शिवछत्रपतींचा आवडता किल्ले रांगणा

सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर ‘किल्ले रांगणा’ उर्फ ‘प्रसिद्धगड’ वसलेला आहे. सह्याद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, परंतु घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी हा किल्ला वसलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता, म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित, नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ६७९ मी. असून याला ‘प्रसिद्धगड’ या नावाने देखील ओळखले जाते.

किल्ल्यावर कसे जावे ?

किल्ल्यावर दोन मार्गांनी पोहोचता येते. ‘कोल्हापूर–गारगोटी–पाटगाव–भटवाडी’ या रस्त्याने भटवाडीपर्यंत पोहोचून पुढे एक तास पायवाटेने जंगलातून चालत ‘चिकेवाडी’ गावात पोहोचावे. येथून अर्धा तास चालत गेल्यानंतर किल्ल्यावर पोहोचता येते. ‘कोल्हापूर ते भटवाडी’ हे अंतर सुमारे १०५ किमी. असून चांगले सुस्थितीतील वाहन असल्यास भटवाडीपासून एका कच्च्या रस्त्याने ‘रांगणा’ किल्ल्याजवळील ‘चिकेवाडी’ या छोट्या गावापर्यंत जाता येते. पुढे ‘चिकेवाडी’ येथून चालत अर्ध्या तासात किल्ल्यावर प्रवेश करता येतो. भटवाडी ते चिकेवाडी हे अंतर सुमारे ८ किमी. आहे.

सिंधुदुर्गातून या किल्ल्यावर जायचे असल्यास कुडाळहून ‘नारूर’ या गावी पोहोचावे. ‘नारूर’हून तीन-चार तासांची चढाई करून कोकण दरवाजामार्गे रांगणा किल्ल्यावर पोहोचता येते.

‘चिकेवाडी’तून पुढे पायवाटेवर एक खिंडीसारखा भाग आहे. येथे एक बांधकामाचे जोते असून ते पूर्वी असलेल्या लष्करी चौकीचे असावे. ही खिंड पार करून गेल्यावर एक छोटे पठार दिसते. तिथे उजव्या बाजूला झाडीत एक छोटे मंदिर असून ते ‘बांदेश्वर’ म्हणून ओळखले जाते. पठारावरून मुख्य सह्याद्रीच्या रांगेपासून सुटलेला ‘रांगणा’ किल्ल्याचा डोंगर आणि त्याचा भव्य दर्शनी बुरूज बांदेश्वर मंदिराजवळून दिसतो. पुढे सह्याद्री आणि किल्ला याला जोडलेल्या पायवाटेने ‘रांगणा’ किल्ल्याजवळ पोहोचता येते. येथून गडाच्या दर्शनी बुरुजाच्या बाजूने पुढे गेल्यावर गडाचा पहिला भग्न दरवाजा दिसतो. याला ‘गणेश दरवाजा’ असे नाव आहे. हा दरवाजा पार करून गेल्यावर बुरुजाच्या बाजूला असलेला दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाची बांधणी भक्कम असून हे बांधकाम मध्ययुगीन कालखंडातील आहे. याला ‘हनुमान दरवाजा’ म्हणतात. या दरवाजातून पुढे उजव्या बाजूला असलेल्या पायवाटेने गेल्यास बुरूज, बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या व एक छोटा दिंडी दरवाजा दिसून येतो. यानंतर दुसऱ्या दरवाजाजवळ येऊन सरळ पुढे गेल्यावर उजव्या बाजूला आणखी एका अंतर्गत दरवाजाची दगडी चौकट दिसून येते. या चौकटीतून आत गेल्यावर एका बांधीव विहिरीच्या बांधकामाचे अवशेष आढळून येतात. या वास्तूला ‘निंबाळकर बावडी’ संबोधतात. या वास्तूपासून पुढे थोड्या अंतरावर गडाचा सुस्थितीत असलेला तिसरा दरवाजा येतो. या दरवाजाच्या बांधणीवर युरोपियन शैलीची छाप असून याचे बांधकाम अठराव्या शतकात झाले असावे. हा दरवाजा ‘यशवंत दरवाजा’ म्हणून ओळखला जातो. या दरवाजातून सरळ पुढे गेल्यावर गडावरील सर्वांत मोठा पाण्याचा तलाव दिसतो. या तलावात बारमाही पाणी असते. तलावाच्या काठावर महादेवाचे भग्न मंदिर असून जवळच काही समाधींचे अवशेष आहेत.

किल्ल्याची निर्मिती

किल्ल्याचा विस्तार प्रचंड असून गडावर घनदाट झाडी आहे. या परिसरात जंगली प्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे किल्ल्यावर मुक्काम करताना व फिरताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजा भोज याने केली, असे काही इतिहास अभ्यासकांचे मत आहे. यासाठी ग्रँट डफ याच्या सातारा ताम्रपटाचा पुरावा दिला जातो. हा किल्ला भोज राजानेच बांधला याला सबळ पुरावा नाही. किल्ल्यावरील बांधकामाची रचना पाहता हे बांधकाम आदिलशाही काळातील असल्याची शक्यता आहे. फेरिश्ता लिखीत ‘गुलशन ए इब्राहिमी’  या ग्रंथात बहमनी सलतनतीचा वजीर महंमद गावान याने १४७० साली काढलेल्या कोकण मोहिमेत रांगणा किल्ला जिंकून घेतला, अशी नोंद आहे. याआधी हा किल्ला संगमेश्वरचा राजा ‘जखुराय’ याच्या ताब्यात होता.

रांगणाई देवीचे मंदिर

देवीचे मंदिर प्रशस्त असून मुक्कामास योग्य आहे. मंदिरात रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूळ इत्यादी आयुधे घेतलेली मूर्ती आहे. रांगणाईच्या उजव्या हाताला विष्णूची मूर्ती व डाव्या हाताला भैरवाची मूर्ती आहे. या ठिकाणी एक फारसी शिलालेखाचा दगड आहे. मंदिरासमोरच दीपमाळ आहे.   रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे. जवळच कोरडी विहीर आहे.

गणेश मंदिर, तलाव, शिवलिंग दर्शन

यापुढे दाट जंगल असल्याने आपल्याला पुन्हा तिसऱ्या दरवाज्यापर्यंत माघारी यावे लागते.  वाटेत छोटेसे गणेश मंदिर लागते.  तटबंदीच्या बाजूने चालू लागल्यावर एक तलाव लागतो.  या तलावाच्या काठावरील देवळीमध्ये शिवलिंग आहे.  पिंडीस दोन लिंगे आहेत. हे पाहून तटाच्या बाजूने पुढे चालू लागल्यावर काही पायऱ्या उतरल्या की एक दरवाजा लागतो.  या दरवाजाच्या डाव्या बाजूस असलेल्या तटबंदीमध्ये गोल तोंडाची विहीर आहे.  पुढे चालून गेल्यावर आपण गडाच्या  ‘हत्ती सोंड’ माचीवर पोहोचतो.  ही संपूर्ण माची राजगडाच्या ‘संजीवनी’ माचीप्रमाणे तटबंदीने संरक्षित केलेली आहे. तटबंदीला पायऱ्याही आहेत.  तटाच्या उजव्या हाताच्या उतारावर चिलखती बुरुज आहे.  हा बुरुज पाहून आपण वर यायचे व सोंडेच्या टोकावर असलेल्या ‘चोर दरवाज्यात’ उतरायचे.  माथ्यावर बारा कमानी असलेला दगडात खोदून काढलेला हा दरवाजा आहे.  या दरवाज्यातून उतरण्यासाठी पायऱ्या असून त्या उतरल्यावर आपण दरीच्या तोंडाजवळ येतो, म्हणून सावध राहावे लागते.  तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपणास आणखी एक भव्य दरवाजा लागतो.  या दरवाज्यातून उतरणारी वाट ‘केरवडे’ गावात जाते. हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे.

तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपण पश्चिमेकडील कोकण दरवाजाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. या दरवाज्यावर गोल बुरुज आहे.  या दरवाज्यातून उतरणारी वाट कोकणातील ‘नारुर’ गावात जाते.  कोकण दरवाजा रांगणाई देवी मंदिराच्या बरोबर मागे असल्याने आपण पायवाटेने १५ मिनिटात मंदिरात येऊन पोहोचतो.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *