्साहित करीन, असे त्याने सांगितले. त्याच काळात रबीच्या एका मित्राची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली. मी परीक्षेसाठी त्याचा सल्ला घेतला. त्याने मला एक-दोन प्रश्न विचारले. त्याची उत्तरे दिल्यामुळे त्याने मला पुढे जाण्याचा सल्ला दिला. मी तीन महिन्यांच्या कोचिंग क्लाससाठी दिल्लीला गेले. पूर्व परीक्षेसाठी मी इंग्रजी, समाजशास्त्र यांचा अभ्यास केला माझी वैद्यकीय क्षेत्रातील कारकीर्द धोक्यात येणार याची कल्पना होती. सुदैवाने पहिल्याच प्रयत्नात मी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर पुढचे दोन महिने दिल्लीत राहून मी मुख्य परीक्षेची तयारी केली. सामान्य प्रशासन या पेपरशिवाय वैद्यकीय क्षेत्रात अभ्यासात असलेला वैद्यकशास्त्र हा पर्यायी पेपर होता. नशिबाने मी मुख्य परीक्षादेखील पास झाले. एप्रिल २०१२ मध्ये माझी मुलाखत होती आणि त्यावेळी मी चार महिन्यांची गर्भवती होते. अट्टापडी येथे वैद्यकीय व्यवसाय करत असताना केलेल्या कामाबद्दल मला मुलाखतीत अनेक प्रश्न विचारण्यात आले. तेथील आदिवासी, त्यांची जीवनशैली, पारंपारिक व्यवसाय, सामान्य आरोग्यविषयक समस्या इत्यादींबाबात प्रश्नांचा भडिमार केला. वैद्यकशास्त्रात तंत्रज्ञानाच्या भूमिकेबाबतही मला विचारणा करण्यात आली. मला सनदी अधिकारीच व्हायचे आहे, हे मी त्यांना पटवून सांगितले. अर्ध्या तासाम मुलाखत संपली. त्याचा निकाल लागला तेव्हा मला २३० गुण मिळाले आणि मलबार भागातून आयएएस अधिकारी होण्याची मी पहिली मुस्लिम महिला असावी, असे ती सांगत असताना तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता.

२०१२ साली परीक्षा, मुलाखत आणि इतर प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अथीलाची कन्नूर येथे वर्षभरासाठी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी घेतलेली सुटी संपल्यानंतर २०१४ साली तिची तिरुर उपविभागात उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. शहीद भगतसिंग, महात्मा गांधी आणि डॉ.एपीजे अब्दुल कलाम हे तिचे आदर्श आहेत. बालपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न कसे पूर्ण करावे आणि जीवनात यशाला कशी गवसणी घालावी याकरिता अगाधा निश्तिच इतरांसाठी आदर्श ठरू शकते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *