जमीन संवर्धनाकडे दुर्लक्ष नको
जमीन हा निसर्गातील सर्वांत महत्त्वाचा आणि श्रेष्ठ घटक आहे. कोणत्याही सजीवाची नवनिर्मिती. घडण जमिनीतून होते आणि शेवटही जमिनीवरच होतो. म्हणूनच सर्व सजीवांच्या जीवनचक्रामध्ये जमिनीला जास्त महत्त्व दिले जाते.

सजीवांसाठी अन्न, वस्त्र आणि निवारा देण्याचे कार्य जमीन करते. म्हणूनच जमिनीचा उल्लेख ‘माता’ म्हणून केला जातो. सजीवांना निरोगी जगण्यासाठी स्वच्छ हवा, पाणी आणि एकूणच पर्यावरण चांगले ठेवण्यासाठी जमिनीचा मोलाचा वाटा आहे. जमीन निसर्गातील सर्व सजीवांचे अवशेष आपल्या पोटामध्ये घेऊन त्यांच्यावर प्रक्रिया करून पर्यावरणाला कोणताही धोका निर्माण होऊ देत नाही. सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी जास्त झाल्यानंतर निसर्गातील तापमानाला नियंत्रण करण्याचे काम जमीनच करते. पर्यावरणामध्ये पाण्याचे बाष्पीभवन होत असताना कोणतेही घातक द्रव्य व क्षार पर्यावरणात न पाठविता आपल्या शरीरातच ठेवून पर्यावरण शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा अनेक घटनांमध्ये जमिनीचा मोलाचा वाटा आहे. सर्व सजीव निसर्गातून जेवढा फायदा घेतात, त्याच प्रमाणात निसर्गाची परतफेड करतात. मानवजात निसर्गाचा अनेक पटीने फायदा घेत असते; म्हणूनच मानवावर निसर्ग रक्षणाची जास्त जबाबदारी आहे. आज मानवाच्या वाढत चाललेल्या गरजा आणि वाढलेल्या स्वार्थी स्वभावामुळे जमीन आणि पर्यावरणाची योग्य काळजी घेण्याचा विसर मानवाला पडत चालला आहे.

पर्यावरणातील वाढत चाललेल्या कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण, जमिनीची ढासळलेली प्रत आणि वृक्षांची कमी होत चाललेली संख्या यामुळे तापमानात वाढ होत आहे. जमिनीमध्ये २५ टक्के हवा, २५ टक्के पाणी, ४५ टक्के खनिजे आणि ५ टक्के सेंद्रिय पदार्थ असेल तर ती जमीन सर्वांत उत्तम मानली जाते. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा वापर वाढून सेंद्रिय खतांचा वापर कमी झाला. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी होऊन खनिजांचे प्रमाण वाढले. ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असते त्या जमिनी त्यांच्यावर पडलेला सूर्यप्रकाश शोषून घेऊन निसर्गातील तापमान नियंत्रित करण्यास मदत करतात; परंतु सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी होऊन खनिजांचे प्रमाण वाढले. त्यामुळे जमिनी कडक-टणक झाल्या. त्यांच्यामध्ये सूर्यप्रकाश ग्रहणाची क्रिया कमी होऊन परावर्तित होण्याचे प्रमाण वाढले. क्षारयुक्त-खनिजयुक्त जमिनी वाढलेल्या सूर्यप्रकाशामुळे लवकर तापतात. पर्यावरण शुद्ध ठेवण्यासाठी कुजण्याची क्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. या कुजण्याच्या क्रियेमध्ये जमिनीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. निर्जीव जमिनीमध्ये कुजण्याची क्रिया होत नाही; कारण ज्या जमिनीत जीव-जिवाणू, गांडुळ व इतर भूचर प्राणी आहेत, तेथेच कुजण्याची क्रिया चालते. म्हणजेच सजीव, जमीन आणि सजीवांचे अवशेष कुजण्याची क्रिया यांचा जवळचा संबंध आहे. कोणत्याही सजीवांचे अवशेष जमिनीवर किंवा जमिनीत मिसळले तर जमिनीतील हा फौजफाटा लगेच कामाला लागून ते कुजवून पर्यावरण स्वच्छ ठेवतो. तसेच त्यापासून घातक घटकांचे रूपांतर पिकाला-जमिनीला आवश्यक असलेल्या उपयुक्त अन्नद्रव्यामध्ये करतात. ही सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने चालू असते. त्यासाठी मानवाला खर्च करावा लागत नाही, किंवा वेळ देऊन नियोजन करून कामही करून घ्यावे लागत नाही. मानवाने निसर्गामध्ये जास्त ढवळाढवळ केल्यामुळे या प्रक्रियेत बाधा येऊन निसर्गाचे संतुलन बिघडले आहे.
म्हणून, वेळीच जमिनीचे महत्त्व ओळखावे.