Warning: Trying to access array offset on false in /home/sahyadrimarathi/newsite.sahyadrimarathi.com/wp-content/themes/vividly/inc/custom-functions.php on line 498

रत्नागिरीतील प्राचीन सूर्यमंदिर

रत्‍नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ‘कशेळी’ गावामध्ये श्री देव कनकादित्य मंदिर हे प्रसिद्ध सूर्यमंदिर आहे. ‘कशेळी’ गाव रत्‍नागिरी बस डेपोपासून दक्षिणेस अंदाजे ३६ किलोमीटरवर आहे. पावस बस डेपोपासून दक्षिणेस २१ किलोमीटरवर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस ३२ किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यांत वसलेले आहे.

‘आदित्य’ म्हणजे सूर्यनारायण आणि संपूर्ण भारतात फारच थोडी सूर्यनारायणाची मंदिरे आहेत. ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) ‘वेरावळ’ बंदराजवळ ‘प्रभासपट्टण’ येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. ‘प्रभासपट्टण’ म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे वसतिस्थान होय

अल्लाउद्दीन खिलजी १२९३ मध्ये सौराष्ट्रावर चाल करून आला. त्यावेळी ‘प्रभासपट्टण’च्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या, जे बारा महिन्यांचे प्रतिक होते.
परकीय हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्याने तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या ‘वेरावळ’च्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्त्या चढविल्या. तो व्यापारी त्या मूर्त्या घेऊन दक्षिणेकडे निघाला. ‘येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू या मूर्त्या परत घेऊन ये,’ अशी सुचना पुजाऱ्याने व्यापाऱ्याला दिली होती.

ते गलबत ‘कशेळी’ गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले; आणि काही केल्या पुढे जाईना व कारणही समजेना. भरपूर प्रयत्न केले पण जहाज काही जागचे हलेचना. शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एकच मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज पुढे मार्गस्थ होऊन रवाना झाले.

‘कशेळी’ गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका रहात होती. तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्य मूर्ती आली. भगवान श्री देव सूर्यनारायण कनकेला म्हणाले की, “तू मला त्या गुहेतून बाहेर घेऊन ये. तुझ्या गावातच एक मंदिर बांधून त्यात माझी स्थापना कर.”

कनकाबाईने ही हकीकत कशेळीच्या ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थांच्या मदतीने श्री देव सूर्यनारायणाची मूर्ती गावात आणली जाऊन साग्रसंगीत स्थापना केली गेली. त्या कनकाबाईमुळे घडले म्हणून त्या सुर्यनारायणाला ‘कनकेचा आदित्य’ म्हणून ‘कनकादित्य’ असे नाव दिले गेले. तेव्हापासून त्या मंदिराला ‘श्री देव कनकादित्य मंदिर’ असे नाव पडले.

किनाऱ्यावर ज्या गुहेत कनकादित्याची मूर्ती सापडली, त्यास ‘देवाची खोली’ म्हणतात. गावातील कोणी माहितगार बरोबर असेल तर येथे न चुकता पोहोचता येते.

समुद्रापासून साधारण १५ फुट उंचीवर काळ्या पाषाणात ही नैसर्गिक गुहा आहे. जवळजवळ 300 माणसांहून अधिक माणसे बसू शकतील एवढी मोठी ही गुहा आहे.

फडणवीस सरकारच्या ५ वर्षांतील कालखंडात महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातर्फे सूर्यास्त पाहण्यासाठी अत्यंत उत्तम व्यवस्था केली आहे. दिवसाच्या कोणत्याही वेळी या पॉईंटवर जायला हरकत नाही; पण सकाळी उजाडल्यापासून ते साधारणपणे १० पर्यंत आणि सायंकाळी ४.३० पासून ते सूर्य प्रकाश असेपर्यंत भेट देण्याने निसर्गाची अप्रतिम अनुभूती अनुभवायला मिळते.

भरती असो वा ओहोटी खाली उतरून समुद्राच्या लाटांशी खेळण्याचे धाडसही करू नये. याठिकाणी आल्यावर या गुहेची भव्यता लक्षात येते, पण अतिउत्साही भक्तांनी, पर्यटकांनी नाहक धाडस करू नये. येथे जाऊन परत येणे अत्यंत अवघड असून धोकादायक देखील आहे.

