पोषणमूल्यांनी समृद्ध पालक
‘पालक’ ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून या पिकाची लागवड वर्षभर करता येते. या भाजीला सतत मागणी असते. पालकातील पोषणमूल्ये लक्षात घेता पालकाची लागवड मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे.
पालकाच्या भाजीत ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच प्रथिने, कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी इत्यादीमध्ये करतात.
पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्यामुळे महाराष्ट्रात कडक उन्हाळ्याचे एक-दोन महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्पादन जास्त येऊन दर्जा चांगला राहतो. तापमान वाढल्यास पीक लवकर फुलो ऱ्यावर येऊन दर्जा खालावतो.

पालकाचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके घेऊ शकत नाहीत तेथे पालक घेता येते.
पालकाच्या ‘ग्रीन पुसा ज्योती’, ‘पुसा हरित’ या भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आलेल्या सुधारित जाती आहेत.
महाराष्ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळजवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून-जुलैमध्ये आणि रब्बी हंगामातील लागवड सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी १० ते १५ दिवसांच्या अंतराने बियांची पेरणी करावी.
पालक हे कमी दिवसात तयार होणारे पीक असल्यामुळे जमिनीच्या पोतानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी पेरावे. नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्यास वाफसा आल्यावर पेरणी करावी. बी ओळीत पेरताना दोन ओळीत 25-30 सेंटीमीटर अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्यास पिकाची वाढ कमजोर होवून पानांचा आकार लहान राहतो. पिकांचा दर्जा खालावतो.

पालक हे कमी कालावधीचे पीक असले तरी हिरव्या टवटवीत पानांवर पिकाचे उत्पादन व प्रतीक्षा अवलंबून असल्यामुळे पालकाच्या पिकाला नत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागतो. तसेच पिकाला पाण्याचा नियमित पुरवठा करुन जमिनीत ओलावा राखणे आवश्यक असते.
पालकाच्या पिकाला हेक्टरी 20 गाड्या शेणखत, 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत मिसळून द्यावे. स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे.
पानातील हिरवेपणा अधिक चांगला येऊन उत्पादन वाढविण्यासाठी बी उगवून आल्यानंतर 15 दिवसांनी आणि प्रत्येक कापणीनंतर 1.5 टक्के युरिया खत फवारावे. बियांच्या पेरणीनंतर लगेच पाणी द्यावे. वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्यानंतर पिकाला नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात पालकाच्या पिकाला 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. काढणीच्या 2-3 दिवस आधी पिकाला पाणी द्यावे. त्यामुळे पाने टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो.
पालकावर ‘मावा’, ‘पाने कुरतडणारी अळी’ आणि ‘भुंगेरे’ यांचा उपद्रव आढळतो.
पालकास मर रोग, पानांवरील ठिपके, तांबेरा आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. ‘मर’ रोगामुळे उगवण झाल्यावर रोपांची मर होण्यास सुरुवात होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा. पेरणीपूर्वी बियाण्यावर ‘थायरम’ या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. हवेतील आर्दता वाढल्यास पानांवर गोल करड्या रंगाचे बांगडीच्या आकाराचे डाग पडतात. या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
‘केवडा’ आणि ‘तांबेरा’ रोगांचा फारसा उपद्रव होत नाही. शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्यास या रोगांना आळा बसतो.
पेरणीनंतर सुमारे १ महिन्याने पालक कापणीला तयार होते. पालकाची पूर्ण वाढलेली हिरवी कोवळी पाने 15 ते 30 सेंटीमीटर उंचीची झाल्यावर पानांच्या देठाचा जमिनीपासून 5 ते 7.5 सेमी भाग ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्यावा. पानांच्या जुड्या बांधाव्यात. काढणीनंतर पालक लगेच बाजारात पाठवावा. जुड्या उघड्या जागेत रचून वरून झाकून घेऊन बांबूच्या टोपलीमध्ये अगर पोत्यामध्ये व्यवस्थित रचून विक्रीसाठी पाठवाव्यात. टोपलीच्या खाली आणि वर कडुनिंबाचा पाला ठेवल्यास पालक लवकर खराब होत नाही. वाहतुकीस जुड्यांवर अधूनमधून थंड पाणी शिंपडल्यामुळे पानांचा तजेलदारपणा टिकून राहतो. पाणी जास्त झाल्यास सडण्याची क्रिया सुरु होते. म्हणून जुड्यांवर जास्त प्रमाणात पाणी मारु नये.