यशस्वी उद्योगासाठी कानमंत्र !

आपण उद्योग-व्यवसाय करीत असाल तर हे नक्की वाचा ! आपला व्यवसाय लहान असो किंवा मोठा, आपल्या सहाय्यासाठी आपण काही कामगार मंडळी आपल्या आस्थापनांमध्ये घेत असतो. आपले कर्मचारी आणि आपण स्वतः मिळून एक ‘टीम’ असते; अर्थातच एकट्याने केलेल्या कामापेक्षा सहविचाराने सर्वांनी मिळून केलेले काम अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते. उत्तम काम करण्यासाठी आपल्याकडे ‘टीम मॅनेजमेंट’ कला असणे गरजेचे आहे. नसल्यास ती आत्मसात करून घ्या.
हिंदू धर्मातील जुन्या ग्रंथांमध्येदेखील भरपूर अभ्यासक्रम आहेत. भगवद्गीता आणि व्यवस्थापनशास्त्र, दासबोध आणि व्यवस्थापनशास्त्र यामधील उदाहरणे फार मौलिक आहेत. व्यवस्थापन, निर्णयक्षमता याबाबत या ग्रंथांमध्ये माहिती आहे. ती समजून घ्यावी.

आपल्याबरोबर आपली माणसे असतील तर आपले काम, व्यवसाय व आयुष्य खूप आनंदाने जगता येते, हे लक्षात घ्या. कोणताही उद्योग व्यवसाय हा यशस्वी होण्यासाठी सुरू केला जातो आणि त्या यशाची सर्व जबाबदारी त्या नेतृत्वावर असते. नेतृत्वासाठी आवश्यक असणारे सर्व गुण उद्योजकामध्ये असले पाहिजेत. निर्णय घेणे, योग्य माणसे घेऊन ‘टीम’ बांधणे, गुणवत्ता ओळखून त्यांना उत्तेजन देणे, नव्या बदलांना सामोरे जाणे, हे सर्व करताना आपल्या प्रगतीवरील दृष्टी ढळू न देणे या सर्व गोष्टी उद्योजकाला सांभाळाव्या लागतात. सर्वच गोष्टी आपल्याला येतात किंवा आपणच ते उत्तम करु शकू हा समज चुकीचा असतो. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही नवे चांगले काम येत असते व ती व्यक्ती ते कसे करते हे बघून आपण आपल्या व्यवसायात त्याचा कसा वापर करू शकतो व त्या व्यक्तीला ते काम कसे आनंदात करता येईल या गोष्टीचा विचार करणे उद्योजकाची जबाबदारी असते.
कोणताही उद्योग हा शेवटी माणसांमधील एक व्यवहार असतो. ज्याला आपल्या व्यवसायाचे बस्तान नीट बसवायचे असते त्याला हा माणसांबरोबरचा व्यवहार नीट सांभाळावा लागतो. त्यासाठी सर्वप्रथम माणूस वाचण्याची कला आत्मसात केली पाहिजे. अवतीभवतीच्या माणसांची पारख असलीच पाहिजे. माणसाच्या नजरेच्या आरपार जाऊन मनाचा ठाव घेता यायला हवा. व्यवसाय उद्योगात पैसा असतो. पैसा म्हटले की अनेक हवशे, गवशे, नवशे जमा होतात. या लोकांमधे नि:स्वार्थी आणि निष्ठावान कोण, कष्टाळू कोण, लोभी कोण आहे हे थोड्याश्या सहवासात कळायला हवे. विश्वासू माणसांचे जाळे निर्माण करताना स्वार्थी आणि बेभरवशाच्या लोकांना खड्यासारखे वगळता यायला हवे. उद्योजकाची नजर ही समोरच्याचे मन वाचण्याइतकी भेदक असली पाहिजे. त्याच वेळी समोरच्याला दिलासा वाटण्याइतकी आश्वासकही असली पाहिजे.
उद्योग म्हटल्यावर आर्थिक व्यवहार येतात. बँकेत गेल्यानंतर लगेच कर्ज मिळावे अशी सगळ्यांची अपेक्षा असते. आपले लक्ष बँकेकडून कसे पैसे मिळतील, आर्थिक मदत कशी मिळेल याकडेच फक्त असू नये. बँकेशी आपले नाते केवळ देणारा आणि घेणारा असे न राहता एका भागीदारीसारखे असायला हवे. त्यात आपुलकी हवी आणि विश्वासही जोपासता यायला हवा.