हळद लागवडीसाठी महत्त्वाचे
निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्वमशागतीपासून ते हळद बियाणे साठवणुकीपर्यंत हळद पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे असते. सध्या हळद काढणीचा हंगाम सुरू आहे. खांदणी करून काढलेले कंद २ ते ३ दिवस उन्हामध्ये चांगले तापू द्यावेत. कंद तापल्यामुळे कंदांना पाणी सुटते. त्यामुळे कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते. त्यानंतर २ दिवसांनी हळदीच्या कंदाची मोडणी करावी. त्यानंतर २ दिवसांनी हळदीच्या कंदाची मोडणी करावी. हळद कंदाचा गड्डा हळूच आपटला असता गड्ड्याला चिकटलेली माती वेगळी होण्यास मदत होते. कच्च्या मालाची प्रतवारी करताना ‘जेठा गड्डे’ (मातृ गड्डे), ‘बगल गड्डे’, ‘सोरा गड्डे’, ‘हळकुंडे’ आणि ‘रोग-कीडग्रस्त हळकुंडे’ अशी प्रतवारी करावी. त्यानुसार त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी.

बियाणे निवड करताना रोग व कीडग्रस्त अथवा अर्धवट कुजलेले गड्डे साठवणीमध्ये येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. यापैकी ‘जेठा गड्डे’, ‘बगल गड्डे’ आणि ‘हळकुंडे’ हे लागवडीसाठी बियाणे म्हणून वापरावेत. बियाणे निवडताना शास्त्रीयदृष्ट्या काळजी घेणे फार गरजेचे असते. निवडलेले बियाणे जातिवंत, दर्जेदार, गुणवत्तापूर्ण, सुप्तावस्था संपलेले, निरोगी, रसरशीत व चांगले असेल तर उत्पादन देखील चांगले मिळते. मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास ‘जेठा गड्डा’ किंवा ‘मातृकंद’ असे म्हणतात. प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी बियाणे (बेणे) हे मातृकंदाचेच ठेवावेत. हळदकंदापासून मातृकंद वेगळे करावेत. सशक्त, निरोगी, जाड मातृकंद बियाणे म्हणून निवडून काढावेत. बियाण्यासाठी निवडलेले मातृकंद आकाराने त्रिकोणाकृती आणि वजन ५० ग्रॅम पेक्षा जास्त असावे. काढणीनंतर हे गड्डे ताबडतोब सावलीमध्ये ठेवावेत.

‘जेठा गड्ड्या’ ला आलेल्या फुटव्यांच्या खाली येणाऱ्या गड्ड्यांना ‘बगल गड्डे’ (अंगठा गड्डे) असे म्हणतात. साधारणपणे ४० ग्रॅमपेक्षा जास्त वजन असणाऱ्या गड्ड्यांचा वापर बियाणे म्हणून करतात. बगल गड्ड्यांना आलेल्या कंदास ‘हळकुंडे’ असे म्हणतात. ‘हळकुंडे’ देखील बियाण्यासाठी वापरली जातात. मातृकंद कमी पडत असतील, तर हळकुंडे बियाणे म्हणून वापरावे. बियाण्यासाठी निवडलेल्या हळकुंडाचे वजन ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावे. निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची, भेसळमुक्त असावीत. लागवडीच्या वेळी वापरलेले ‘जेठा गड्डे’ (मातृकंद) हळद पिकाच्या ९ महिने वाढीच्या कालावधीत ५० ते ६० टक्के कुजून जातात. राहिलेल्या ४० ते ५० टक्के कंदांना ‘सोरा गड्डे’ असे म्हणतात. ‘सोरा गड्डे’ हे दिसायला काळपट रंगाचे आणि मुळ्याविरहित असतात. ‘सोरा गड्डे’ बियाणे म्हणून वापरता येत नाहीत.
बियाणे असे साठवावे :
निवडलेले हळद बेणे ( बियाणे) त्वरित झाडाखाली सावली असलेल्या थंड ठिकाणी ढीग करून साठवावेत. बेण्याचा ढीग करताना हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी; अन्यथा बेण्याच्या उगवणीवर परिणाम होऊ शकतो. बेण्याचा ढीग करताना थोडासा उंचवटा करून कोन पद्धतीने ढीग करून रचावेत. बेण्याच्या ढीगावर हळदीच्या वाळलेल्या पानांचा १० ते १५ सेंमी जाडीचा थर द्यावा. जास्त तापमान असलेल्या ठिकाणी हळदीच्या वाळलेल्या पाल्यावर गोणपाट टाकावे. केवळ गोणपाट भिजेल एवढेच पाणी गोणपाटावर मारावे. साधारणतः २ ते अडीच महिन्यांच्या कालावधीपर्यंत बेणे सुप्तावस्थेत जाते. या कालावधीत केवळ बेण्याच्याअंतर्गत बदल किंवा शरीरक्रिया घडून येत असतात. कोणत्याही स्वरूपात बाह्य बदल दिसून येत नाहीत. सुप्तावस्था संपेपर्यंत बेण्यावर पाणी शिंपडू नये. दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत सर्व बेण्यांची सुप्तावस्था पूर्ण होते.
सुप्तावस्था संपल्यानंतर बेण्यामध्ये बदल दिसायला सुरुवात होते. यावेळी बेण्यावरील डोळे फुगीर होतात. डोळे फुटण्यास प्रारंभ होतो. सुप्तावस्था संपल्यानंतर बेणे परत निवडावे. बेण्यावरील मुळ्या, पानांचे शिल्लक राहिलेले अवशेष काढावेत. मुळ्याविरहीत रसरशीत निरोगी बेणे लागवडीसाठी वापरावे. निवडलेल्या बेण्यात ‘कंदकूज’ रोगाचे किंवा ‘कंदमाशी’चे कोणतेही अवशेष राहणार नाहीत, याची पूर्णतः खात्री करावी; जेणेकरून रोगाचा वा किडीचा प्रादुर्भाव शेतात होणार नाही. हळद लागवड करण्यास थो़डाफार अवधी असेल, तर दिवसातून २ वेळेस बेण्याच्या ढिगावर पाणी शिंपडावे. पाणी शिंपडल्यामुळे बेण्यांची एकसारखी उगवण होण्यास मदत होते. उष्ण सूर्यप्रकाश, वारा यांचा बेण्याशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. बेणे दर्जेदार असेल, तर उत्पादन वाढीस निश्चितच हातभार लागतो.