मायेचा स्पर्श

केदार शिंदे… उत्तम दिग्दर्शक-लेखक-अभिनेता वगैरे यांची ओळख आहे ती त्यांच्यात असणाऱ्या संवेदनशील माणसांमुळे… म्हणूनच त्यांनी निर्माण केलेल्या कोणत्याही कलाकृतीत त्याच संवेदनशीलतेचा स्पर्श उतरतो… त्याच स्पर्शाची त्यांना झालेली ही जाणीव!

ठसका लागला तर आई आभाळाकडे पाहायला सांगून, पाठीवरून मायेनं हात फिरवायची, आजकालच्या मॉडर्न जमान्यात ठसका लागल्यावर ‘एक्स्क्यूज!’ म्हणून फक्त पाणी पिण्याची सवय आपण आपली लावून घेतलीय.

भूतकाळ हा आठवणींपुरता मर्यादित राहतो. वर्तमानकाळ हा धावपळीत जातो आणि भविष्याची फक्त स्वप्न पडत असतात. हाच असतो आपला दिनक्रम!! आम्ही ग्लॅमरच्या दुनियेतली माणसं. रोज नवनवीन लोकं संपर्कात येतात. फोटो-स्वाक्षऱ्या यात रममाण असतो आम्ही. पण अशावेळी काही आपली पण खरंतर संबंध नसलेली माणसं समोर येऊन काही बोलून जातात आणि ते बोलणंही मनाला स्पर्शून जातं.

स्पर्श… आजकाल या गोष्टीला फार महत्त्व उरलेलं नाही. असं माझं मत आहे. या Touchscreen मोबाईल-टॅबच्या जमान्यात आपल्याला कोणतीही गोष्ट हाताळताना धसमुसळेपणा करण्याची सवय झालीय. या एकाच विचाराने मी ‘अगबाई अरेच्च्या २’  या सिनेमाची निर्मिती केली. स्पर्श किती महत्त्वाचा आहे ना? थकून भागून आल्यावर आईने गालावर मायेने फिरवलेला हात, सगळा शिणवटा घालवतो. ही असते स्पर्शाची जादू!…

परवा एका समारंभाला गेलो. निवेदनाची भूमिका पार पाडत होती एक १७-१८ वर्षांची मुलगी. अंध होती. कागदावर लिहून आणलेल्या (ब्रेल लिपी) गोष्टी, स्पर्शाने समजून माईकसमोर आत्मविश्वासाने बोलत होती. ही असते स्पर्शाची जादू!…

आजकालचं प्रेम हे स्पर्शाच्या विचारानेच सुरू होतं. पूर्वी स्पर्श व्हायचा तो लग्नानंतरच. पण आजकालच्या जमान्यात तेवढी फुरसतच कुणाला नाही. पहिल्या भेटीत एकमेकांना शेकहॅण्डच्या स्पर्श झाला नाही, तर आर्थोडॉक्स ही ठाम कल्पना झाली आहे.

खरंच स्पर्श एवढा महत्त्वाचा असेल तर त्याचा मानही तेवढाच राखला गेला पाहिजे ना!!! पूर्वी आईवडिलांना नमस्कार करताना, त्यांच्या पायाला स्पर्श करण्याची पद्धत होती. आजकाल त्यांच्या गुडघ्यापर्यंत हात नेऊन आपल्या छातीपर्यंत आणण्याची आणण्याची एक फिल्मी पद्धत रुजतेय. आजूबाजूला पाहिलंत आणि विचार केलात तर असे असंख्य लोक आपल्याला दिसून येतील.

ठसका लागला तर आई आभाळाकडे पाहायला सांगून, पाठीवरून मायेनं हात फिरवायची, आजकालच्या मॉडर्न जमान्यात ठसका लागल्यावर ‘एक्स्क्यूज!’ म्हणून फक्त पाणी पिण्याची सवय आपण आपली लावून घेतलीय.

