गुढीपाडवा
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. यावर्षी 22 एप्रिल 2023 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी रांगोळ्या, देखावे, शोभायात्रा काढून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. गुढीपाडवा साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडव्याचे महत्व जाणून घेणे फार गरजेचे आहे.

वास्तविक, प्रत्येक सण साजरा करण्यामागे पुर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पाने गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो. याचे प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातात. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्ताचा नाश करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील किड काढणे हे सर्व यामुळे शक्य होते.

कडुलिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असते; मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडव्याची माहिती असायला हवी. काहीजणांना विशेषतः नव्या पिढीला गुढी कशी उभारावी याची माहिती कमी असलेली दिसून येते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूची काठी धुवून स्वच्छ केली जाते. या काठीला ‘रेशमी साडी’ अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. ज्यामधून विजयपताका उभारल्याचा आनंद व्यक्त होत असतो. घराबाहेर रांगोळी काढली जाते.
गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा सण आहे. शिवाय या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. साहजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपरिक वेशभूषेने केले जाते. महिला गुढीपाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन साड्या परिधान करतात. महिला यादिवशी खास नऊवारी साडी, नथ, ठुशी असे पारंपरिक दागदागिने घालतात. पुरुषमंडळी धोती, सलवार, कुर्ता असा पारंपरिक पेहराव करतात. महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणीदेखील गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. रस्त्यावर, चौकाचौकात मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या जातात. पारंपरिक वेशभूषा केली जाते. लेझीम, ढोलताशे आणि भव्य-दिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते. सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात; आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात.