मृत्तिका उद्योगाच्या दिशेने !

अलीकडे नवनवीन आजार बालपणापासूनच मनुष्याची साथ करू लागले आहेत. काही अंशी याला भोजन प्रक्रियेसाठी वापरली जाणारी भांडीसुद्धा कारणीभूत ठरतात. ‘जुने ते सोने’ या उक्तीप्रमाणे आता मातीच्या भांड्याकडे माणूस वळू लागला आहे. बरेच तरुण मातीची भांडी आकर्षक पद्धतीने बनवून मातीच्या भांड्यांचा उद्योग करताना दिसत आहेत, त्यांचे प्रमाण मात्र अल्प आहे. कोकणात मातीच्या विटांचा उद्योग तरुण करताना दिसतात.
मातीच्या भांड्यात अन्न शिजविल्यास, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाणही अन्नात आढळते, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. मातीच्या भांड्यास असणारी सूक्ष्म छिद्रे आग व ओलावा समान रीतीने प्रसारित करण्यास मदत करतात; ज्यामुळे अन्नातील पोषकतत्त्व सुरक्षित राहतात. मातीच्या भांड्यात कमी तेलाचा वापर केला जातो.
मातीच्या भांड्यांचा उद्योग करणारी माणसे जवळपास मिळणारी शेतातील, तलावातील अथवा नदीकाठची माती भांड्यांसाठी चांगली असणारी माती आणतात. आपल्याकडच्या यंत्रसामग्रीने मडकी, माठ, विटा, अशा वस्तू बनवितात. त्याचे मुख्य यांत्रिक साधन म्हणजे चाक व साचे आहे. याशिवाय वस्तूची जाडी व्यवस्थित करून घेण्यासाठी ‘चोपणे’ नावाची एक लहानशी हातोडी, बहिर्वक्र आकाराचा एक दगड (गंडा) व वस्तूला चकाकी आणण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या मण्यांची माळ, शिंपले अगर बांबूचा तुकडा ही इतर साधनेही वापरली जातात. अर्थात, आता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब ही तरुण मंडळी आपल्या उद्योगात करीत असतात.
पात्र बनविण्याच्या पारंपरिक प्रक्रियेतील टप्पे:
– प्रथम मातीचा गोळा चाकावर ठेवण्यात येतो.
– फिरत्या चाकावर गोळा चपटा करण्यात येतो.
– अंगठ्याचा उपयोग करून गोळा उघडा करण्यात येतो.
– दोन्ही हातांचा उपयोग करून पात्राच्या भिंती वर उचलून घेण्यात येतात.
– पात्राला आकार देण्यास प्रारंभ होतो.
– पात्राच्या आतील व बाहेरील बाजूंना एकाच वेळी आकार देण्यात येतो.
– कारागिराने आपले हात सतत ओले ठेवणे आवश्यक असते.
– पृष्ठभाग गुळगुळीत केल्यानंतर पात्र चाकापासून दोऱ्याच्या साहाय्याने अलग करण्यात येते व मग वाळविण्यात येते.
पात्रे सुशोभित करण्यासाठी त्यांच्या पृष्ठभागावर पत्र्याच्या तुकड्याने अगर टोकदार लाकडी बोरूने नक्षीदार आकृती खोदून काढतात. अखेरीस वस्तू अगोदर सावलीत व नंतर उन्हात ठेवून चांगली वाळवितात व नंतर भाजतात. अलीकडे नक्षीदार कामासाठी यंत्रांचा वापर केलं जातो.
वस्तू भाजण्याकरिता ‘आवा’ किंवा ‘भट्टी’ वापरतात. विटा भाजण्याकरिता विटांचीच भट्टी रचतात, खाली गोवऱ्या वा लाकडे पेटवितात. पाच-सहा विटांचे थर व त्यावर कोळसा, परत विटांचे थर याप्रमाणे भट्टी रचतात. विटांची भट्टी सतत चालू असणारी असते. भाजून थंड झालेल्या विटा काढून घेतात व पुढील भागात वाळलेल्या नवीन विटा रचतात. विटांच्या मिश्रणात अर्धवट जळालेली राख वापरतात. म्हणजे वीट आतून पण भाजून निघते, तसेच मातीचा चिकटपणा कमी करण्याकरिताही राखेचा उपयोग होतो; आणि वीट वाळताना फाटत नाही. योग्य प्रमाणात राखेचे मिश्रण करून विटा भाजण्याचे तापमानही वाढविता येते व विटा जास्त कणखर करता येतात.