पारंपारिक मत्स्यव्यवसाय
मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील प्रथिने शरीराला पोषक आहेत. कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांसारखी खनिजेही थोड्या प्रमाणात माशांपासून मिळतात. मासळीत काही महत्त्वाची जीवनसत्त्वेही असतात. कॉड, हॅलिबट, मुशी या माशांच्या यकृतापासून ‘अ’ व ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त औषधी तेल निघते, तर आतड्यापासून ‘ब’ जीवनसत्त्व मिळू शकते. मासे पचनास हलके असतात. काही माशांच्या शरीरातील हवेच्या पिशव्यांचा विविध कामांसाठी उपयोग केला जातो. पाळीव जनावरांच्या आहारासाठी मत्स्यपीठ व झाडांसाठी उत्तम खतही मासळीपासून मिळते. मत्स्योद्योगात जगातील कोट्यवधी लोक गुंतले आहेत.

‘गोड्या पाण्यातील मासेमारी’ आणि ‘खाऱ्या पाण्यातील मासेमारी’ असे दोन प्रकार आहेत. आपण गोड्या पाण्यातील मासेमारी करू इच्छित असाल तर मत्स्यपालन एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिल्यांदा त्या व्यवसायाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. आपण मस्यपालन हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करीत असाल तर आपल्याला त्याविषयी संपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. यासाठी आपण जिथे हा व्यवसाय केला जातो, त्याठिकाणी भेट देऊन त्याविषयी माहिती गोळा केली पाहिजे. जागेची निवड करण्याअगोदर आपण कोणत्या पद्धतीने मत्स्यपालन करणार आहोत. हे ठरविले पाहिजे. आज मत्स्यपालन विविध प्रकारे केले जाते. जसे की – पिंजरा मत्स्यपालन, कृत्रिम तळे बनवून मत्स्यपालन, इत्यादी. जागेची निवड करण्याअगोदर याचा विचार करणे गरजेचे आहे. तळ्याची बांधणी आपण वर ठरविल्यानुसार कोणत्या पद्धतीने मत्स्य पालन करणार आहोत त्यानुसार करू शकता. जेव्हा आपण तळ्याची निर्मिती करतो, त्यावेळी पाणी बाहेर सोडण्याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आवश्यकतेनुसार पाईपलाइन, ऑक्सिजन निर्मितीसाठी पाईपलाइन, इत्यादी करून घेतले पाहिजे. आपल्या भारतामध्ये लहान माशांची पिल्ले ही पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेश येथून जास्त करून मागवली जातात. आपण याचा अभ्यास करावा. स्थानिक बाजारपेठ किंवा अन्य ठिकाणी माशांची विक्री करावी. यासाठी समाजमाध्यमांचा वापर करून घ्यावा.

खाऱ्या पाण्यातील मासेमारी या पारंपरिक उद्योगाने आता मोठी मजल गाठली आहे. मासेमारी हा प्रथमतः कोळी समाजाचा प्रमुख व्यवसाय मानला जातो. समुद्राच्या किनारपट्टीवर मासेमारी व्यवसाय केला जातो. खोल समुद्रामध्ये जाऊन मासेमारी करणे धोकादायक असते. जीवावर उदार होऊन मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय केला जातो. मासेमारी हा कोळी समाजातील प्रमुख व्यवसाय होता. आता व्यापारी तत्वावर मासेमारी केली जाते. कोकण किनारपट्टीवर कोळी समाजाची वस्ती असते. तिथे समुद्रात खाऱ्या पाण्यातील मासेमारी उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. सुरमई, बांगडा, पापलेट, बोंबील अशा प्रकारचे मासे विक्रीसाठी पाठविले जातात. मोठ्या प्रमाणात मिळणारे लहान काटेरी मासे स्वस्त असतात. दिवसेंदिवस मासेमारी हा व्यवसाय धोकादायक बनत चालला आहे. प्रदूषणाचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे माशांचे आरोग्य बिघडत आहे. मुळात प्रथिनयुक्त असणारे माशांचे आरोग्य प्रदूषणामुळे बिघडत असून असे मासे खाणारी माणसेसुद्धा अनेक व्याधींनी त्रस्त आहेत. कारखान्यांतील विषारी वायू पाण्यामध्ये सोडले जातात. हेच पाणी समुद्रामध्ये मिसळले जाते. त्यामुळे त्यातील जलचरांच्या जीवावर बेतते.याचा विचार अलीकडे होऊ लागला आहे. तरीही मत्स्योद्योगाने मनुष्याचा उदरनिर्वाह केला असून आता तो व्यापारी तत्वावर केला जात आहे.