जपानमधील नवी विवाह पद्धत

लग्न हे सात जन्मांचे बंधन असते, असे आपल्याकडे मानले जाते. सप्तपदी घेतल्यानंतर त्या व्यक्ती सात जन्मांसाठी एकमेकांच्या होतात. एकत्र राहणे, खाणेपिणे, हिंडणे अशा सर्व गोष्टी एकमेकांच्या साथीनेच केल्या जातात; पण जपानमध्ये सध्या लग्नाचा असा ‘ट्रेंड’ सुरू आहे, ज्यामध्ये केवळ ‘वीकेंड’ पुरतेच लग्नाचे बंधन असते. तेथे लग्नाचे बंधन फक्त शनिवार आणि रविवारपुरते असते. त्यानंतर आठवडाभर पती-पत्नी एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे राहून आपले-आपले आयुष्य जगतात. सध्या हा ‘ट्रेंड’ जपानमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. या पद्धतीचा अवलंब करून जोडप्यांना वैयक्तिक जीवनाचाही आनंद घेता येतो.

हे असे लग्न आहे, जे केवळ शनिवार-रविवार असे दोन दिवस वैध असते. यामध्ये लग्न झालेली ही जोडपी शनिवार-रविवार एकमेकांसोबत राहतात. आठवड्याचे उरलेले दिवस ते एकमेकांपासून दूर राहतात, जसे ते लग्नापूर्वी राहत होते. लग्नानंतर वैयक्तिक एकांत मिळत नाही, असा बऱ्याच लोकांचा समज आहे, याच पार्श्वभूमीवर, ही नवी पद्धती प्रचलित झाली आहे. त्यामुळे दोन्ही जोडीदार आनंदी राहतात. जोडीदारांमध्ये प्रेमही वाढल्याचे दिसून येते. ज्या लोकांचे व्यवसाय, नोकरी एकमेकांपेक्षा वेगळे आहेत, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. बहुतेकांचे कामाचे तास देखील एकमेकांसारखे नसतात आणि नोकरीचे ठिकाण देखील एकमेकांपासून दूर किंवा दुसर्‍या शहरात असते. अशी जोडपी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एकत्र राहून सहजीवनाचा आनंद घेऊ शकतात.

अनेकदा असे घडते की अनेक व्यक्तींची अथवा जोडप्यांची जीवनशैली एकमेकांपेक्षा खूप वेगळी असते. अशा परिस्थितीत जेव्हा दोघेही वेगवेगळे राहतात, तेव्हा ते स्वतःच्या अटींवर आयुष्य जगू शकतात. याशिवाय वेगळे राहिल्याने भांडण होण्याची शक्यताही बऱ्याच अंशी कमी होते. अनेकदा जोडपी एकत्र राहतात, तेव्हा दोघेही एकमेकांचे दोष खूप जवळून पाहतात. अशा परिस्थितीत भांडणे आणि वाद सुरू होतात; परंतु ही नवी पद्धती या सर्व समस्या दूर करू शकते, असे येथील तरुणांना वाटते.

जपानमधील लोकांचा असा विश्वास आहे, की या विवाहामुळे ते त्यांच्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. आठवड्याच्या शेवटी कौटुंबिक वेळ घालवून ते आठवड्याभरातील तणाव कमी करतात. याचा महिलांना अधिक फायदा होतो. महिला स्वतःसाठी वेळ काढू शकतात. घरचे तणाव टाळून, नवऱ्याची काळजी घेऊन स्वत:लाही वेळ देऊ शकतात.येथील लोकांचा असाही विश्वास आहे, की जेव्हा तुम्ही बराच काळ दूर राहता; आणि आठवड्यातून एकदा जवळ येता तेव्हा तुमच्याकडे एकमेकांना सांगण्यासाठी खूप काही असते. चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी एकमेकांना सांगण्यास उत्सूक असता. अशा प्रकारे राहिल्याने एकमेकांसोबत एकत्र उत्तम वेळ घालवता येतो. तसेच अशा प्रकारे एकमेकांची जवळीक अनुभवायला मिळते. नात्यात गोडवा वाढतो.

आजच्या युगात लोक खूप मुक्त विचारांचे आहेत. त्यामुळे घटस्फोटाच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक वेळा पती-पत्नीला एकमेकांची संगत आणि एकमेकांचा हस्तक्षेप आवडत नाही. अशा परिस्थितीत जपानचे लोक लग्न दीर्घकाळ टिकविण्यासाठी हा फंडा अवलंबत आहेत.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *