Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

मराठी विज्ञान परिषद – विज्ञानाशी गट्टी करून देणारी संस्था

पृथ्वीच्या निर्मितीपासून उत्क्रांती करत आलेल्या मानवाने विज्ञान तंत्रज्ञानात उत्तरोत्तर खूप प्रगती केली. आज ह्या प्रगतीची गोड गोमटी फळे जशी आपल्याला लाभली आहेत. त्या फळांसोबत भयानक विध्वंस घडवणाऱ्या किडी सुद्धा आल्या आहेत. आता ह्या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक स्तरांवर काम करण्याची गरज आहे. ‘मराठी विज्ञान परिषद’ यासाठी अनेक उपक्रम राबवून जनजागृती करत प्रत्यक्ष कृतीही करत आहे. आज ह्या परिषदेविषयी जाणून घेऊया.

मराठी विज्ञान परिषदेची स्थापना विवेकवादी विज्ञाननिष्ठ मधुकर ना. गोगटे यांनी २४ एप्रिल १९६६ रोजी केली. त्यापूर्वी ते मुंबई मराठी साहित्य संघात कार्यरत होते. विज्ञानाला सुद्धा एक व्यासपीठ असावं ही कल्पना त्यांना सुचली. त्यांच्या या कल्पनेला अनेक जाणत्या लोकांनी उचलून धरलं. पुढे सरकार दरबारी पाठपुरावा करून १९८३ साली परिषदेला शीव चुनाभट्टी इथे स्वत:चा भूखंड मिळाला आणि तिथे परिषदेचा दुमजली डोलारा उभा राहिला. परिषदेने आजवर अनेक कल्पना संकल्पना अंमलात आणल्या आहेत. अनेक प्रयोगांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये यांना क्रियाशील केलं. वृत्तपत्रातून जनजागृती केली गेली. छोट्या मोठ्या सभा, संमेलने आयोजित करून वैज्ञानिकांसोबत चर्चा संवाद घडवून आणले. विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनवृत्तीला प्रोत्साहन दिले. परिषदेने घेतलेल्या विज्ञान कथा स्पर्धेतूनच डॉ. जयंत नारळीकर, बाळ फोंडके, सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे, डॉ. मेघश्री दळवी असे लोकप्रिय लेखक नावारूपाला आले.

परिषदेची मुख्य उद्दिष्टे विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे, यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे, विज्ञानाचे जीवनात महत्त्व वाढवणे, वैज्ञानिक संशोधन व विज्ञानाची प्रगती करणे ही आहेत. यासाठी परिषद शहरी, ग्रामीण आणि मूकबधिर मुलांसाठी विविध उपक्रम राबवते. परिषदेचे मुख्यालय मुंबईत असले तरी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एकूण ६४ ठिकाणी आणि महाराष्ट्राबाहेर वडोदरा, गोवा, भोपाळ आणि बेळगाव इथे परिषदेचे विभाग आहेत. परिषद ह्या प्रत्येक जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून त्यात मुलांना आणि रहिवाशांनाही सामील करून घेते.

परिषदेच्या जन्मापासून दर वर्षी परिषदेचे विभाग असलेल्या ठिकाणी विज्ञान अधिवेशन आयोजित केलं जातं. नामांकित मराठी शास्त्रज्ञ या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवडले जातात. आजवर डॉ. रा.वि.साठे, श्री. म.ना.गोगटे, प्रा. भा.मा.उदगावकर, प्रा. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर श्री. प्रभाकर देवधर हे अध्यक्ष राहिले आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्ती/संस्था यांचा विशेष सन्मान केला जातो. या दोन दिवसांच्या कार्यक्रमांत परिसवांद, व्याख्याने, कथा-कथन, शास्त्रज्ञांशी गप्पा आदींचा समावेश असतो.

परिषदेत वेळोवेळी व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात. यामध्ये न्युरो सर्जन, कृषी भौतिकशास्त्रज्ञ, लेझर तंत्रज्ञ, संगणक तज्ञ, रसायन, प्राणी, भूगर्भ, आरोग्य, वनस्पती, अवकाश, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रातील तज्ञांची व्याख्याने होतात. परिसंवाद, प्रदर्शने, वैज्ञानिक गप्पा, शैक्षणिक सहली असे विविध उपक्रम राबवले जातात. परिषद नेहरू विज्ञान केंद्र, बी.ए.आर.सी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अशा संस्थांसोबत सुद्धा कार्यक्रम आयोजित करते.      

परिषदेचे सौरउर्जेच्या क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. परिषद स्वत: अनेक ठिकाणी सौर उर्जा प्रकल्प तयार करते. लोकांनाही याची माहिती व्हावी म्हणून सूर्यचूल तयार करण्याचं प्रशिक्षणही परिषदेत दिलं जातं.

परिषदेच्या मुंबई इथल्या कार्यालयाच्या गच्चीवरच शहरी शेतीची बाग फुलवलेली आहे. आपल्या घरात भाजी आणि अन्न धान्याचा कचरा रोज निघत असतो. ह्या शहरी शेतीच्या तीन ते चार झाडांना हा रोजचा कचरा खत म्हणून टाकू शकतो. म्हणजेच इथे कचऱ्याची विल्हेवाटही अगदी सहज लागते. या शहरी शेती विषयीची माहिती परिषदेत दर महिन्याच्या पहिल्या रविवारी दिली जाते.

परिषदेत राष्ट्रीय विज्ञान दिन, राष्ट्रीय गणित दिन, जागतिक महिला दिन, राष्ट्रीय सुरक्षा दिन अशा महत्त्वाच्या दिवशी त्या त्या क्षेत्रातील निष्णात व्यक्तीची व्याख्याने आयोजित केली जातात.

मुंबईतील परिषदेत असलेले मुरली चुगानी संदर्भालय हे मराठी, इंग्रजी भाषेतील विज्ञान तंत्रज्ञानाच्या विविध शाखांतील सुमारे ४,५०० पुस्तकांनी आणि जवळपास साडेतीनशे दुर्मिळ पुस्तकांनी सुसज्ज असं दालन आहे. यात सरिता कोश, कृषिज्ञान कोश आणि विश्वकोशा सारखे ग्रंथही उपलब्ध आहेत.

पहिली ते तिसरीच्या मुलांसाठी परिषदेत बालोद्यान वर्ग घेतले जातात ज्यात विविध प्रकारचे खेळ खेळत असताना त्यांना विज्ञानाची गोडीही लावली जाते. शिवाय सहावी ते नववीच्या मुलांचा विज्ञान प्रयोग मेळावा भरवला जातो ज्यात मुलं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग सदर करतात. विज्ञान खेळणी या प्रकारात खेळण्यांच्या माध्यमातून विज्ञान समजावले जाते. उदा. पाण्यावर चालणारी खेळातली बोट नेमकी कशी चालते हे दाखवलं जातं.

वयात येणाऱ्या मुलांना आपल्या शरीराची ओळख करून देण्यासाठी परिषदेत कार्यक्रम घेतला जातो. यात नववीच्या मुली आणि नववीच्या पुढील मुलांसाठी वेगवेगळे वर्ग घेतले जातात. एड्सची माहिती देणारा, मुलांचं शंका निरसन करणारा कार्यक्रम सुद्धा घेतला जातो.

परिषदेतर्फे १९९५ सालापासून राज्य आणि तालुका पातळीवर बालविज्ञान संमेलन आयोजित केलं जातं. यांत विद्यार्थी आपले प्रकल्प सदर करतात. यासोबतच शैक्षणिक सहलींचेही आयोजन केले जाते.

आजवर जीवनशैली आणि आरोग्य, गणिताशी गट्टी, हवा आणि हवामान, वस्त्रोद्योग अशा विविध विषयांवर ई पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ही सर्व पुस्तके आपण www.mavipa.org ह्या संकेत स्थळावर विज्ञान – संसाधने या विभागात डाऊनलोड करून वाचू आणि ऐकू शकता.

आता परिषद विज्ञान विषयात पी.एचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेतील मुलांशी थेट संवाद आयोजित करून त्यांना संशोधनाकडे वळण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. पी.एचडीचे विद्यार्थी त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय ‘शनिवारी विज्ञानवारी’ हा कोरोना काळात बंद झालेला उपक्रम आता पुन्हा सुरु होत आहे. विज्ञानाला वाहिलेली ही मराठी विज्ञान परिषद अनेक उपक्रम राबवीत असते. त्यांच्या या उपक्रमांची परिणती पुढील पिढीच्या जडघडणीत नक्कीच दिसून येते. तुमच्या मुलांना अशा प्रकारे विज्ञानाचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शन मिळवायचे असेल तर तुम्ही तुमच्या विभागातील परिषदेत जाऊ शकता. यासाठी  https://www.mavipamumbai.org/chapters-mar/ ह्या संकेतस्थळावरील ‘विभागांचे पत्ते’ ह्या पीडीएफ वर क्लिक करून तुमच्या विभागातील परिषदेचा पत्ता आणि फोन नंबर मिळवू शकता. मग, ह्या विज्ञानवारीत तुम्हीही सामील होणार ना?

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *