नुकसानग्रस्त बळीराजांनी करायचे उपाय
राज्यभरात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे काढणीयोग्य रब्बी पिके, फळबागांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अशा परिस्थितीत नुकसान झालेले गहू, हरभरा, शेती आणि आंबा, संत्री-मोसंबी बागेत तज्ज्ञांनी सांगितलेल्या उपाययोजनांचा अवलंब करावा.

गहू : काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत असलेले गहू पीक आडवे झाले आहे. पावसामुळे गव्हाचे दाणे बुरशी लागून काळे पडण्याची शक्यता असते. दाणे भिजल्यामुळे दाण्याची प्रत खालावते. याशिवाय दाण्याची चकाकी कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे लवकरात लवकर परिपक्व पिकाची काढणी करुन पीक उन्हात वाळवावे. पीक जमिनीवर लोळत असेल तर यंत्राने काढणी करता येत नाही. त्यामुळे मजुरांकडून गव्हाची कापणी करावी. ज्याठिकाणी गव्हाची उशीरा पेरणी झालेली आहे. त्याठिकाणी फारसे नुकसान होणार नाही. दाणे अजून परिपक्व झाले नसतील तर पीक काढण्याची घाई करु नये.
हरभरा : ज्याठिकाणी हरभऱ्याची उशिरा पेरणी झालेली आहे, अशा हरभरा पिकाला हा पाऊस फायदेशीर आहे. काही ठिकाणी गारपीट आणि जोरदार पावसामुळे पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी पीक लवकरात लवकर पाण्याबाहेर काढावे. फुलोरा अवस्थेतील पिकावर ढगाळ हवामानामुळे ‘घाटेअळी’ चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी ‘घाटेअळी’ च्या नियंत्रणासाठी ‘इमामेक्टिन बेन्झोएट’ ५ मिली हे प्रमाण १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

आंबा : वादळीवाऱ्यासह जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी आंबा बागेत फळांची गळ झालेली आहे. अशी गळलेली फळे बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत; कारण या फळांमुळे बागेत ‘मीजमाशी’ , ‘फळ पोखरणारी अळी’ अशा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. ज्याठिकाणी फांद्या तुटलेल्या आहेत अशा ठिकाणी झाडाला १ टक्का बोर्डो द्रावण लावावे. ओलसर हवामानामुळे बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे बागेत ‘हेक्झाकोनॅझोल’ किंवा ‘प्रोपीकोनॅझोल’ किंवा ‘कार्बेन्डाझिम’ या बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी मिसळून आलटून-पालटून फवारणी घ्यावी.
संत्री, मोसंबी : संत्री, मोसंबी बागेमध्ये ‘आंबिया बहरा’ ची फळे गोटी आकाराची आहेत. पावसामुळे या फळांची गळ झालेली आहे. तर ‘मृग बहरा’ च्या काढणीयोग्य फळांचीही गळ झालेली आहे. पावसामुळे फळांवर काळे डाग पडून फळांची प्रत खालावते. अशी फळे गोळा करुन बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. ज्या शेतकऱ्यांनी ‘आंबिया बहार’ घेतलेल्या बागेत उशीरा ताण तोडला आहे अशा बागा फुलोरा अवस्थेत आहेत. अशा बागेत फुलगळ झालेली आहे. अशा बागेत ताबडतोब १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळता येईल.