कोवळी काकडी
काकडी हे भारतीय पीक असल्याने सर्व देशभर याची लागवड केली जाते. कोकणासारख्या अतिपर्जन्याच्या प्रदेशात देखील पावसाळी हंगामात काकडीचे भरपूर उत्पादन निघते. काकडीपासून कोशिंबीर बनविली जाते. त्यामुळे या वेलवर्गीय भाजीचा आहारामध्ये दररोज उपयोग होतो. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 3711 हेक्टरवर या पिकाची लागवड होते. काकडी हे उष्ण आणि कोरड्या हवामानात वाढणारे पीक आहे. पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास योग्य असते.काकडीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामात होते. खरीप हंगामासाठी काकडीची लागवड जून – जुलै महिन्यात व उन्हाळी हंगामामध्ये जानेवारी महिन्यात करतात.

‘शीतल वाण’ ही जात डोंगरउताराच्या हलक्या आणि जास्त पावसाच्या प्रदेशात चांगली वाढते. बी पेरणीपासून 45 दिवसांनी फळे चालू होतात. फळे रंगांने हिरवी व फिकट हिरव्या रंगाची असतात. कोवळ्या फळांचे वजन 200 ते 250 ग्रॅम असते. हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते. ‘पुना खिरा’ या जातीमध्ये हिरवे आणि पिवळट-तांबडी फळे येणारे दोन प्रकारचे बियाणे बाजारात मिळते. ही लवकर येणारी जात असून फळे आखूड असतात. ही जात उन्हाळी हंगामात चांगली असून हेक्टरी उत्पादन 13 ते 15 टन मिळते. ‘प्रिया’ ही संकरीत जात असून फळे रंगाने गर्द हिरवी व सरळ असतात. हेक्टरी उत्पादन 30 ते 35 टन मिळते. ‘पुसा संयोग’ ही लवकर येणारी जात असून फळे हिरव्या रंगाची असतात. हेक्टरी उत्पादन 25 ते 30 टन मिळते. याशिवाय ‘पॉंइंट सेट’, ‘हिमांगी’, ‘फुले शुभांगी’ यासारख्या जाती लागवडीस योग्य आहेत.

या शेतीसाठी उभी-आडवी नांगरणी करुन ढेकळे फोडून काढावी. शेतात चांगले कुजलेले 30 ते 50 गाड्या शेणखत टाकावे. उन्हाळी हंगामासाठी 60 ते 75 सेमी अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. खरीप हंगामात कोकण विभागात काकडीची लागवड करावयाची असल्यास दर 3 मीटर अंतरावर 60 सेमी रूंदीचे 30 सेमी खोलीचे चर खोदावेत. चरांच्या दोन्ही बाजूंना 90 सेमी अंतरावर 30 × 30 × 30 सेमी आकाराचे खड्डे तयार करावेत. प्रत्येक खड्ड्यात 2 ते 4 किलो शेणखत मिसळावे. प्रत्येक आळ्यात 3 ते 4 बिया योग्य अंतरावर लावाव्यात.
काकडीच्या वेलांना आधार दिल्यास फळांची प्रतीक्षा सुधारते; परंतु ते खर्चिक असल्याकारणाने महाराष्ट्रामध्ये काकडीचे पीक जमिनीवर घेतले जाते. लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी पिकातील गवत काढून टाकावे. फळे लागल्यानंतर फळांचा संपर्क मातीशी येऊ नये म्हणून फळांखाली वाळलेल्या काटक्या घालाव्यात.फळे कोवळी असतानाच काढणी करावी; म्हणजे बाजारात चांगला भाव मिळतो. काकडी पिकास हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो पालाश, 50 किलो स्फूरद लागवडीपूर्वी द्यावे. लागवडीनंतर 1 महिन्याने नत्राचा 50 किलोचा दुसरा हप्ता द्यावा. पावसाळ्यात 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळ्यात 4 ते 5 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. काकडीची तोडणी दर दोन ते तीन दिवसांच्या अंतराने करावी. जाती व हंगामानुसार काकडीचे हेक्टरी 200 ते 300 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.