शरीर ही आपली सर्वात मोठी ठेव

आपल्या आरोग्याचे नियोजन आपण सजगपणे करणे जरुरीचे आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे नियोजन सुलभ होऊ शकते. आर्थिक बाबतीत आपण कमालीचे नियोजन करतो, अगदी बाळ जन्मल्यापासून त्याच्या / तिच्यासाठी बचत सुरू होते. आपले शरीर ही आपली सर्वात मोठी ठेव आहे. ही ठेव जपू या सुंदर नियोजनाने!

दिवाळीच्या सुट्टीत नुकतेच आम्ही राजस्थानला जाऊन आलो. इतिहासाने संपन्न आणि सुंदर अशा या प्रातांचे दर्शन घडवून आणण्यासाठी जवळजवळ एक महिनाभर आम्ही तयारी करीत होतो. ट्रॅव्हल एजंटबरोबर नियोजन करून सामान भरून प्रवास सुरु करेपर्यंत पूर्वतयारी चोख होती. कारण प्रवास छान व्हावा, असे वाटत होते. अपेक्षेप्रमाणे राजस्थान सफर सुंदर झाली, पण प्रवासात अडथळा आणणाऱ्या काही घटना अनपेक्षित घडल्याच !

            आपल्या आरोग्य प्रवासाकडे आपण एखाद्या छोटया प्रवासाएवढेही लक्ष देत नाही. लहानपासून वृद्धापकाळाकडे जाता आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात. आपण ते स्वाभाविक आहेत, म्हणून गृहीत धरतो, पण त्याबाबत पूर्वतयारी वा नियोजन फार कमी वेळा करतो.नुकतेच माझ्याकडे एक आजोबा पेशंट म्हणून आले होते. ‘डॉक्टर काय करू हो… माझी झोप पहाटे ३.०० वाजताच पुरी होते. मग मी जागाच असतो. झोपेची गोळी घेतो, तरी झोप होत नाही’ शेवटी म्हणतो की वयोपरत्वे असं होणारच,.. नंतर सूनबाई मला गुपचूपपणे म्हणाल्या, ..बाबा रात्री झोपले नाहीत तरी दिवसभर डुलक्या घेतच असतात… तशी त्यांना व्यवस्थित विश्रांती मिळते.’

            वयोपरत्वे आपल्या शरीरात काय बदल अपेक्षित आहेत आणि त्यासाठी आपण काय पूर्वतयारी करावी, हा एक महत्वाचा विषय आहे. पुरेशी माहिती नसल्यामुळे चक्क विकारांवर वयाप्रमाणे होणारे बदल म्हणून गृहीत धरले जाते.वरील उदाहरणातील आजोबांना ‘वयोपरत्वे’ निद्रानाश जडला नव्हता; त्यांना एक कालनियमनाचा झोपेचा वेगळा विकार झाला होता, याबद्दल त्यांना अधिक माहिती असती तर तो टाळता येण्यासारखा होता. लहानग्यांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष दिलं जात. बरेचदा घरातील प्रोढांकडे दुर्लक्ष होत असेल तरीही . या लेखात आपण प्रोढत्वातून वृद्धापकाळाकडे होणारा . ‘आरोग्य प्रवास’ बघणार आहोत. हा प्रवास आरोग्यपूर्ण व्हावा यासाठी कोणती पावले उचलावी हे समजून घेणार आहोत.

            लहान मुलांच्या लसीकरणाबद्दल सर्वसाधारण पालकवर्ग बऱ्यापैकी जागरूक असतो. योग्य वयात योग्य लसी घेतल्या पाहिजेत. कारण त्यामुळे आपली रोग प्रतिकार शक्ती सबळ होते व अनेक रोगांपासून निवीरण करण्यासाठी हे धोरण अतिशय मध्यवर्ती आहे. मोठेपणा मात्र याकडे काहीसे दुर्लक्ष होते. असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडिया (API/ ‘आपी’) या वैद्यकीय संस्थेने या विषयावर काही अभ्यासपूर्ण उपलबध करून दिल्या आहेत. पाश्चिमात्त्य देशात प्रौढांसाठी दिल्या जाणाऱ्या लसीकरणाच्या सूचनांपेक्षा त्या थोडया वेगळया आहेत. कारण त्या भारतीय वस्तुस्थितीसंदर्भात घेऊन मांडण्यात आल्या आहेत.

            टिटॅनस (धनुर्वात ) ची लस सर्वसाधारणपणे जखम झाल्यावर देण्यात येतेच. यासोबत घटसर्पसाठी (डिप्थेरिया) लक घेता येते. ‘आपी’ ने सुचविल्याप्रमाणे वयाला १८वर्षे झाल्यावर धनुर्वात व घटसर्प यांची एकत्रित लस आपण घ्यावी. या लसीचा ‘बुस्टर’ डोस दर १० वर्षांनी घ्यावा लागतो. हे जर आपण नियमितपणे करीत असू तर अधे – मधे होणाऱ्या लहान – सहान जखमांसाठी प्रत्येक वेळी लस घ्यावी लागत नाही. ‘कावीळ’ ही एक असाच दूर ठेवण्याजोगा विकार आहे. यकृताला सूज आल्यामुळे कावीळ होते. यास ‘हिपॅटायसिस’ विषाणू कारणीभूत असतात. यापैकी ‘अ’ आणि ‘ब’ या विषाणूंविरूद्ध लस उपलब्ध आहे. ‘आपी’ च्या सूचनेप्रमाणे सर्व प्रौढांनी ‘हिपॅटायसिस बी’ ची (‘ब’विषाणू) लस घ्यावी. याचा संसर्ग बाधित व्यक्तीच्या रक्ताशी/द्रव्यसंबंध आल्यावर होतो. प्रादूर्भाव झाल्यास होणारी कावीळ व इतर लक्षणे मग आयुष्यभर त्रास देऊ शकतात. ‘हिपॅटायसिस’ (‘अ’ विषाणू) सर्वसाधारणपणे बाधित व्यक्तीच्या विष्ठा अथवा मलमुत्रातून पसरतो. बाधित व्यक्तीने हाताळलेले अन्नपदार्थ/ पेय प्राशन केल्यास कावीळ होते. ही बाधा कायमस्वरूपी नसते. पण काही काळाकरिता खूप त्रास होतो. प्रवास  करणाऱ्या व्यक्ती अथवा पुष्कळ वेळा बाहेरचे खावा लागणाऱ्या व्यक्तींनी ही लस अवश्य घ्यावी.

            ‘नागीण’ हा त्वचेवर होणारा व अतिशय तीव्र वेदना देणारा विकार आहे. ज्याला कांजिण्या होऊन गेल्या आहेत, त्याला मोठेपणी नागीण .. होऊ शकते. यावर उपलब्ध असलेली लस (हर्पीज झोस्टर व्हॅक्सिन ) वयाची साठी उलटल्यावर घेण्याचा जरुर विचार करावा. कारण या वयानंतर ‘नागीण’ झाल्यास अतिशय त्रास होतो. ‘फ्लू’ अर्थात ‘इन्फ्लुएंझा’ ची लस प्रगत देशांमध्ये प्रत्येकाला दिली जाते. आपल्याकडे प्रौढ अथवा दम्यासारखे फुफ्फुसांचे विकार असलेल्या माणसांनी ती अवश्य घ्यावी. तसेच ‘न्युमोनिया’ ची लस ही या व्यक्तींनी नियमितपणे घ्यावी. ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’. गर्भाशयाच्या मुखावर होणाऱ्या कर्करोगाशी निगडीत आहे. त्यासाठी आता लस उपलब्ध इंजेक्शन ‘दुचुक’ करावे लागणार आहे!

            आपल्या जीवन प्रवासात अनपेक्षित घटना घडतच असतात. त्यात ह्रदयविकार, उच्च रक्तदाब व मधुमेह निश्चित नसावेत ! यापैकी कोणताही विकार केवळ वाढत्या वयामानाने होत नाही. बरेच वेळा माणूस आजारी पडतो किंवा ताप आला म्हणून रक्त तपासणी होते व तेव्हा रक्तामध्ये पुष्कळ प्रमाणात साखर असल्याचा ‘धक्का’ बसतो. मधुमेह या रोगासाठी खरोखरच प्रतिबंध हे सर्वात उत्तम औषध आहे. वयाची तिशी उलटल्यानंतर, विशेषतः आई – वडील यांना मधुमेह असल्यास, आपण आपली रक्तचाचणी दरवर्षी करावी, त्यात मधुमेहासाठी रिकाम्या पोटी, सकाळी साखरेचे प्रमाण (फास्टिंग ब्लड ग्लूकोज ) मापावे. आपल्या फॅमिली डॉक्टरच्या मार्गदर्शनाने हे प्रमाण नियंत्रित ठेवावे. वार्षिक रक्त तपासणीप्रमाणे शारीरिक तपासणीही करून घ्यावी. पस्तीशीनंतर रक्तातील ‘कोलेस्टेरॉल’ दरवर्षी तपासावे. महिलांनी दरवर्षी ‘पॅप स्मिय’ करून घ्यावा. उच्च रक्तदाब व मधुमेह असल्यास हृदयरोगाशी शक्यता वाढते. म्हणूनच आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने , सर्व परिणामे लक्षात घेऊन आवश्यक असल्यास ‘स्ट्रेस टेस्ट’ करावी.

            कॅन्सर प्रतिबंधात्मक काही चाचण्या विशिष्ट वयोगटात करण्यात येतात. महिलांसाठी ‘पॅप स्मियर’ गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी व चाळिशीनंतर ‘मॅमोग्रॅम’ स्तनाच्या कॅन्सरसाठी करता येऊ शकतो. पुरुषांच्या पन्नाशीनंतर ‘प्रॉस्टेट कॅन्सर’ साठी काही प्रतिबंधात्मक चाचण्या उपलब्ध आहेतय वैद्यकीत सल्ला घेऊन त्या ठराविकपणे केल्यास कॅन्सरसारखे रोग वेळीच ओळखले जाऊ शकतात.

आपल्या आरोग्याचे नियोजन आपण सजगपणे करणे जरुरीचे आहे. महीजालकावर यावर पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे नियोजन सुलभ होऊ शकते. आर्थिक बाबतीत आपण कमालीचे नियोजन करतो, अगदी बाळ जन्मल्यापासून त्याच्या / तिच्यासाठी बचत सुरू होते. आपले शरीर ही आपली सर्वात मोठी ठेव आहे. ही ठेव जपू या सुंदर नियोजनाने!

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *