रंगाची आनंदाची उधळण करणारी होळी
भारतात प्रत्येक सण अगदी आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. होळी हा असा हिंदू सण आहे, ज्यात रंग आणि आनंदाची अक्षरशः उधळण केली जाते. होलिकादहन, रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येकजण या सणाची वाट पाहत असतो. या सणासाठी घरोघरी विशेष तयारी केली जाते. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. विशेष म्हणजे हा सण साजरा करण्यासाठी काही खास खाद्यपदार्थही बनविले जातात. पुरणपोळी हा विशेष खाद्यपदार्थ घरोघरी बनविला जातो.
होळीचे नाव ऐकताच मनामध्ये आनंदाची भावना निर्माण होते. होळी हा रंगांचा सण आहे, ज्यामध्ये लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वजण सामील होतात, आणि हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

आपल्या भारतासारखा जगात दुसरा कोणताही देश नाही, जिथे लोक एकत्र येतात आणि कोणताही भेदभाव न करता बंधुभावाने सर्व सणांचा आनंद घेतात. हा सण हिंदूंचा मुख्य आणि लोकप्रिय सण आहे, परंतु तरीही सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन हा सण प्रेमाने साजरा करतात. त्यामुळे या सणामुळे एकमेकांबद्दल आपुलकी वाढते.
महाराष्ट्रात फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत दोन ते पाच दिवस होळी साजरी करण्यात येते. या सणाला भारतातील प्रत्येक प्रांतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. होलिकादहन केल्यावर दुसऱ्या दिवशी गुलाल, अबीर आणि विविध रंगाची उधळण करून ‘धुळवड’ साजरी केली जाते. भारतात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, गुजरात, आसाम, बनारस, बिहार, छत्तीसगढ, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, मणिपूर, मथुरा-वृंदावन, नागालॅंड, ओरिसा, पुदुचेरी, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड याठिकाणी होळी साजरी केली जाते.

भारतात प्रत्येक प्रांतात निरनिराळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. महाराष्ट्र व गोव्यात होळीचा सण ‘शिमगा’ या नावाने प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाप्रमाणेच ‘शिमग्या’ लाही कोकणात उत्साहाचे वातावरण असते.
होलिका दहनाच्या अग्नीमुळे जीवनातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. ज्योतिष शास्त्रामध्ये होलिका दहनाचे महत्व सांगणारे काही उपायदेखील सांगण्यात आले आहेत. या उपायांनी जीवनात श्री महालक्ष्मीची कृपा होते, आणि कुटुंबात सुख-समृद्धी सोबतच आरोग्यदेखील प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
होलिका दहनाचा विधी करताना शेणापासून बनविलेल्या सात गोवऱ्या मध्यभागी एक छिद्र करून धाग्यात बांधतात. नंतर संपूर्ण कुटुंबाच्या वतीने होलिका पूजा करून ते अग्नीत टाकतात. असे केल्याने आलेले कोणतेही संकट दूर होते आणि नकारात्मक शक्तींचाही नायनाट होतो. यासोबतच कुटुंबात परस्पर प्रेम टिकून राहते आणि महालक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो, अशी समजूत आहे.
होलिका दहनाचा विधी करताना नारळ टाकण्याचीही प्रथा आहे. घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा इतर काही त्रास असेल तर त्या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ओवाळतात. नंतर होलिका दहनाच्या अग्नीत टाकतात. यानंतर सात वेळा प्रदक्षिणा करतात. असे केल्याने सुदृढ आरोग्य लाभते आणि सर्व रोग दूर होतात. परंतु, घरात गर्भवती महिला असल्यास नारळ वापरत नाहीत. गर्भवती महिला आणि तिच्या मुलावर नकारात्मक परिणाम होतो, अशी समजूत आहे.
होळीच्या वेळी गव्हाचे पीक तयार होते. गावात होळीच्या निमित्ताने पिकांची व प्राण्यांची पूजाही केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, होळीच्या आगीत सात लोंब्या अर्पण करणे शुभ मानले जाते. वास्तविक सात अंक शुभ मानले जातात आणि असे केल्याने घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. होलिकेत गव्हाच्या सात लोंब्या टाकतात. सात परिक्रमाही करतात. अर्थात, या पारंपरिक पद्धती व मान्यता आहेत.