हिंगोलीतील औंढा नागनाथ

बारा ज्योतिर्लिंगे ही हिंदूंची तीर्थक्षेत्रे आहेत. त्यातील पाच महाराष्ट्रात आहेत. शतकानुशतके याठिकाणी शिवांची पूजा केली जाते. ‘औंढा नागनाथ’ हे त्यापैकी एक आहे. हे हिंगोली जिल्ह्यात आहे. नागनाथ मंदिरात उत्तम कोरीवकाम आहे. हे मंदिर हेमाडपंती वास्तुशिल्प असून सुमारे 60,000 चौरस फूट क्षेत्रावर स्थित आहे. ‘शिवरात्री’ आणि ‘विजयादशमी’ ला मोठ्या संख्येने यात्रेकरू या मंदिरात येतात. हिंदू आणि शीख धर्मात हे मंदिर फारच महत्त्वपूर्ण मानले जाते; कारण, या मंदिराचा संबंध संत नामदेव यांच्याशी जोडला गेला आहे. या मंदिराची स्थापना पांडवांनी केली आहे, अशी आख्यायिका सांगण्यात येते. पांडव या परिसरात वास्तव्याला असताना, घडलेली चमत्कारिक घटना या मंदिराच्या निर्मितीस कारणीभूत ठरली.

पांडवांच्या गायी नदीवर पाणी पिण्यासाठी जात असत. मनसोक्त पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांच्या आचळातून आपोआप दूध स्रवू लागायचे. हे दूध नदीत अर्पण केले जायचे. जणू काही या गायी एखादा अभिषेक करीत असाव्यात ! ही गोष्ट लक्षात येताच भीमाने युधिष्ठीराला याविषयी सांगितले. हा नक्कीच एक चमत्कार आहे आणि त्याचा शोध घ्यायला हवा, असा पांडवांनी निश्चय केला. या शोधकार्यात पांडवांना यश आले. आणि तिथे असणारे महादेवाचे ज्योतिर्लिंग त्यांना सापडले. या लिंगाची स्थापना करून पांडवांनी त्याठिकाणी मंदिराची निर्मिती केली. आज हेच ठिकाण ‘औंढा नागनाथ’ मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

या मंदिराचा पाया आणि एकूण मंदिराची रचना यात भिन्नता आढळते. याचे कारण म्हणजे या मंदिराचा करण्यात आलेला जीर्णोद्धार ! मुघल शासक औरंगजेबाने अनेक हिंदू देवस्थाने नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकीच एक ‘औंध नागनाथ’ होते. त्यावेळी मंदिर संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले होते. कालांतराने याचा जीर्णोद्धार करण्यात आला. म्हणूनच आज अस्तित्वात असलेले मंदिर पहायला मिळते. या मंदिराचामुळात अस्तित्वात असलेले मंदिर उद्ध्वस्त झाल्यामुळे त्याच्यावरील भाग पुन्हा नव्याने बांधण्यात आला आहे. या मंदिरातील पुजारी जातीव्यवस्थेचे फार काटेकोरपणे पालन करीत असत.

शंकराचे भक्त असणारे नामदेव महाराज या मंदिरात गेले. त्यांनी महादेवाची भक्ती सुरु केली; मात्र ते वरिष्ठ जातीचे नसल्याचे कारण देत पुजाऱ्यांनी त्यांना मंदिरातून बाहेर काढले. उच्चजातीत जन्म झालेला नसल्याने, या मंदिरात येऊन भगवान शंकराची उपासना करण्याची परवानगी त्यांना नाही, असे पुजाऱ्यांकडून सांगण्यात आले. एवढेच नाही, तर त्यांचा अपमान करण्यात आला. संत नामदेव मात्र शंकराचे फार मोठे भक्त होते. या घटनेनंतरही त्यांनी शंकराची उपासना थांबविली नाही. ते मंदिराच्या मागच्या बाजूला गेले आणि त्यांनी त्यांची प्रार्थना, पूजाअर्चा सुरूच ठेवली. त्यांनी भगवान शंकराचा धावा सुरु केला. जातीचे कारण देऊन त्यांना मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्यांचा त्यांना राग आला नव्हता, मात्र ज्या भगवान शंकरानेच त्यांना या जातीत जन्माला घातले, त्याच्यावरही हे इतर भक्त विश्वास ठेऊ शकत नाहीत, याबद्दल त्यांना वाईट वाटत होते.

सर्वशक्तिमान भगवान शंकराने आता काहीतरी चमत्कार दाखवावा की त्याची शक्ती आणि नामदेवांची भक्ती यावर सगळ्यांचाच विश्वास बसेल, अशी त्यांची इच्छा होती. नामदेवांची श्रद्धा आणि भक्ती बघून भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी आपल्या दैवी शक्तीचा चमत्कार दाखवून त्या मंदिराने थेट दिशाच बदलली. मंदिराचे द्वार विरुद्ध बाजूला फिरून संत नामदेवांच्या दिशेला आले. या भक्ताचा धावा ऐकून, त्याला कुठलाही त्रास होऊ नये, आणि आपले दर्शन व्हावे यासाठी शंकराने मंदिराचे प्रवेशद्वार नामदेवांच्या समोर आणून ठेवले. भगवान शंकराच्या मंदिराचे प्रवेशद्वार हे नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असते. ‘औंध नागनाथ’ हे एकमेव असे ज्योतिर्लिंग मंदिर आहे, ज्याचे प्रवेशद्वार पश्चिमेकडे आहे. याचे कारण हेच असल्याचे सांगितले जाते. संत नामदेवांच्या भक्तीसाठी शंकराने हा चमत्कार करून दाखविला होता, अशी कथा आजही सांगितली जाते. येथे जायचे असल्यास जवळचे विमानतळ नांदेड आणि औरंगाबाद आहे. जवळचे रेल्वे स्थानक हिंगोली आहे. औरंगाबादपासून रस्ता मार्ग २०० कि.मी. आहे. नांदेडपासून रस्ता मार्ग 70 किमी आहे. परभणीतून रस्ता मार्ग 56 कि.मी. आहे. हिंगोलीपासूनचे अंतर 24 किमी आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *