चंद्रपूरमधील भामरागड अभयारण्य

चंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या ‘भामरागड’ अभयारण्याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.कि.मी इतके आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांसाठी हे अभयारण्य म्हणजे एक स्वर्ग आहे. अभयारण्यातून ‘पार्लोकोटा’ आणि ‘पामलगौतम’ या नद्या वाहतात. त्या अभयारण्यातील वन्यजीवांसाठी आणि इथे राहणाऱ्या ‘गोंड’ आणि ‘माडिया’ जातींच्या आदिवासी बांधवांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत आहेत.

एकेकाळचे हे शिकारीचे स्थळ ६ मे १९७७ रोजी संरक्षित वन झाले असून ते रानडुक्कर, बिबट्या, ससे, भुंकणारे हरीण, मुंगूस, अस्वल, खार, उडणारी खार, नीलगाय, जंगली कोंबडी, मोर अशा असंख्य वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासाचे ठिकाण झाले आहे. अनेक जातीचे सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी आपण इथे पाहू शकतो.

‘गोंड’ आणि ‘माडिया’ जमातीचे आदिवासी लोक येथे राहत असून ‘माडिया’ आणि ‘गोंडी’ या स्थानिक भाषा येथे बोलल्या जातात. पारंपरिक जीवन जगणाऱ्या या आदिवासींचे जंगलावरचे अवलंबित्व कमी व्हावे; तसेच त्यांना सुरक्षित आयुष्य जगता यावे यादृष्टीने त्यांना रोजगाराची पर्यायी साधने उपलब्ध करून देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. यासाठी वन विभागाने ‘ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन योजना’ सुरू केली आहे. त्याचा फायदाही या स्थानिक लोकांना मिळत आहे.

वन विभागाचे विश्रामगृह हा अभयारण्यात जेवणाचा एकमेव स्रोत असल्याने अभयारण्यात जाताना कोरडे अन्नपदार्थ सोबत नेणे केव्हाही उत्तम ठरते. आसपास पाहण्यासारखे अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये वरोऱ्याचा आनंदवन आश्रम, चंद्रपूरच्या प्राचीन लेणी, चंद्रपूरचा किल्ला, माणिकगड किल्ला, बल्लारपूर किल्ला, हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प यांचा समावेश होतो. अभयारण्याची जशी आपल्याला ओढ लागते तशीच ‘हेमलकसा लोकबिरादरी’ प्रकल्प पाहण्याची इच्छाही आपल्याला स्वस्थ बसू देत नाही.

कर्मयोगी बाबा आमटे यांनी ‘हेमलकसा लोकबिरादरी’ प्रकल्पाची स्थापना केली. आरोग्य आणि शिक्षणाचा मूलमंत्र आदिवासींना मिळावा याकरिता हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. आज ही समाजसेवेची धुरा त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि सून मंदाकिनी आमटे यांनी यशस्वीरित्या पुढे नेली आहे. आदिवासी बांधवांना आरोग्य सेवा देताना त्यांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी या डॉक्टर दाम्पत्याने केलेला प्रयत्न जगभरात वाखाणला गेला. अनेक पुरस्कारांनीही ते सन्मानित झाले आहेत. मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानून समर्पित वृत्तीने काम करणारे डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे हे दोघेही महाराष्ट्राचे भूषण आहेत. ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाला भेट दिल्यानंतर त्यांचा या आदिवासी बांधवांप्रतीचा समर्पित सेवाभाव तर दिसतोच; परंतु तो अनेकांना जगण्याची एक नवी प्रेरणाही देऊन जातो.

घनदाट जंगलासोबत, समर्पित सेवेचा अनुभव जीवनाला कशी उत्तम दिशा देतो हे पहायचे असेल, त्यांनी एकदा तरी ‘भामरागड’ अभयारण्य, हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाला, ‘आनंदवन’ आश्रमाला भेट द्यायला हवी. ‘गोंड’ आणि ‘माडिया’ जातीच्या आदिवासी लोकांची लोकसंस्कृती ही मनावर गारूड टाकल्याशिवाय राहत नाही. ‘भामरागड’ अभयारण्य जवळपास सर्व राष्ट्रीय महामार्गानी जोडले गेले असल्याने अभयारण्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भेट देणे सहजशक्य होते. ‘अहेरी’ हे सर्वात जवळचे बसस्थानक आहे. त्याचे अभयारण्यापासूनचे अंतर १०२ कि.मी आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *