Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

ऐतिहासिक किनार लाभलेली शिरोडा मिठागरे

हिरव्यागर्द वनश्रीने नटलेले, माडा-पोफळीच्या बागांनी बहरलेले, सुंदर समुद्रकिनारा लाभलेले अत्यंत विनोभनीय गाव शिरोडा!
भारतातील महाराष्ट्रात सिंधुदुर्ग हा लहानसा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात हे गाव आहे. शिरोड्याला लांबच लांब पसरलेली पांढर्‍याशुभ्र वाळूची सुंदर रम्य चौपाटी लाभलेली आहे. या चौपाटीलगतच असलेले भल्या मोठ्या सुरुच्या वृक्षांचे वन हे तर शिरोड्याचे एक खास वैभव आहे. साहित्यातील ‘ज्ञानपीठ’ हा सर्वोच्च पुरस्कार मिळविलेले प्रतिभावंत साहित्यिक वि.स. तथा भाऊसाहेब खांडेकर यांची ही प्रेरणाभूमी आणि कर्मभूमीही! भाऊसाहेब खांडेकरांनी येथील ट्युटोरिअल हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी केली आणि प्रारंभीच्या उत्तमोत्तम कादंबर्‍याचे लेखनही केले. असे हे शिरोडा सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, ऐतिहासिक परंपरा व पार्श्वभूमी लाभलेले गाव आहे.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात शिरोडा गावचे महत्त्वही फार आहे. १९३० साली शिरोडा येथे झालेल्या ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहामुळे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात शिरोडा गावाचे नाव अग्रक्रमाने नमूद झालेले आहे.

सिंधुदुर्गात पूर्वी मालवण, मिठबाव आदी भागात उत्पादन व्हायचे. आज तेथील मिठागरे बंद पडली आहेत. शिरोडा या एकमेव गावात सध्या मीठ बनविले जाते. गांधीनगर भागातील सुमारे ८७ एकर क्षेत्रात मीठ तयार होते. या भागात देवी माऊली देवस्थान, गणेशप्रसाद, भास्कर, नारायण प्रसाद, मोरो भीमाजी, सकबा सबनीस अशी सहा खासगी मिठागरे आहे. नवारदेसाई, दादासाहेब, जुनादेसाई, दुर्गाबाई, सातोराम, विठोजी रामाचा, वडाचे मिठागर (ज्याठिकाणी १९३० मध्ये मीठ सत्याग्रह झाला होता.) अशी पाच केंद्रे व सरकारच्या मालकीचे मिठागर मिळून एकूण अकरा मिठागरांमध्ये मीठ बनविले जाते. मीठ तयार होण्यास फेब्रुवारी मध्यापासून सुरुवात होते. हा हंगाम मे अखेरपर्यंत चालतो. वर्षाकाठी सुमारे अडीच हजार टन मीठ उत्पादन होते. या मिठागरांमधून ‘पांढरे’ व ‘काळे’ मीठ असे दोन प्रकारचे मीठ तयार केले जाते. काळे मीठ हे प्रामुख्याने आंबा कलमे, नारळीच्या झाडांना खत म्हणून वापरले जाते.

येथे जायचे झाल्यास सावंतवाडी जवळ हॉटेल्स उपलब्ध आहेत. वेंगुर्लेपासून १७ कि.मी. अंतरावर निसर्गरम्य शिरोडा हे गाव आहे. जवळील विमानतळ चिपी व मोपा आहे. जवळील रेल्वे स्थानक सावंतवाडी आहे.
येथून मुंबई ५५० किमी , वेंगुर्ला २७ किमी आणि सावंतवाडी २६ किमी आहे.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे :
शिरोडा वेळागर समुद्रकिनारा , रेडी गणेश मंदिर , तेरेखोल समुद्रकिनारा

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *