सेंद्रिय शेतीसह गोवंश संवर्धन काळाची गरज
” विषजन्य कीटकनाशके व खतांच्या अतिवापरामुळे होत असलेले दुष्परिणाम टाळण्याकरिता सेंद्रिय शेती व पंचगव्य औषधीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे गोवंश संवर्धन करणे ही काळाजी गरज बनली आहे,” असा सूर अकोला येथे आयोजित चर्चासत्रात वैज्ञानिकांनी व्यक्त केला.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन मंडळ (आत्मा) व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या सभागृहात ‘पंचगव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती’ प्रशिक्षण कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर, भारतीय पशुकल्याण बोर्डाचे सदस्य सुनील मानसिंहका, आदर्श गोसेवा तथा अनुसंधान प्रकल्पाचे विवेक बिडवाई, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. जी. दिघे, प्रकल्प संचालक डॉ. प्रशांत कपले, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन मंडळाचे प्रकल्प संचालक आरीफ शाह आदी उपस्थित होते.
‘पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती’ प्रशिक्षण कार्यशाळेत पंचगव्य औषधी व गो-आधारित पदार्थांचे महत्त्व याबाबत वैज्ञानिकांनी मार्गदर्शन केले.
सुनील मानसिंहका म्हणाले, ‘‘रासायनिक खतांमुळे उत्पादनात वाढ झाली असली, तरी त्याचा परिणाम मानवी आरोग्य व जमिनीच्या सुपीकतेवर होत आहे. गायीपासून उत्पादित होणाऱ्या पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईलच; शिवाय निरोगी राहण्यास मदत होईल.”

डॉ. पोहरकर म्हणाले, “गो-आधारित संशोधनावर भर देण्याची आवश्यकता असून, यासाठी पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचा पुढाकार कौतुकास्पद आहे. पंचगव्य औषधीवर केलेले संशोधन नागरिकांपर्यंत पोहोचवा. आयुर्वेदिक शास्त्रात पंचगव्य औषधीचे महत्त्व सांगितले आहे. “
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक डॉ. प्रशांत कपले यांनी केले. सुत्रसंचालन मनीष इंगोले यांनी केले. डॉ. दिलीप बदुकले यांनी आभार मानले.
गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला ‘पंचगव्य’ म्हटले जाते.