टीव्ही वर पूर्वी ‘दूरदर्शन’ हे एकच चॅनल होतं. आता ५००-६०० चॅनेल्स आणि रिमोट नावाची गोष्ट आपल्या हाती. चॅनेल बदलताना रिमोटला केलेला स्पर्श आठवा. फराफरा बटन बदलताना जवळजवळ आपण रिमोटवर बळजबरी केल्याचा भास होईल…

ह्या सगळ्या साध्या साध्या गोष्टी आहेत. दिवसभरामध्ये या स्पर्शाशी निगडित अनेक हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टी आपण नकोशा करू लागलोय. आपल्या रुढी-परंपरा या स्पर्शाशी निगडित आहेत. नवरा-बायको सत्यनारायणाच्या पुजेला बसतात. तेव्हा बायको नवऱ्याच्या हातात हात लावते आणि नवरा सगळी विधी त्याच स्पर्शाच्या जिवावर पूर्ण करतो. काय असेल या मागची संकल्पना? परमेश्वरालाही तेच सांगायचं असेल बहुधा की, स्पर्शाची किंमत राखायला शिका. गालगुच्चा घेताना केलेला स्पर्श, चुकल्यावर पिरगळलेला कान, पाठीत मारलेला धपाटा… या सगळ्याच गोष्टी थोड्याफार प्रमाणात Out Dated झाल्यासारखं वाटतंय.

41879346 – adult and baby hands, closeup

आजकाल आपल्याला आपल्यासाठी वेळच नाहीए. आरती संपल्यावर समोर आणि आलेलं पुजेचं ताट आणि त्यावर हात फिरवून आपल्या डोक्याला आणि डोळ्यांना केलेला आपल्या हाताचा स्पर्श, आत्मिक समाधान काय असतं? ते त्या क्षणी समजतं. अशा असंख्य गोष्टी आहेत. रोजच्या जगण्यातल्या या स्पर्शाचं महत्त्व आपण आपलं जपायला हवंय. त्याची महत्त्वपूर्णता समजून घ्यायला हवी.

हे सगळं लिहिताना मला राजकुमार हिरानी यांच्या मुन्नाभाईंची जादूकी झप्पी आठवली. एक साधी क्रिया होती. धन्यवाद म्हणून समोरच्या मिठी मारायची. किती मोठा विचार होता ना साध्या मिठीत? आम्ही कलाकार मंडळी रंगमंचावर जाताना, नकळत रंगमंचाला स्पर्श करतो. ती एक मानवंदना असते. खेळाडूसुद्धा ते करताना दिसून येतात. स्पर्शाची ही जादू न्यारीच!!

अशा अनेक शारीरिक स्पर्शाची जादू आपण अनुभवतो. पण काहीवेळा मनाला स्पर्शून जाणाऱ्या आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या गोष्टीही घडत असतात. माझ्या बाबतीत खूप वेळा तसं घडलंय. पण त्यातल्या काही तुमच्यासोबत शेअर करताना आनंद होतोय. माझे आजोबा, आम्ही त्यांना बाबा म्हणायचो आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ‘शाहीर साबळे’ या नावाने ओळखतो. त्यांच्याकडेच मी लहानाचा मोठा झालो. वयाच्या पहिल्या महिन्यापुढची २३वर्ष मी त्यांच्याजवळ होतो. आपलं एक वय असतं, जेव्हा घरचे सांगतात, तेव्हा चुकीचं वाटतं आणि आपण जे काही करतोय तेच बरोबर आहे. असं वाटत राहतं. त्या वयात असताना बाबा मला खूप समजावण्याचा प्रयत्न करायचे. तसा मी त्यांचा आदर करायचो. पण पाठ वळली की, माझ्या मनाला वाटेल तेच करायचो, एक दिवस अशीच चुकीची गोष्ट घडल्यावर, चिडचिड करीत ते म्हणाले होते, ‘मी आत्ता मागतोय ते सगळंच नामंजूर करतोयस. पण एक वेळ अशी येईल की, स्वत:चं मूल झाल्यावर मी का एवढी त्रागा करतोय ते कळेल.’ आज मला १७ वर्षाची मुलगी आहे. प्रत्येकवेळी तिचं वागणं चुकीचं वाटलं की मी बोलतो आणि ती सुद्धा तशीच वागते जसा मी तिच्या वयाचा असताना बाबांसोबत वागलो होतो. मनाला स्पर्शून जातात ती वाक्य. पुन्हा आयुष्य Rewind व्हावं असं वाटतं. पण ती वेळ गेलेली असते.

