
प्रसिद्ध लेखक, कवी आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील नावाजलेले नाव आहे. नाटक, मालिका, सिनेमे या तीनही माध्यमातून त्याने आपल्या कलेची चुणूक दाखवून दिली. सध्या संकर्षण ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात काम करीत आहे. समाजमाध्यमावर बऱ्यापैकी सक्रीय असणाऱ्या संकर्षणने नाटकाच्या प्रयोगानंतर घडलेला किस्सा सांगितला.
पुण्यातील ‘तू म्हणशील तसं’ प्रयोग झाल्यानंतर अनेक रसिक अभिनंदन करण्यासाठी कलाकारांना भेटले. रसिकांच्या कौतुकाच्या थापेने कलाकारांचे मनोबळ अजून वाढते. नुकतेच या नाटकाचे ३०० प्रयोग झाले. प्रयोग झाल्यानंतर एक काका- काकू खास संकर्षणला भेटायला गेले. त्यांनी या अभिनेत्याला जे सांगितले ते कायमस्वरुपी संकर्षणसोबत राहील, यात काही शंका नाही. संकर्षणला जेव्हा ते दाम्पत्य भेटले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच खूप काही सांगून जात होता.

संकर्षणने आपला अनुभव सांगताना लिहिले की, ‘प्रयोगानंतर एक काका-काकू माझ्याकडे आले आणि म्हणाले, ”आम्ही अशोक सराफ , लक्ष्मीकांत बेर्डे , प्रशांत दामले या सगळ्यांची नाटके पाहत आलोय.. त्यांची कामे पाहताना सकारात्मक उर्जा जाणवायची आणि अजूनही जाणवते. विशेष म्हणजे तीच उर्जा तुझ्या कामात आणि तुझ्या उपस्थितीत जाणवते, ती टिकवून ठेव आणि खाऊसाठी हे ५०० रुपये घे. मी ते घेत नव्हतो पण शेवटी त्यांचा आग्रह मला मोडवला नाही. आई-बाबा खाऊसाठी पैसे देतात, अगदी तसेच ४०० रुपयांचे तिकिट काढून परत वेगळे खाऊचे ५०० रुपये द्यावे, असे वाटणे ही फार मोठी गोष्ट आहे. सोबतच मोठ्या मनाने दिलेली दाद आहेच. तुम्ही ‘मायबापच’ आहात. अशाच शुभेच्छा कायम ठेवा..”
दरम्यान ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाबद्दल सांगायचे झाले तर प्रसाद ओक दिग्दर्शित या नाटकात संकर्षण कऱ्हाडे आणि काजल काटे मध्यवर्ती भूमिकेत आहेत. प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनने या नाटकाची निर्मिती केली आहे. स्वतः संकर्षण या नाटकाचा लेखकही आहे.