
अभिषेक रॉय चौधरीचा नवा ‘लॉस्ट’ हा चित्रपट वेगळ्या वाटेवरून जाणारा आहे. संपूर्ण देशात रोज कोण ना कोण हरवतो. काहींचा शोध लागतो, तर काही बराच काळ ‘बेपत्ता’ राहतात. अशाच एका बेपत्ता व्यक्तीच्या शोधाची गोष्ट ‘लॉस्ट’ मांडतो.
नाटकाचे वेड असलेला एक युवक अचानक बेपत्ता होतो. बेपत्ता झाल्यानंतर त्याच्यावर पोलिस वेगवेगळे आरोप लावतात. मात्र, त्यामागचे खरे कारण काय, याचा शोध एक पत्रकार घेते, त्याची ही गोष्ट आहे.
गोष्ट अतिशय सशक्त आहे. स्वत:च्या स्वार्थापोटी सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याची फरफट कोणत्या पद्धतीने होते, याचे अतिशय समर्पक चित्रण आहे. मात्र, चित्रपटाची मांडणी काहीशी संथ आणि फसलेली आहे. त्यातील अनेक ‘सरप्राइज एलिमेंट’ लवकरच खुले होत असल्याने आणि काही प्रश्नांची उत्तरे अर्धवट राहिल्याने एका बेपत्ता व्यक्तीच्या शोधाची ही गोष्ट अर्धवट झाली आहे.

चित्रपटाची गोष्ट कोलकात्यात घडते. बंगाली ‘चमू’ मुळे चित्रपटाचा लूक बंगाली आहे. ईशान भारती (तुषार पांडे) हा युवक घरातून बेपत्ता झाला आहे. अंकिता (पिया वाजपेयी) नावाच्या एका मुलीवर त्याचे प्रेम आहे. राजन वर्मन (राहुल खन्ना) हा त्या भागातील एक शक्तिशाली राजकारणी आहे. ईशान घरातून बेपत्ता झाल्यानंतर तो एका नक्षलवादी गटाशी संबंधित असल्याचा ठपका पोलिस ठेवतात आणि ईशानच्या कुटुंबाचा तपास सुरू होतो. ‘गुन्ह्यासंबंधी पत्रकारिता’ करणाऱ्या आणि आजोबांसोबत (पंकज कपूर) राहत असलेल्या विधी सहानीला (यामी गौतम) या ‘बेपत्ता प्रकरणा’ मध्ये काही वेगळे असल्याचे जाणवते आणि हे प्रकरण खणून काढण्याचे ती ठरवते. आता ईशानचा नक्की इतिहास काय आहे? तो आणि अंकिता यांच्यातील संबंध नक्की कसे आहेत? या प्रकरणात राजनचा ‘हेतू’ काय आहे? नक्षलवादी चळवळीशी ईशानचा नक्की काय संबंध आहे? ईशान नक्की कोठे आहे आणि त्याच्यासोबत कोणत्या गोष्टी झाल्या, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘लॉस्ट’ हा ‘झी फाइव्ह’वर प्रदर्शित झालेला सिनेमा बघायला हवा.