महाराष्ट्रातील देवीची साडेतीन शक्तिपीठे
या देवी सर्वभूतेषू शक्तिरुपेण संस्थिता ! नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमा: !
मानवी जीवनात शक्ती उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व असून, भारतातील संस्कृतीमध्ये आदिशक्तीची विविध रुपे आढळतात सर्व देवांच्या शक्तिरुप मूर्तीला देवी, असे नाव देऊन तिला सर्वश्रेष्ठ देवता आदिमाया किंवा जगदंबा म्हणून संबोधले आहे. ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या मागची प्रेरक शक्ती म्हणजे देवीच. देवी भागवत, देवीपुराण, देवीमहात्म्य या विविध ग्रंथांमध्ये देवीचे विस्तृत विवेचन केले आहे. अनादी काळापासून सुरू, असा हा नवरात्री उत्सव महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतामध्ये साजरा करण्यात येतो. अशा या अंबेच्या विविध शक्तिपीठांची माहिती….
देवीची शक्तिपीठे
आदिशक्तीच्या रुपात देवीची ५१ पीठे मान्यता पावली असून, प्रत्येक पीठ हे शक्तिपीठ म्हणून संबोधले गेले आहे. या प्रमुख शक्तिपीठांपैकी १ पाकिस्तानात, १ बांगलादेशात, १ श्रीलंकेत, १ तिबेटमध्ये, २ नेपाळमध्ये आणि ४२ शक्तिपीठे भारतात आहेत. उर्वरित तीन शक्तिपीठांची माहिती उपलब्ध नाही.
महाराष्ट्रातील साडेतीन पीठे
महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे सुप्रसिद्ध आहेत. देवी भागवत यामध्ये साडेतीन पीठांचा उल्लेख पुढीलोप्रमाणे आहे.
कोल्हापुरं महास्थानं, यत्र लक्ष्मी सदा स्थिता! मात:पुरं द्वितीयं चं, रेणुकाधिष्ठितं परम्!! तुळजापूरं तृतीयं स्यात् सत्पशृंग तथैव च!!!
पहिले पीठ – महालक्ष्मी – कोल्हापूर

साडेतीन पीठांपैकी एक करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी लाखो भाविकांचे अढळ श्रद्धा स्थान असून, हे अत्यंत प्राचीन शक्तिपीठ आहे. कोल्हापूरला दक्षिणकाशी, असेही संबोधले जाते. येथे सतीचे नेत्र पडले म्हणून या ठिकाणाला शक्तिपीठाचे महात्म्य प्राप्त झाले. कोल्हापूर येथे श्री महालक्ष्मी कशी स्थिरावली या संदर्भात पुराणात विविध प्रकारच्या कथा असून, काही आख्यायिका प्रचलित आहे की, श्री महालक्ष्मीच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या क्षेत्राला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र कोल्हासुराशी युद्ध करून लक्ष्मीने वध केला म्हणून कोल्हापूर हे नाव रुढ झाल्याचे म्हटले जाते. श्री महालक्ष्मी मंदिर व मंदिरातील श्री महालक्ष्मीच्या मूर्तीविषयीचा उल्लेख १९ पुराणांपैकी काशीखंड, पद्मपुराण, देवी भागवत, हरिवंशपुराण व स्कंदपुराणातील सह्याद्री खंडाच्या उत्तरार्धात सापडतो. इ.स. पूर्व ४ ते ५ शतकातील, म्हणजेच इ.स. दीड ते दोन हजार वर्षापूर्वीच्या काळात श्री महालक्ष्मी मूर्तीची स्थापना झाली असावी.

श्री महालक्ष्मी मंदिर हे हेमाडपंथी बांधणीचे असून, भव्य आवार आणि सुंदर दगडी नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराचे वैशिष्ट्य असे की, सूर्य विषवृत्तावर येतो तेव्हा मावळत्या सूर्याची किरणे लक्ष्मीच्या सर्वांगावर पडून गाभारा प्रकाशाने उजळून निघतो. महालक्ष्मीची मूर्ती दगडी चबुतऱ्यावर उभी असून, काळ्या रत्नशिलेपासून बनविण्यात आली आहे. महालक्ष्मीची मूर्ती चतुर्भुज असून, वरच्या उजव्या हातात गदा, डाव्या हातात ढाल, तर खालच्या उजव्या हातात मातुलिंग आणि डाव्या हातात पानपत्र आहे. मस्तकावर मुकुट असून, त्यावर शेषाने छाया धरली आहे. मूर्तीच्या भूमध्यावर पद्मरागिणी असून, ती नैसर्गिक आहे व मागे सिंह उभा आहे.
श्री महालक्ष्मी मंदिरात एकूण पाच शिखरे असून, मूळ मंदिराला जोडून गरुड मंडप उभा आहे.

उपलब्ध पुराव्यांनुसार इ.स. १०९ मध्ये राजा कर्णदेव कोकणातून कोल्हापुरात आला. त्यावेळी ही मूर्ती एका छोट्या मंदिरात असल्याचे म्हटले जाते. सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ.स. ६०० ते ७०० या शतकात असल्याचे दाखले मिळतात. आठव्या शतकात भूकंपामुळे हे मंदिर खचले. नवव्या शतकाच्या कालावधीत राजा मंडवादिक्ष याने मंदिराचा विस्तार केला. त्याने महाकालीचे मंदिर बांधले असून, ११७८ ते १२०९ या काळातील शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकिर्दीत दक्षिण दरवाजा व अतिबलेश्वर मंदिर बांधले गेले. बाराव्या शतकात शिलाहार राजाने महासरस्वती मंदिर, महालक्ष्मीचा प्रदक्षिणामार्ग बांधल्याचेही दाखले सांगतात. १२१८ मध्ये यादव तौलम याने महाद्वार बांधले. या राजाने देवीला जडजवाहीर अर्पण करून द्रव्य दिल्याचा उल्लेख मंदिरातील गारेचा गणपती श्री सिद्धीविनायक मंदिरातील खांबावर आढळतो. चालुक्याच्या काळात मंदिरासमोरील गणपतीची स्थापना झाली. १३ व्या शतकात शंकाराचार्य पीठातर्फे नगारखाना व कचेरीचे बांधकाम, तसेच मंदिराच्या आवारात दीपमाळा बांधण्यात आल्या. मंदिराच्या आवारात सध्या सात दीपमाळा अस्तित्वात आहेत. १७ व्या शतकानंतर विविध राजघराण्यातील थोर मंडळींनी या मंदिराला भेटी दिल्या त्यानंतर दिवसेंदिवस महालक्ष्मीचे भक्त वाढतच गेले आणि ही देवी अवघ्या महाराष्ट्राची आद्यदेवता बनली.
दुसरे पीठ माहूरची रेणुकामाता

रेणुका ही भगवान परशुरामाची माता. कर्नाटकातील हिला यल्लमा म्हणतात. महाराष्ट्रात ही यमाई व एकवीरा या नावानेही प्रसिद्ध आहे. येथे देवीची मूर्ती नाही, परंतु शेंदूरचर्चित सुमारे पाच फूट उंचीचा तांदळा आहे. माहूर येथे श्री रेणुका देवी कशी स्थिरावली, या संदर्भात पुराणात विविध प्रकारच्या कथा असून, काही आख्यायिका प्रचलित आहेत. आई रेणुकेच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या क्षेत्राला वेगवेगळ्या युगात वेगवेगळ्या नावाने संबोधले गेल्याचे कालिखंडाच्या २० व्या अध्यायात दर्शविले आहे. माता म्हणजे आई आणि पूर म्हणजे गाव अर्थात आईचे गाव ते मातापूर. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन माहूर हे नाव प्रचलित झाले आहे. विविध ग्रंथ व आख्यायिकेनुसार रेणुकेच्या कथेसंबंधी थोडीफार भिन्नता असली, तरी माहूर ही कोरी भूमी असून, या भूमीतील अग्निसंस्काराबाबत मात्र सर्वथा मान्यता आढळते.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील श्रीक्षेत्र माहूर व मातापूर हे पैनगंगेच्या तीरावर वसलेले पुराणप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून, श्री रेणुकामातेच्या वास्तव्याने पुनीत झालेले श्रीक्षेत्र माहूर हे एक पूर्ण शक्तिपीठ असून, महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी दुसरे पीठ आहे. धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात माहूरची फार मोठी प्राचीन व श्रेष्ठ परंपरा आहे. माहूर येथील रेणुका देवीचे मंदिर हे सुप्रसिद्ध रामगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असल्याने मुस्लिम कालखंडात झालेल्या युद्धात मंदिराची नासधूस झालेली असून,
१६ व्या शतकात मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असल्याची माहिती मिळते. मंदिर हे माहूर बसस्थानकापासून ३ किमी अंतरावर असून, समुद्र सपाटीपासून २६५० फूट उंचीवर आहे. माहूरसाठी महाराष्ट्रातील नांदेड, लातूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परळी, जळगाव, नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ येथून थेट बससेवा आहे. माहूरगडावरील रेणुकामातेच्या मंदिरात निवांतपणे जाऊन बसल्यावर गड चढल्याचा शीण क्षणात संपून मनात येते की, हे मंदिर लहान असले तरी जगाला व्यापून राहिलेल्या या वत्सल माऊलीचे रुप भव्य व सुंदर आहे. अशा या आदिमातेचे योगेश्वर दत्तात्रेयांनी स्तवर वारंवार केले आहे. या ठिकाणी ही विशाल सिंहासनावर विराजमान असून, विशाल कपाळावर कुंकवाचा मळवट आहे. मुखात विडा रंगलेला आहे. तसेच नाना रत्नांचे अलंकार तिच्या गळ्यात आहेत. भूमध्यावर ॐकाराचे दर्शन होते. तेजस्वी डोळ्यातील प्रकाशकिरणांनी माता आपल्या भेटीस आलेल्या लेकरांवर वत्सल द़ृष्टी फिरवित आहे. मातेच्या अशा या विशाल रुपाचा फक्त अर्धाच म्हणजे गळ्यापासून वरचा भाग येथे असला तरी, विष्णुदासांसारख्या भक्तांना तिचे संपूर्ण दर्शन होत राहते. या जगन्नातेच्या मंदिरात भाविकांची सतत गर्दी असते. लांबलांबच्या ठिकाणांहून भक्तमंडळी येतात. यावरून असे म्हणता येईल की,
ही आदिमाया जगदंबा ! रेणुका, कुलस्वामिनी अंबा!!
सतत प्रसन्न असणाऱ्या या जगन्मातेचे दर्शन होताच भक्तांचे देहभान हरपते. सर्वप्रथम मंदिरातील नगारखान्यात ठेवलेला चौघडा द़ृष्टिपथास पडतो. त्यापुढे आई रेणुकेचे मुख्य मंदिर आहे. मंदिराचे गर्भगृह व सभामंडप अशा, अशा दोन भागात विभाजन करण्यात आलेले आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आई रेणुकेचे पूर्वाभिमुख व तांदळाच्या स्वरुपात मूर्तीचे दर्शन विलोभनीय आहे. अशा प्रतिमा अंबेजोगाई, श्रीक्षेत्र माहूर, पारडी, पुनापूर व अमरावती या ठिकाणी आढळतात. परंपरेनुसार नवरात्रात रेणुका मातेला संपूर्ण अलंकार चढविलेले असतात. मंदिर परिसरात महालक्ष्मीची, तुळजाभवानीच्या प्रतिमा विराजमान आहे. तर गडाच्या पायऱ्या उतरुन गेल्यानंतर रेणुकापुत्र परशुरामाचे मंदिर आहे. तर गडाच्या समोरील किल्यात महाकालीचे मंदिर आहे गडापासून पुढे दोन किमी अंतरावर एकमुखी दत्ताचे ठिकाण आहे व त्यापुढे तीन किमी अंतरावर माता अनसूया व अत्री ऋषींचा आश्रम आहे.
माहूरगडावरील ही रेणुकामाता वैदिक व पौराणिक वाङमयात अदिती देवमाता अथवा वेदमाता म्हणून गौरविली आहे रेणुका माहात्म्यात म्हटले आहे की, एक हजार अश्वमेघ यज्ञ केल्याने जे फळ मिळते, ते रेणुकेच्या केवळ दर्शनानेच मिळण्यासारखे आहे, असे म्हणतात. आषाढ, कार्तिक व चैत्र महिन्यात रेणुकेचे दर्शन घेतल्यास पुनर्जन्म येत नाही. माहुराची वाटचाल करताना प्रत्येक भाविक व्यक्ती मातेच्या मानसपूजेत दंग होऊन गुणगुणत असतो.
माहुरगडावरी गडावरी ग तुझा वास! भक्त येतील दर्शनास !!
तिसरे पीठ – तुळजापूरची तुळजा भवानी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, शिवाजी महाराजांची आरध्यदेवता, स्वा.सावरकरांची स्वातंत्र्य देवता, हिच्या कृपेनेच महाराष्ट्रातील क्षात्रतेज उफाळून आले व महाराष्ट्रीयांच्या जीवनात एक अलौकिक, चित्तथरारक, दैदिप्यमान इतिहास घडून आला.

उस्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र हेमाडपंथी असून, गाभाऱ्यात तुळजाभवानीची अष्टभुजाधारी पाषाणांची मूर्ती आहे. देवीने उजव्या हाताने महिषासुराची शेंडी धरली असून, डाव्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे, अन्य सहा हातांमध्ये विविध शस्त्रे धारण केली आहेत. देवीच्या पायाखाली एका बाजूला रेड्याचे धड, तर दुसऱ्या बाजूला शिर कोरलेले आहे. तिथेच देवीच्या सिंहाची प्रतिमाही कोरलेली आहे. महाराष्ट्रात प्राचीन काळापासून तुळजाभवानी ही अनेक राजकारण्यांची आराध्य दैवता म्हणून पूजिली आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पूर्वजांपासून कुलदेवी असून, तिने महाराजांना भवानी तलवार प्रदान करून युद्धात विजयी होण्याची आख्यायिका सांगितले जाते. आजपर्यंतच्या ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी तुळजापूरला अनेक दाने मातृत्वभावनेने दिली. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची पुतळ्याची माळ, अहिल्याबाई होळकरांची पाण्यासाठीची विहीर, हैदराबादच्या रावबहाद्दूर संस्थानचे कार्य, कोल्हापूरच्या राजे छत्रपतीने देवीसाठी दिलेली जमिनीची देणगी, अशी अनेक नावे आहेत.


तुळजापूर येथे श्री आई भवानी कशी स्थिरावली या संदर्भात पुराणात विविध प्रकारच्या काही आख्यायिका प्रचलित आहेत. त्यापैकी एक आख्यायिका अशी आहे की, कृतयुगात कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती हिने भावभक्तीने केलेला धावा ऐकून त्वरित श्री तुळजाभवानी माता धावून आली व तिचे रक्षण करून तिला वर दिला. हाकेला त्वरित धावून आली म्हणून तिला त्वरिता व तुरिता असे नाव पडले. कालांतराने
तुरीताचा अपभ्रंश तुळजा झाला व जिथे वास्तव्य केले ते तीर्थक्षेत्र तुळजापूर या नावाने प्रसिद्ध पावले आहे.
मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. एकशे आठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ, तसेच अमृतकुंड म्हणेजेच पूर्वीचे अंधारकुंड, असे नाव प्रचलित आहे. उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तुळजाभवानी मातेस पार्वतीचा अवतार समजण्यात येतो. त्यामुळे गोमुख तीर्थकुंडातही महादेवाची मूर्ती आहे. त्यापीठामागे दत्तपादुका आहेत. त्यानंतरच पहिल्यांदा कोणत्याही कार्यास सुरुवात करणाऱ्या श्री गणेशाचे दर्शन करून तुळजाभवानीच्या मुख्य रावरंभा निंबाळकर दरवाजामधून देवीच्या मंदिरात प्रवेश केला जातो. गणेशमूर्तीच्या पाठीमागे मार्कंडेय ऋषी आहेत. उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या पूर्वीच्या पाच पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन हेमाडपंथी आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी रक्तभैरवाची मूर्ती आहे. तुळजाभवानीचे होमकुंड सुमारे दहा फूट लांब-रूंद असून, साधारण सात फूट खोल आहे. वर्षाला आश्विन शुद्ध दुर्गाष्टमी ते आश्विनी पौर्णिमा या कालावधीत होमकुंड प्रज्वलित असते. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मुख्य स्थानाशिवाय देवीचा सीमोल्लंघन पार आहे. सीमोल्लंघन पाराची रचना ही अत्यंत पुरातन असून, पूर्णत: दगडी बांधकाम केलेले आहे. साधारण बारा फूट लांबी-रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. वर्षाला आश्विन शुद्ध दुर्गाष्टमी ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत होमकुंड प्रज्वलित असते. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मुख्य स्थानाशिवाय देवीचा सीमल्लंघन पार आहे. सीमोल्लंघन पाराची रचना ही अत्यंत पुरातन असून, पूर्णत: दगडी बांधकाम केलेले आहे. साधारण बार फूट लांबी-रुंदीचा सीमोल्लंघन पार आहे. पारावर खोलगट सुपारीच्या आकाराचे छोटे छोटे खड्डे आहेत. देवीच्या सीमोल्लंघन पारावर जाण्यासाठी केवळ पश्चिम बाजूने वर जाण्यासाठी रस्ता आहे. सीमोल्लंघन पाराच्या मध्यभागी पिंपळाचे प्राचीन झाड आहे. सीमोल्लंघन पारावर सूर्योदयाचा प्रकाश येतो. त्यामुळे देवीच्या मुखावर सूर्यप्रकाश येतो.
तुळजाभवानीचा मुख्य दरवाजा पितळी असून, नेपाळचा राजा परमार हा देवीचा निस्सीम भक्त होता, असा इतिहास सांगण्यात येतो. त्यामुळे तुळजाभवानीचे स्थान केवळ राज्यातील तीर्थक्षेत्र म्हणून मर्यादित नाही, हे यावरून स्पष्ट होते. पितळी दरवाजातून देवीच्या गाभाऱ्यासमोरील परिसर दिसतो. त्यानंतर देवीचे मुख्य सिंहासन आहे. देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणीगृह आहे. देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपाच्या बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघराच्या स्थानात देवीचा पाळणा आणि चांदीचा पलंग आहे. पलंगाची जागा तशी मर्यादित आहे. मात्र, पलंगावर असणारी गादी भव्यदिव्य आहे. देवीसमोर भवानी शंकराची मूर्ती आहे. भवानी ही पार्वतीचे रुप आहे. भवानी शंकराच्या समोरील सभामंडपात दगडी खांबावरच मंदिराची उभारणी केली आहे. तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रात विष्णू स्थानास महत्त्व आहे.
मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटाचा मान घटे कुटुंबीयांचा आहे. घटे कटुंबीय मूलत: मुरुम, ता.उमरगा येथील आहे. त्यांचे वास्तव्य सोलापूर-पुणे भागात आहे. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घटाची पूजा होते. देवीस दररोज दोन वेळा अभिषेक पूजा कायमस्वरुपी असतात. नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. त्यानंतर प्रशाळपूजा होते. त्यानंतर देवीस विड्याच्या पानाचे घर बांधण्यात येते. नवमीला घटोत्थापन आणि अजावळी आजही होमकुंडावर देण्यात येतो. दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते. नगरचे भगत कुटुंबीय पालखी घेऊन येतात. सुमारे ४५ पिढ्यांपासून ही परंपरा चालू आहे.
तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवरात्रीतील नऊ दिवस प्रत्येक दिवशी वाढणाऱ्या माळेने भाविकांच्या श्रद्धेस आराधनेची भरती येते.
अर्धपीठ – महिषासूरमर्दिनी सप्तशृंगीदेवी, वणी

देवी भागवतानुसार वरील ही तिन्ही शक्तिपीठे अत्यंत श्रेष्ठ समजली जातात. या तीन पीठाशिवाय आणखी एक तितकेच श्रेष्ठ, परमपवित्र पीठ म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगपीठ. महाराष्ट्रास देवीच्या साडेतीन पीठापैकी अर्धे पीठ असलेली सप्तशृंगीदेवी या देवील श्री ब्रह्मस्वरुपिणी असेही म्हणतात. हे अर्धे पीठ मानले जाते. येथे त्रिगुणात्मक महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती प्रत्यक्ष ब्रह्मस्वरुपिणी धर्मपीठ ॐकार स्वरुपात अधिष्ठित आहे.
नाशिकपासून ६५ किलोमीटरवरील ४८०० फूट उंचावरील सप्तशृंगगडावर वसली आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेवरील सात शिखरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड. एकीकडे खोल दरी. तर दुसरीकडे छाती दडपविणारे कडे आणि यात फुललेली नाजूक
हिरवाई, असा निसर्ग घेऊन येथे उभी ठाकलेली देवी जणू या निसर्गाच्या रौद्र रुपाशीच नाते सांगणारी आहे, असे वाटते. मातलेल्या महिषासूर राक्षसाच्या निर्दालनासाठी देवादिकांनी देवाची याचना केली अन् होमाद्वारे ती प्रगटही झाली. तिचे प्रकट रुप हेच सप्तृंगीचे होते, असे सांगितले जाते. या देवीचे महात्म्य मोठे आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरीजा महानदीचे रुप म्हणजे सप्तशृंगदेवी, महाकाली, महालक्ष्मी व महास्वरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरुप म्हणजे सप्तशृंगदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या तपोवनात राम, सीता व लक्ष्मण वनावासात असताना येथे येऊन गेल्याची आख्यायिका आहे.
येथील निसर्गाचे रुप रम्य आहे. डोंगराची कपार खोदून तयार केलेल्या महिरपीत देवीची आठ फूटी मूर्ती आहे. तिला अठरा भुजा आहेत. मूर्ती शेंदूरचर्चित असून, रक्तवर्ण आहे. डोळे टपोरे व तेजस्वी आहेत. सर्व हात एकमेकांना लागून आहेत. सर्व देवांनी महिषासुराशी लढण्यासाठी देवीला शस्त्रे दिली होती. शंकराचे त्रिशूल, विष्णूचे चक्र, तरुणाचा शंख, अग्निचे दाहकत्त्व, वायूचा धनुष्य बाण, इंद्राचे वज्र व घंटा, यमाचा दंड, वरुणाचा पाश, दक्षप्रजापतीची स्फटिकमाला, ब्रह्मदेवाचे कमंडलू, सूर्याची किरणे, कालस्वरुपी देवीच तलवार, क्षीरसागराचा हार, कुंडले व कंकण, विश्वकर्माचा तीक्ष परशू व चिलखत, समुद्राचा कमलाहार, हिमालयाचे सिंहवाहन व रत्न आहे. मूर्ती काहीशी झुकलेली आहे. त्याबाबतची कथाही गमतीदार आहे. गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्चर्या करीत होते. त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

सुमारे ४७२ पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे दर्शन होते. चैत्र व नवरात्र असे दोन उत्सव येथे होतात. चैत्रात देवीचे रुप हसरे, तर नवरात्रात ते गंभीर असल्याचे सांगितले जाते. चैत्रोत्सव देवीच्या माहेरच्यांचा, तर नवरात्रोत्सव सासरच्यांचा, असे गमतीदार कारणही त्यामागे सांगितले जाते. नवरात्रात विविध कार्यक्रम येथे होत असतात. देवीजवळ घट बसवून नवरात्रास प्रारंभ होतो. देवीला रोज वेगळ्या रंगाचे वस्त्रे नेसविण्यात येते. तिला अकरा वार साडी लागते. चोळीसाठी तीन खण लागतात. नऊ दिवस विविध रुपात पूजा अर्चा केली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन होऊन दसऱ्याच्या दिवशी पूर्णाहुती दिली जाते. त्यानंतर नैवेद्य दाखविला जातो. दसऱ्याच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर ध्वज लावण्याची परंपरा आहे. हा मान दिंडोरी तालुक्यातील दरेगावच्या पाटील, कुटुंबीयास आहे. मात्र, ते हा ध्वज कसा लावतात, हे कोणालाही समजत नाही. गडावर सप्तशृंगीच्या मंदिराशिवाय पाहण्यासाठी इतरही काही ठिकाणे आहेत. मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे. याशिवाय पाण्याची बरीच कुंड आहेत. पूर्वी १०४ कुंड होती. मात्र, आता त्यातील बरीच बुजली आहेत. याशिवाय तांबुलतीर्थ, काजळतीर्थ व अबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेत. तांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहे. देवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते.