‘तिने’ सुरु केला चक्क मृदभांडी व्यवसाय !

स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीच्या भांड्यांची विक्री करणाऱ्या नागपूरच्या अश्विनी अभिजीत ऋषी या ‘स्वदेशी चळवळीचे जनक’, ‘भारतीय स्वाभिमान आंदोलन’ चे संस्थापक राजीव दिक्षीत यांच्या अनुयायी आहेत. जीवनात अधिकाधिक नैसर्गिक जीवनशैली अंगिकारणे, स्वदेशी उत्पादनांचा पुरस्कार करणे या गोष्टींना किती मोठे महत्त्व आहे, हे दिक्षीत यांच्या कार्यशाळेत अश्विनी ऋषी यांना समजले. त्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनात या गोष्टींचा वापर करायला अश्विनी यांनी सुरुवात केली.
रोजचा स्वयंपाक अधिक पौष्टिक होण्यासाठी, अन्नपदार्थ शिजविताना त्या पदार्थातील पोषणमूल्ये टिकून राहण्यासाठी अश्विनी मातीची भांडी शोधत होत्या. त्यांचे यजमान अभिजीत ऋषी यांना नवनवीन ठिकाणी फिरायची आवड आहे. त्यांच्याबरोबर अशाच एकदा सहलीसाठी गेल्या असताना अश्विनी यांना स्वयंपाकघरात वापरता येतील अशा मातीच्या भांड्यांचा खजिनाच सापडला. स्वत:साठी तसेच जवळच्या नातेवाईकांना भेट देण्यासाठी त्यांनी या भांड्यांची खरेदी केली. सात-आठ वर्षे अश्विनी स्वयंपाकासाठी हीच भांडी वापरत होत्या. त्यांनी ज्या नातेवाईकांना अशी भांडी वापरण्यास दिली होती, त्यांनासुध्दा ती फारच उपयोगी पडत होती. काही वर्षे गेल्यावर नवीन भांडी घेण्याची गरज भासू लागली तेव्हा त्यांच्या मनात वेगळीच संकल्पना उभी राहिली. हा उद्योग आपणच का करू नये, असे त्यांच्या मनात आले. लवकरच त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षातही आणली.

खरे तर, अश्विनी यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. कोरोना काळापूर्वी १० वर्षे त्या एका ‘लिगल फर्म’ मध्ये कामही करीत होत्या. त्यांचे यजमान अभिजीत ऋषी उच्च न्यायालयात वकिली करतात. मातीच्या भांड्यांच्या उद्योगाचे बीज मनात रुजायला लागले, तशी नोकरी सोडून त्यांचे काम सुरु झाले. कुंभारांकडून आपल्याला हवी तशी मातीची भांडी विकत घेऊन ग्राहकांना विकण्याची संकल्पना त्यांनी राबविली.

मध्यप्रदेशमधील लहानसहान खेडेगावांना भेटी दिल्या. तिथे असा व्यवसाय करणारे काही कुंभार होते. त्यांनी बनविलेल्या मालाला उठाव नसल्याने धंदा जवळपास बंदच होता. कुंभारांची पुढची पिढीदेखील नोकरीसाठी शहरात गेली होती. अशा कुंभारांशी बोलून स्वत:ला हवी तशी स्वयंपाकाला उपयुक्त अशी वेगवेगळ्या प्रकारांची ९०/१०० भांडी अश्विनी यांनी बनवून घेतली. ‘भारत स्वाभिमान यात्रा संस्थे’ अंतर्गत मातीच्या भांड्यांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरु केला. वर्ध्याला सेवाग्राममध्ये व नागपूर शहरातील विविध प्रदर्शनात त्यांनी मातीच्या भांड्यांची विक्री केली. ग्राहकांना मातीची भांडी आवडली. प्रदर्शनाला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे अश्विनी यांनी वेगवेगळ्या प्रकाराची जसे की साध्या हंड्या, कुंडे, कान किंवा कडी असलेल्या हंड्या, कढई तसेच दही लावायला वेगळे भांडे, फक्त फोडणी करण्यासाठी वापरता येईल यासाठी तडका पॅाट, चहाचे भांडे, तवा, पाण्याचा जार, बाटल्या, झाकण असलेली लहानमोठ्या आकारांची भांडी कुंभारांकडून बनवून घेतली. त्याचबरोबर पूर्णपणे मातीने बनविलेली चूलदेखील तयार करुन घेतली. आज अश्विनी यांच्याकडे विक्रीसाठी असलेल्या भांड्यांची किंमत दीडशे रुपयांपासून ते दीड-दोन हजारांपर्यंत आहे.

खास स्वयंपाकासाठी बनविलेली ही सगळी भांडी फक्त मातीपासून बनलेली असतात. यामध्ये कोणतेही केमिकल नसते. मातीची भांडी पाण्यात घातली की त्याला असलेली छिद्रे दिसतात. मातीचा वास येतो. तसेच मातीची भांडी जरा खरखरीत असतात. याउलट मातीत केमिकल मिसळून केलेली भांडी अगदी चकचकीत, गुळगुळीत असतात. त्याला ‘टेराकोटाची’ भांडी असे म्हटले जाते. ‘टेरोकोटा’ची भांडी व फक्त माती वापरून केलेली भांडी यांतील फरक अश्विनी नेहमीच ग्राहकांना समजावून सांगतात.
जास्तीत जास्त लोकांनी मातीची भांडी स्वयंपाकासाठी वापरावीत यासाठी अश्विनी ऋषी प्रयत्नशील असतात. त्यासंदर्भात फेसबुक पेजवर पोस्ट लिहिणे, माहितीपत्रक छापणे, प्रदर्शनात लोकांचे शंकानिरसन करणे हे त्यांचे आवडीचे काम आहे. आपली जीवनशैली कशी हवी, अन्न शिजविताना त्यातली पोषणमूल्ये कशी जपायची याबद्दल त्या प्रबोधन करीत असतात. स्वयंपाक करताना पारंपरिक अशी मातीची भांडी वापरावीत कारण आपल्या शरीराची झीज भरुन काढण्याचे काम मातीची भांडी करतात. जवळपास सतरा प्रकारची पोषकद्रव्ये या भांड्यांमध्ये असतात. प्रामुख्याने कॅल्शियम, फॅास्फरस, लोह, मॅग्नेशियम अशी मातीतील नैसर्गिक खनिजे अन्नपदार्थ शिजविताना त्यातून सहजरित्या आपल्या शरीरात जातात.