भूतकाळ हा आठवणींपुरता मर्यादित राहतो. वर्तमानकाळ हा धावपळीत जातो आणि भविष्याची फक्त स्वप्न पडत असतात. हाच असतो आपला दिनक्रम!! आम्ही ग्लॅमरच्या दुनियेतली माणसं. रोज नवनवीन लोकं संपर्कात येतात. फोटो-स्वाक्षऱ्या यात रममाण असतो आम्ही. पण अशावेळी काही आपली पण खरंतर संबंध नसलेली माणसं समोर येऊन काही बोलून जातात आणि ते बोलणंही मनाला स्पर्शून जातं, दादरच्या एका हॉटेलात मी चहा घेत असतानाच, माझ्या आईच्या वयाची एक स्त्री समोर आली. नमस्कार चमत्कार झाला. ही गोष्ट ५-६ वर्षांपूर्वीची आहे. माझा ‘ह्यांचा काही नेम नाही’ नावाचा सिनेमा तेव्हा चित्रपटगृहात लागला होता. ती स्त्री म्हणाली, ‘आम्ही तुम्हाला खूप मानतो. टिपरेसारख्या गोष्टी आम्हाला तुम्ही दाखवल्यात. आमच्या घरातले एक मेंबर झाला. आता असले सिनेमे पैशासाठी नका करू.’ माझे डोळे चमकले खरंतर तो सिनेमा त्या प्रेक्षकवर्गासाठी नसेलही. पण प्रेक्षकांचे गट पाडण्याचे अधिकार मला कोणी दिले? अशा वेळी खरंतर चार वाक्यं त्यांना सुनावली असती तर, काही बिघडलंही नसतं. पण त्या स्त्रीने मला अंतर्मुख केलं. त्यांची वाक्य मनाला स्पर्शून गेली. भविष्यात सर्वच प्रेक्षकांसाठी काम करायला हवं अशी खूणगाठ त्या दिवशीच बांधली. आपली माणसं आपल्याला बोलतात. तेवढा अधिकार त्यांना आपण दिलेला असतो. अशा खूप गोष्टी तुमच्याबाबतीतही घडत असतील. स्पर्शाची ही आगळी वेगळी दुनिया आपण दर क्षणाला अनुभवतो. या अनुभवाचं गाठोडं आपल्या आयुष्याच्या प्रवासात सतत उपयोगात येतं. स्पर्शाला साधं समजू नका. त्यात आशीर्वादही असतो, प्रेमही असतं, आपुलकी सुद्धा असते आणि कुणाचे तळतळाटही असतात!!

परवा एका पेपरमध्ये हस्तांदोलन करताना, ते कसं असावं? याची माहिती वाचली. त्या हस्तांदोलनात म्हणे आपला स्वभाव दिसून येतो. आजच्या कार्पोरेट जगात त्याची अंमलबजावणी आपण लगेच करू. चांगलं काय? त्यापेक्षा फायद्याचं काय? याकडे आपण जास्त लक्ष देऊ लागलो आहोत. यापेक्षा जगण्याकडे लक्ष दिलं तर आनंदात राहू. याक्षणी तुम्हाला हे वाचल्याबद्दल नमस्कार करतोय. तेही दोन हात जोडून. यातून स्पर्शाची जादू अनुभवतोय आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *