या गावांमध्ये कधीच नसते होळी
होळी हा लहान मुलांसह मोठ्यांचाही आवडीचा सण आहे. भारताच्या विविध भागात होळी वेगवेगळ्या ढंगात साजरी केली जाते. मात्र, भारतात काही अशी गावे आहेत जिथे होळी खेळणे अशुभ मानले जाते. इथे रंगाने होळी खेळली जात नाही. उत्तराखंडमधील ‘पिथौरागढ’ जिल्ह्यात आजही होळीच्या रंगांना अशुभ मानले जाते. होळी खेळल्याने देवाचा कोप होईल, अशी समजूत येथील गावकऱ्यांमध्ये आहे.

उत्तराखंडमध्ये ‘पिथौरागढ’ जिल्ह्यातील ‘धारचूला’ आणि ‘मुसियारी’ क्षेत्रातील १०० गावे आजही होळी साजरी करत नाहीत. होळीच्या दिवशी गावातील सारेचजण सामान्य दिवसासारखे रोजचे काम करतात. या गावातील सारे रहिवाशी ‘छिपला केदार देव’ यांना दैवत मानतात. याची नित्यनियमाने पूजा करतात. ‘छिपला केदार देव’ हे भगवान शिव आणि भगवती यांचे एक रुप आहे. गावकरी या स्थानाजवळ एक प्रदक्षिणा घालतात व ‘छिपला केदार’ येथील कुंडात स्नान करतात. याला ‘गुप्त कैलाश’ असेही म्हटले जाते. ‘पिथौरागढ’ जिल्ह्यात असणाऱ्या १०० हून अधिक गावातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, रंगपंचमी खेळल्याने त्यांच्या देवाची जागा अपवित्र होईल. तर, ‘धारचुला’ येथील ‘अनवल समुदाय’ आणि ‘मुन्सियारी’ येथील ‘जोहार’ क्षेत्राचे ‘बरपतिया’ गावातील आदिवासी समाजात आजही होळीबाबत अनेक समजुती आहेत.

‘हरकोट’ गावात राहणारे खुशल हरकोटिया यांच्या म्हणण्यानुसार, रंगाचा सण असलेली होळी इथे अशुभ मानली जाते. काही लोकांच्या म्हणण्यानुसार, या भागात होळी खेळण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर संकट ओढवले आहे. तर, कोणाच्या कुटुंबातील सदस्यावर मृत्यू ओढावण्याची भीती यांना वाटते. कोणाच्या घरातील पशूधन चोरीला जाते. येथील स्थानिक गावकऱ्यांचा रंग खेळणे म्हणजे देवतेचा कोप होईल, असा समज आहे.
दरम्यान, इतिहासकार जयप्रकाश यांनी सांगितल्यानुसार, पहाडी राज्यांमध्ये होळी साजरी करण्याची परंपरा कधीच नव्हती. या राज्यांमधील दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांचा होळीवर फारसा विश्वास नाही. पहाडी राज्यांचा पर्यटनामुळे विकास झाल्याने इथे दुसऱ्या राज्यातील व्यक्तींशी संपर्क आला. त्यामुळे मुळ राज्यातील लोकांनी इतर रितीरिवाज आपलेसे केले; मात्र, अजूनही काही गावांमध्ये होळी अपवित्र मानली जाते.