
‘ताडोबा’ हा भारतातील महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात विसावलेला एक व्याघ्र प्रकल्प आहे. यामध्ये ‘ताडोबा राष्ट्रीय उद्यान’ आणि ‘अंधारी अभयारण्य’ समाविष्ट आहे. हे 1955 पासूनचे महाराष्ट्रातील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. नागपूर विमानतळावरून याचे अंतर 163 कि.मी., चंद्रपूर रेल्वे स्थानकापासून 36 कि.मी. व चंद्रपूर बसस्थानकावरुन 35 कि.मी. आहे.
ताडोबा राष्ट्रीय उद्यान पूर्व विदर्भातील शुष्क पानझडी वनांच्या पट्ट्यात चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ‘ताडोबा’ व ‘अंधारी’ राष्ट्रीय उद्यान राज्यातील जुन्या उद्यानांपैकी एक आहे. साधारणत: सातशे चौरस किलोमीटर संरक्षित जंगलक्षेत्रात ही उद्याने वसलेली आहेत.
ताडोबा अभयारण्य नैसर्गिक वनस्पती आणि जीवसृष्टीने समृद्ध आहे. येथे वाघ, बिबटे, चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, चिंकारा, काळवीट, ससे, रानमांजर यासारख्या प्राण्यांचा मुक्त संचार आढळतो.

ताडोबा अभयारण्यात जागोजागी पाणवठे आहेत. पाणवठ्यानजीकच ‘मचाणा’चीही व्यवस्था करण्यात आली असल्याने जीवसृष्टी अनुभवण्याचा अपूर्व आनंद येथे मिळतो. ताडोबा अभयारण्यात पर्यटन निवासस्थानांचीही व्यवस्था असल्याने निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. या भागातील जंगलात बांबूची वने मोठ्या प्रमाणात आहेत. मोहाची झाडेही भरपूर आहेत.
आदिवासींचा जीवनव्यवहार हा जंगलाशी जुळलेला असतो. अन्नापासून पेयापर्यंत सर्व जंगलाचे देणे असते. आदिवासी लोक मोहांच्या फुलापासून दारू काढून प्रसंगानुरूप मद्यपानाचा आनंद घेतात. या वनक्षेत्राचे ‘ताडोबा’ नावही आदिवासी संस्कृतीशीच जुळलेले आहे. त्यांचा देव ‘तरू’ यावरून ताडोबा नाव पडल्याचे मानण्यात येते. विस्तीर्ण वनांचे पट्टे व जैवविविधता या भागाचे वैशिष्ट्य आहे.
पर्यटकांसाठी येथे विश्रांतीगृह आहे. व्याघ्र प्रकल्प किंवा अभयारण्यात गेलो म्हणजे जंगलसफारी ओघानेच आली. येथे प्रशिक्षित मार्गदर्शक उपलब्ध आहेत. जंगलसफारीसाठी जवळपास दहा बारा जण बसतील अशी मिनीबसही असते.
ताडोबा तळ्याकाठी महाकाय वृक्षछायेत आदिवासींचे दैवत आहे. ये थे दरवर्षी पौष महिन्यात यात्रा भरते. येथूनच जवळ म्हणजे पाच किलोमीटरवर ‘पंचधारा’ स्थळही भेट देण्याजोगे आहे. निसर्गातून, विस्तीर्ण पसरलेल्या गवताळ प्रदेशातून फिरतानाच दाट जंगलातून चालण्याचा थरार अनुभवायचा असल्यास येथून फार दूर नसलेल्या ‘जामुनबादी’ पर्यंतची वाट तुडवायला हरकत नाही.
ताडोबास आपण रस्ते, रेल्वे व हवाई मार्गाने जोडले असल्याने आपल्या पसंतीनुसार प्रवास करून येथे सहज पोहचू शकता.