
छोट्या पडद्यावरून प्रसारित होणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका घरोघरी पोहोचली आहे. मालिकेतील सर्व कलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतः चे असे स्थान निर्माण केले आहे. मालिकेची नायिका अरुंधती, नकारात्मक भूमिका साकारणारा आशुतोष यांनी तर प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. ‘आई’ हा विषय केंद्रस्थानी असलेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या या मालिकेत अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नाचा सोहळा थाटामाटात साजरा होताना दिसत आहे. नवऱ्याने प्रतारणा केल्यानंतर त्याला घटस्फोट देऊन त्यानंतर स्वतःच्या पायावर उभी राहणारी अरुंधती महिला वर्गात लाडकी ठरली. आयुष्यातील कटू आठवणी मागे टाकत नव्याने आयुष्य जगण्याची उभारी घेणारी अरुंधती तिच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या आशुतोषशी लग्न करण्याचा निर्णय घेते. तिच्या या निर्णयाला तिचे सासरे, नणंद आणि दीर खंबीरपणे पाठिंबा देतात. इतकेच नाही तर थोरली सून, मधला मुलगा आणि धाकट्या लेकीचीही अरुंधतीला साथ आहे.
मालिकेच्या कथानकात सध्या अरुंधतीचे थाटामाटात होणारे लग्न दाखवले जात आहे. या लग्न सोहळ्यावरून समाज माध्यमावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मालिकेतील अरुंधतीच्या लग्नाचा प्रोमो समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी अरुंधतीच्या या निर्णयाचे आणि लग्न साजरा करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. काहींनी त्यावर आक्षेप घेत नाराजी नोंदवली आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांच्या ‘कमेंट’ मध्ये मालिकेचे निर्माते, लेखकाचे अभिनंदन केले. मालिकेत जरी अरुंधतीने दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय घेतल्यानंतर अनेक भावनिक पातळीवर तिला मोठा संघर्ष करावा लागला. तसेच समाजमाध्यमावरदेखील विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या सर्वांवर अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने तिची प्रतिक्रिया समाजमाध्यमावर व्यक्त केली. अरुंधतीच्या दुसऱ्या लग्नाबाबत होणारी चर्चा पाहून ही भूमिका साकारणाऱ्या मधुराणीने तिचे विचार मांडले आहेत.

मधुराणीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘अरुंधतीचे लग्न व्हावे की नाही? या वयात लग्न करावे का? केले तर ते इतके साजरे करावे का? अशी विविध स्तरावर समाजात चर्चा झाली. अनेकांना यात आनंद होत आहे, तर काहीजणांना मान्य होत नाही. पण मला नक्की असे वाटते की, कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ वयात होते किंवा दुसरेपणाचे आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावे असे का? लग्न आहे ते.. साजरे करावे.’ या पोस्टमध्ये मधुराणीने मालिकेचे निर्माते आणि वाहिनीचेदेखील आभार मानले आहेत. तिने लिहिले की, ‘हा इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे स्टार प्रवाहचे आणि आमच्या प्रकल्प प्रमुख नमिता नाडकर्णी आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे.’
खरे तर आईने दुसरे लग्न करणे हा विचार आजही अनेकांच्या पचनी न पडणारा आहे. महिलांना आजही त्याच ठराविक आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही. या मानसिकतेवर मालिकेत नेमकेपणाने भाष्य केले आहे.