अनुदान घ्या – सौर कृषी पंप बसवा !

सौरऊर्जा हा जीवसृष्टीला अनंत काळ सोबत करणारा स्त्रोत आहे. ऊर्जेचे अन्य स्त्रोत पुरविणारे इंधनसाठे अल्प असल्याने सध्या सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. सौर ऊर्जा वापरासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. केंद्र सरकारची ‘पंतप्रधान कुसुम योजना’ व राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री शाश्वत सौर कृषी योजना’ या दोन योजना फार महत्वाच्या आहेत. ‘पंतप्रधान कुसुम योजने’ चा विचार केला तर याअंतर्गत शेतामध्ये सौरपंप बसविण्यासाठी शेतकऱ्यांना ९० ते ९५ टक्के अनुदान दिले जाते.
या योजनेद्वारे शेतकरी आपल्या शेतामध्ये तीन ते साडे सात अश्वशक्ती क्षमतेचे पंप बसवू शकतात. शेतातील कृषी पंपांचा विचार करता विजेचा सततचा लपंडाव, भारनियमन व रात्रीचा वीजपुरवठा इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांना वेळेवर पिकांना पाणी देता येत नाही.
रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे धोके उद्भवू शकतात. या पार्श्वभूमीवर, सौर कृषीपंप बसविणे खूप महत्वपूर्ण आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्याकडे असलेल्या जमिनीच्या क्षेत्रावर आधारित किती अश्वशक्तीचा पंप दिला जाईल हे ठरते.

लाभार्थी निवडीचे निकष
शेततळे,विहीर, बोअरवेल, बारमाही वाहणारी नदी किंवा नाला यांच्या शेजारील शेत, तसेच पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी
‘अटल सौर कृषी पंप’ योजनेचा टप्पा एक व दोन किंवा ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप’ योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेले परंतु मंजूर न झालेले अर्जदार यासाठी पात्र असतात.
शेतामध्ये पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतात.
अडीच एकर शेतजमीन असेल तर तीन अश्वशक्तीचा पंप बसवता येतो.
पाच एकर शेतजमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून पाच अश्वशक्तीचा सौर पंप
बसविता येतो.
पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असल्यास साडे सात अश्वशक्तीचा व त्यापेक्षा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून देय आहेत.
‘पंतप्रधान कुसुम’ योजनेची वैशिष्ट्ये
शेतकऱ्यांच्या जमीन धारण क्षमतेनुसार तीन, पाच व साडेसात अश्वशक्ती व त्यापेक्षा जास्त अश्वशक्तीचे सौर पंप उपलब्ध करून दिले जातात.
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांनी कृषी पंप किंमतीच्या दहा टक्के तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के रक्कम यामध्ये भरणे गरजेचे असते.