हे मंदिर साधारण ९०० वर्षे प्राचीन आहे. पूर्णतः अस्सल कोकणी कौलारू स्थापत्य शैली येथे पहायला मिळते.

मंदिराचे अंतरंग खूपच सुंदर असून लाकडी खांबावर नक्षी व वेलबुट्टी केलेली आहे. मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर विविध देव-देवता लाकडावर कोरलेल्या आढळतात.

प्रामुख्याने श्री कार्तिक, श्री वरूण, भगवान श्रीकृष्ण, श्री वायूदेव, श्री अग्निनारायण, भगवान, श्री शेषशायी विष्णू तसेच समुद्रमंथन आणि दशावतार असे पौराणिक कथा प्रसंग चित्रीत केले आहे.

रथसप्तमी उत्सव हे येथील खास आकर्षण आहे. कनकादित्य मंदिरात रथसप्तमी उत्सव माघ शुद्ध सप्तमी ते माघ शुद्ध एकादशी असा एकूण पाच दिवस असतो. कशेळी आणि आसपासच्या गावातील सर्वात महत्त्वाचा उत्सवाचा हा काळ आहे. रथसप्तमी उत्सवात सर्वात आकर्षण म्हणजे श्री देव कनकादित्य आणि श्री कालिकादेवी यांचा लग्नसोहळा अगदी आवर्जून बघण्यासारखा सोहळा असतो.

श्री कालिकादेवी ही ‘कशेळी’ गावापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या का लिकावाडीची असून श्री कालिकादेवीला धरून एकूण सहा बहिणी आहेत. कालिकादेवी, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, भगवतीदेवी आणि जाखादेवी ! या सर्व देवी ‘कशेळी’ गावाच्या आसपासच्याच आहेत. यात सर्वात प्रसिद्ध ‘अडिवरे’ तील महाकाली मंदिर अगदी आवर्जून पाहण्यासारखे आहे.

श्री कालिकादेवी ही या सर्व बहिणींत धाकटी आहे. श्री महालक्ष्मी, श्री महाकाली, श्री महासरस्वती आणि श्री भगवतीदेवी ह्या श्री कालिकादेवीला श्री जाखादेवी साठीवर संशोधन करायला पाठवितात: परंतु श्री देव कनकादित्यांना पाहताक्षणी श्री कालिकादेवी श्री देव कनकादित्याच्या प्रेमात पडते; आणि श्री देव कनकादित्यही श्री कालिकादेवीच्या प्रेमात पडतात.मग पुढे त्यांचे लग्न ठरते. श्री जाखादेवीला आपल्या धाकट्या बहिणीचा खूप राग येतो आणि ती तिचे तोंड न बघण्याची प्रतिज्ञा करते आणि लग्नालाही उपस्थित राहत नाही.

रथसप्तमी उत्सवात लग्नसोहळ्या प्रसंगी मोठी बहीण श्री महाकाली देवीला मानाचे सरंजाम पाठवले जातात. श्री भगवतीदेवी पाठराखण म्हणून येते. श्री कालिकादेवीची पालखी ज्यावेळी ‘कशेळी’कडे श्री देव कनकादित्य मंदिराकडे जात असते, त्यावेळी वाटेत श्री जाखादेवीचे मंदिर लागते. मंदिरासमोरून पालखी जात असताना श्री जाखादेवी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. कारण, असे म्हणतात, जाखादेवीने आयुष्यभर कालिकादेवीचे तोंड न बघण्याची प्रतिज्ञा केली होती. या कारणांनी अजूनही ही प्रथा पाळली जाते.

या लग्न सोहळ्याचे अजून एक खास वैशिष्ट्य म्हणजे ‘हुंडा पद्धत’ होय. सर्वसाधारणपणे सगळीकडे मुलीकडील मंडळी मुलाकडच्या मंडळींना हुंडा देतात. पण येथे उलट आहे. मुलाकडच्या म्हणजे श्री देव कनकादित्यकडील मंडळींनी वधूकडील म्हणजेच कालिकादेवीच्या मंडळींना हुंडा म्हणून शिधा द्यावा लागतो.
कनकादित्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या शेजारील विहरीवर हात-पाय धुऊन आत जाण्याची प्रथा आहे. या विहिरीवर पाणी काढण्याची जुनी कोकणी पद्धत पहायला मिळते.

मंदिरात कमालीची स्वच्छता असून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी विश्वस्तापैकी कुणी उपस्थित असेल तर हसतमुखाने तुमचे स्वागत करतात. जे इतरत्र सहसा पहायला मिळत नाही. देवासाठी चांदीचा रथ असून तो अत्यंत देखणा आहे. तो फक्त उत्सवाच्या वेळीच पहायला मिळतो. मंदिराचे सभामंडप आणि मंदिरावरील कळसावर तांब्याचा पत्रा मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखतात ते नाना शंकरशेठ यांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून बांधून दिले.

श्री देव कनकादित्य मंदिराच्या छतावर ज्या विविध देव-देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत त्यात अग्निनारायणाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून या मूर्तीला सात हात, तीन पाय आणि दोन मुखे आहेत. अग्निनारायण म्हणजे अग्नी. घरातील अग्नीचे स्थान म्हणजे स्वयंपाकघरातील चूल. चूल मांडायची ती तीन दगडांवर म्हणजे पायावर म्हणून तीन पाय. चुलीची अग्निमुखे दोन आहेत. एक चुलीचे दुसरे वेलाचे म्हणून दोन मुखे. आणि दोन्ही मुखांवर भांडे ठेवण्यासाठी जे छोटे छोटे उंचवटे असतात. त्यांमध्ये वैलाचे चार व चुलीचे तीन असे मिळून सात म्हणून सात हात आहेत. संपूर्ण चुलीची जी रचना व तिचे प्रतिकात्मक रूप या अग्निनारायणाच्या मूर्तीत सामावले आहे. अशा प्रकारची मोठी अग्नीनारायणाची मूर्ती रत्‍नागिरी शहरातील सत्यनारायण मंदिरात पहायला मिळते.

श्री देव कनकादित्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याअगोदर दरवाजाच्या वर शेषशायी विष्णूची लाकडात कोरलेली मूर्ती पहायला मिळते. एवढी मोठी आणि तीही लाकडात अन्यत्र पाहयला मिळत नाही. या मूर्तीजवळ गरूड आणि लक्ष्मी आहे. तसेच या मूर्तीच्या वरील बाजूस दशावतार कोरलेले आहेत.

प्रत्यक्ष कनकादित्याची काळ्या पाषाणातील मूर्ती अत्यंत सुबक आणि देखणी आहे. या मूर्तीचे पूर्णरूप पहायचे असेल तर पहाटेच्या पूजेच्या वेळी पहायला मिळते; जे आवर्जून पहाण्यासारखे आहे.

श्री देव कनकादित्य मंदिरात सुमारे ८५० वर्षापूर्वीचा ताम्रपट आहे. सध्या सुरक्षिततेच्या कारणामुळे बॕकेच्या लाॕकरमध्ये ठेवण्यात आला आहे. तीन जाड पत्रे एका कडीत ओवलेले हे ताम्रपट आहेत.

पहिल्या पानावर गाय, वासरू, तलवार आणि चंद्र-सूर्य कोरलेल्या आहेत.
या दानपत्रात द्वितीय भोजराजाचा ४४ ओळींचा संस्कृत लेख कोरलेला आहे, तसेच शिलाहार राजांची वंशावळ दिली आहे. तिसऱ्या पानाच्या मागील बाजूस मराठीत एक लेख आहे पण तो अस्पष्ट आहे.

या ताम्रपटात शिलाहार वंशीय द्वितीय भोजराजाने ‘अट्टविर’ ( आत्ताचे अडिवरे ) भागातील ‘कशेळी’ गाव बारा ब्राम्हणांच्या प्रतिदिन भोजनासाठी दान दिले, असा उल्लेख आढळतो.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *