
‘तुंग’ किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात असलेला एक डोंगरी किल्ला आहे. लोणावळ्याहूनही येथे जाता येते. तुंग किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1075 मीटर आहे. ‘पवना ‘ बांधल्यापासून हे ठिकाण तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. ‘पवना’ धरणापासून त्याच्या पायथ्याचे गाव ‘तुंगी’ पर्यंत बोटीने जाता येते. गडाच्या माथ्यावरून ‘लोहगड’, ‘विसापूर’, ‘तिकोना’ आणि ‘कोरीगड’ किल्ले स्पष्ट दिसतात. तुंग किल्ला हा 1600 च्या आधी बांधला गेला असावा , असे म्हटले जाते.
तुंग किल्ला बांधण्याचे काम आदिलशाही घरांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला. हा किल्ला जास्त मोठा नसून एका वेळी 200 सैनिकांपेक्षा जास्त सैनिक किल्ल्यावर राहू शकत नाहीत. तुंग किल्ल्याला ‘कठीणगड’ म्हणूनसुद्धा ओळखले जाते. त्याचा आकार आणि रचना असे सूचित करते, की हा पुणे शहराच्या रस्त्याचे रक्षण करणार्या ‘पवना’ आणि ‘मुळशी’ खोऱ्यातील मावळ प्रदेशाकडे लक्ष देणारा टेहळणी बुरूज होता. मावळ भागातील देशमुखांपैकी एक असलेल्या ‘ढमाले’ कुटुंबावर तुंग किल्ल्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी होती.

आक्रमणकर्त्यांचे तात्पुरते लक्ष विचलित करण्याचे काम या किल्ल्यावरून करता यायचे. त्यामुळे ‘विसापूर’ आणि ‘लोहगड’ या प्रमुख किल्ल्यांवरील सैनिकांना आक्रमण करणाऱ्या सैन्याचा सामना करण्यासाठी तयार होण्यास वेळ मिळायचे. 1665 मध्ये राजा जयसिंगाने या प्रदेशावर स्वारी केली. दिलेरखान आणि इतरांनी ‘तुंग’ ‘तिकोना’च्या आजूबाजूची गावे उद्ध्वस्त केली, परंतु ते किल्ले जिंकू शकले नाहीत. या किल्ल्यावर गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा आहे.
दरवाजाच्या नावाप्रमाणेच आपल्याला या दरवाज्याजवळ हनुमानजींची मूर्ती कोरलेली दिसते. दरवाजामध्ये सैनिकांना राहण्यासाठी ‘देवडी’ आहे. सदरेच्या समोर आपल्याला गणेश मंदिर दिसते. ‘सदर’चे फक्त आता अवशेष आहेत. ‘तुंग’ देवीच्या मंदिराच्या आधी आपल्याला पाण्याची टाकी दिसते. हे पाणी पिण्यायोग्य आहे. वाड्याचे अवशेष फक्त उरलेले आहेत. तुंग देवीचे मंदिर गडाच्या सर्वात उंच टोकावर आहे. जर तुम्हाला येथे रेल्वेने जायचे असेल तर लोणावळापर्यंत जावे लागेल. विमानाने जायचे असेल तर पुणे येथे उतरावे लागेल. तिथून मग खासगी वाहने, एसटी बसेसने जाऊ शकता.