कामासाठी मनरेगा कार्ड मिळवा

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम म्हणजेच मनरेगा ह्या योजनेद्वारे सरकार अशी अनेक कामे काढते ज्यायोगे स्थानिकांना रोजगार मिळतो. यात रस्ते बांधणी, रेल्वे मार्ग टाकणं किंवा बंधारे, धरणं बांधणं अशी कामे केली जातात. एका वित्तीय वर्षातील शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी या योजने द्वारे दिली जाते. या योजनेअंतर्गत अकुशल ग्रामीण नागरिकांना रोजगार दिला जातो. या कामांमुळे स्थानिकांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या द्रष्टेपणातून १९७७ साली ह्या योजनेची निर्मिती झाली. मात्र केंद्रीय स्तरावर तिचे अधिनियम २००५ साली झाले.

मनरेगा द्वारे रोजगार मिळवू इच्छिणाऱ्यांकडे कामासाठी जॉब कार्ड असणे आवश्यक असते. ह्या कार्डावर आधार कार्डाप्रमाणे एक नंबर असतो. या नंबरच्या माध्यमातून त्या व्यक्तीने आजवर कोणते आणि कुठे काम केले आहे, याचा त्याला कोणता लाभ मिळाला आहे इत्यादी माहिती साठवता आणि पाहता येते.     

नरेगा म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम ही केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबवली जाते. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील असे कुटुंब ज्यांच्याकडे उपजीविकेचं साधन उपलब्ध नाही, विधवा स्त्रिया. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे लोक यांना एक निश्चित उत्पन्न मिळवून देण्यासाठी ही योजना केंद्र सरकार २००५ पासून राबवत आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे ग्रामीण भागातील अशा लाभार्थ्यांकडून कंपोस्ट खड्डे खोदणे, विहीर खणणे किंवा दुरुस्त करणे, वृक्षलागवड करणे, कृषी क्षेत्राचे दुरुस्ती करणे ही कामे करून घेतली जातात. मनरेगा आणि नरेगाअंतर्गत काम करणाऱ्याला ‘सोबती’ म्हटलं जातं.    

मनरेगा योजनेअंतर्गत केली जाणारी कामे ही चार श्रेणीमध्ये आहेत ती खालील प्रमाणे:

श्रेणी-१-

या श्रेणीमध्ये पारंपारिक जलस्रोत आणि पुनरुज्जीवन, पाणलोट व्यवस्थापन, सूक्ष्म आणि लघु सिंचन सुविधांची कामे, जलसंधारण संरक्षण, कुरण विकास इत्यादी कामे समाविष्ट केली गेली आहेत.

श्रेणी-२ –

या श्रेणीमध्ये मासेमारी, पशुसंवर्धन, पडीक क्षेत्र विकसित करणे, इंदिरा गांधी आवास योजनेत काम करणारे कामगार इत्यादी संबंधित कामे समाविष्ट आहेत.

श्रेणी-३ –

या श्रेणीमध्ये खास करून महिला बचत गटांसाठी कृषी उत्पादनाच्या साठवणुकीसाठीची कामे केली जातात. कृषी उत्पादकता वाढवणे, भौतिक संसाधनांच्या निर्मितीची कामे व खतांची रचना इत्यादी कामे केली जातात.

श्रेणी-४ :-

या श्रेणीमध्ये क्रीडा मैदान, बांधकाम कार्य, ग्रामीण स्वच्छता कार्य, आपत्कालीन व्यवस्थापन, इमारत बांधकाम, रस्ता अशा कामांचा समावेश आहे.

मनरेगासाठी कोणाची आणि कशी निवड केली जाते

  • इच्छुकांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करावा.
  • अर्जाची पडताळणी होते आणि नरेगा सोबतीची भरती ग्रामपंचायत द्वारे केली जाते.
  • या सोबतींची संख्या ही ग्रामपंचायतीमधील नरेगा कामगारांच्या संख्येवर अवलंबून असते.
  • यांची निवड प्रक्रिया पात्रता पुरुष असल्यास, किमान आठवी पास आणि महिला देखील आठवी पास असणे आवश्यक आहे.
  • जर आठवी पास स्त्री उपलब्ध नसेल, तर पाचवी पास महिलेची नरेगा सोबती म्हणून निवड केली जाते.

मनरेगा जॉब कार्ड पात्रता काय आहे?

  • अर्जदार हा भारताचा कायमस्वरूपी नागरिक असावा
  • अर्जदाराचे वय १८ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. शारीरिक सक्षम असल्यास कमाल वयाची मर्यादा नाही.
  • अर्जदार अकुशल श्रमिक असावा.

मनरेगा अंतर्गत जॉब कार्डसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

  • उत्पन्नाचा दाखला व प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • पत्त्याचा पुरावा
  • रेशन कार्ड
  • आधार कार्ड
  • मोबाईल नंबर

नरेगा जॉब कार्ड योजना ऑफलाईन अर्ज नोंदणी (Registration) प्रक्रिया काय आहे?

  • नरेगा योजनेत अर्ज करायचा असल्यास कुटुंबातील प्रौढ सदस्याने त्याचे नाव, वय व पत्ता ग्रामपंचायतीत सादर करावे.
  • अर्जाची पडताळणी होते.
  • घरांची पंचायत नोंदणी आणि जॉब कार्ड सदस्यांचा तपशील आणि फोटो सहित जॉब कार्ड जारी करण्यात येते.
  • नोंदणीकृत व्यक्ती काम करण्यासाठी पंचायत किंवा कार्यक्रम अधिकारी यांना किमान १४ दिवस सतत काम करण्यासाठी लेखी अर्ज सादर करू शकतो.
  • अर्ज केल्यानंतर त्या अर्जदाराला दररोज बेरोजगारी भत्ता दिला जातो.

या योजनेच्या कायद्याअंतर्गत स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जात नसून स्त्री आणि पुरुषाला समान रोजगार मिळतो.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *