
महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात अरबी समुद्राच्या गर्जणाऱ्या फेसाळत्या लाटांमध्ये शेकडो वर्षे पाय घट्ट रोवून उभा असणारा सिंधुदुर्ग किल्ला नयनरम्य आहे. हा किल्ला मालवणच्या किनारपट्टीपासून जवळ ‘कुरटे’ बेटावर वसलेला आहे. येथे बोटीने जावे लागते.
ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी ‘कुरटे’ बेटाची निवड केली, त्यांना गावे देण्यात आली होती.
सिंधुदुर्ग किल्ला हा 48 एकर मध्ये पसरलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम इसवी सन 1664 मध्ये करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे काम हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवले होते. सोबतच 300 पोर्तुगीज कारागीर आणि 3000 मनुष्यबळ इतकी माणसे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी उपयोगी आली.त्यामुळे हा किल्ला तीन वर्षात म्हणजे 1667 मध्ये पूर्ण झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया बांधण्याच्या कामाची सुरुवात झाली.

सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घालण्यासाठी 70000 किलोपेक्षा जास्त लोखंड आणि शिशाचा वापर करण्यात आला. याद्वारे किल्ल्याचा पाया मजबूत करण्यात आला. सिंधुदुर्ग किल्ल्याची 29 फूट उंच आणि 12 फूट रुंदीची भिंत 2 मैलावर पसरलेली आहे. किल्ल्यावर सुमारे 52 बुरूज आहेत. असे म्हटले जाते की, काही बुरुजावरुन गुप्त मार्ग सुद्धा आहेत. सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होन इतका खर्च आला होता, असे म्हटले जाते. पश्चिम आणि दक्षिण तटाचा पाया बांधण्यासाठी 500 खंडी शिसे लागले होते. याचा खर्च 80 हजार होन इतका खर्च आला होता. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 30 ते 40 शौचालये बांधली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षे आधीपासूनच स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे या किल्ल्यावर पायाचे आणि हाताचे ठसे उमटलेले आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने खूप महत्त्वाची मानली जाते. या किल्ल्यावर प्रशस्त प्रवेशद्वार पूर्वेच्या दिशेने आहे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची अशी रचना केली आहे की दुरून ती किल्ल्याची भिंत असल्यासारखी वाटते. किल्ल्याच्या जवळ उतरल्यावर एक खिंड लागते. मग सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. किल्ल्याचा दरवाजा उंबराचे लाकूड आणि सागवान लाकडाची जोड करून बनविलेला आहे. उंबराचे लाकूड हा दीर्घकाळ टिकतो म्हणून याचा उपयोग केला आहे. किल्ल्यावर गोड्या पाण्याची विहीर आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर तीन गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. त्यांची नावे ‘दूध विहीर’, ‘साखर विहीर’ व ‘दही विहीर’ अशी आहेत.
शिवराजेश्वरांचे मंदिर या किल्ल्यावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बसलेली मूर्ती या मंदिरात आहे.
या मंदिरामध्ये शिवलिंगासोबतच एक भुयार आहे, जे तीन किलोमीटर खोल आणि 12 किलोमीटर लांबीचे आहे, जे गावात पोहोचते.
छत्रपती शिवाजी महाराजांची अशी कल्पना होती की जर सिंधुदुर्ग किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला तर गडावरील स्त्रियांना सुखरूप गावात पोहोचविता येईल, अशी या गुप्तमार्गाची व्यवस्था होती.