
सह्याद्रीच्या पोटात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे दडलेली आहेत. उंच डोंगर, खोल दऱ्या, नागमोडी वळणे घेत वाहणाऱ्या नद्या, उंचावरून कोसळणारे धबधबे, घनदाट जंगल, वन्य प्राण्यांचा मुक्त संचार इत्यादी गोष्टींमुळे सह्याद्री जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतो. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असेच एक ठिकाण अर्थात नाणेघाट ! नाणेघाट हे पुण्यातील जुन्नरजवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आहे. हे मुंबईपासून तीन तासांच्या अंतरावर आहे.
उलट्या धबधब्यासाठी हा घाट जगभर प्रसिद्ध आहे. त्याचे सौंदर्य विशेषतः पावसाळ्यात पाहण्यासारखे आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येतात. हिरव्यागार वनराईने नटलेल्या उंचच उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या फेसाळ धबधब्याची दिशाच वाऱ्याच्या दाबामुळे बदलल्याचे मनोहारी दृश्य दिसते. या धबधब्यातील पाणी सुरुवातीला खालच्या दिशेने कोसळते; परंतु पुढच्याच क्षणी वारा ते पाणी पुन्हा वर नेतो. थोडक्यात हा उलटा धबधबा असल्याचाच भास होतो.

अर्थात, हा काही एकमेव उलटा धबधबा महाराष्ट्रात पहायला मिळत नाही, तर सावंतवाडी तालुक्याच्या आंबोली गावात देखील ‘कावळेसाद’ हा धबधबा आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट तिच्या सान्निध्यात राहते. जरी एखादी वस्तू उंचीवर फेकली तरी ती गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर येते. नाणेघाटातील धबधबा देखील गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचे पालन करतो; परंतु नाणेघाटच्या धबधब्याचे स्वतःचे नियम आहेत.
वास्तविक हा धबधबा घाटाच्या उंचीवरून खाली येण्याऐवजी वर येतो. याच कारणामुळे या धबधब्याला ‘उलटा धबधबा’ म्हणतात. नाणेघाटातील धबधब्याचे पाणी खाली पडते, परंतु खालून येणाऱ्या वाऱ्याचा दाब हा प्रचंड जास्त असतो. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नाणे घाटातील धबधब्याचे पाणी पुन्हा वर येते. त्याच्या वैशिष्ट्यामुळे हा धबधबा लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिथून खालच्या दरीत नाणे जरी फेकले, तरी ते हवेच्या किंवा वार्याच्या तीव्र दाबामुळे वर येते. ‘वाऱ्याच्या वेगाची तीव्रता गुरुत्वाकर्षणाच्या बलाएवढी किंवा त्याहून जास्त असते तेव्हा असे घडते.’