कांदा उद्योग
कांदा हा दैनंदिन लागणाऱ्या अन्नपदार्थांपैकी एक असूनदेखील शेतकऱ्यांचे उत्पादन आणि बाजारभाव याची चांगल्या पद्धतीने सांगड घातली जात नसल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. भारतात सर्वाधिक कांदा उत्पादन महाराष्ट्र राज्यात होत असून महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, पुणे, जळगाव, अहमदनगर, सातारा हे जिल्हे कांदा उत्पादनात अग्रणी आहेत. कांद्याच्या दरांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर चढउतार पहायला मिळत असतात. त्यामुळे बाजारभावाच्या प्रतीक्षेत अनेक शेतकरी कांदा साठा करून ठेवतात; परंतु ठराविक काळानंतर हा साठा करून ठेवलेला कांदा खराब होतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात छोटे- छोटे कांदा प्रक्रिया उद्योग सुरू व्हायला हवेत.

ज्यावेळी कांद्याला बाजारभाव हा २ हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा कमी असेल अशा वेळी सरळ कांदा प्रक्रियेद्वारे कांदा पावडर करून निर्यात केल्यास शेतकऱ्यांना होणारा तोटा टाळता येऊ शकतो. कांद्यावर प्रक्रिया करून चकत्या किंवा भुकटी बनविता येऊ शकते, ज्याचा वापर इतर खाद्यपदार्थांमध्ये करता येतो. कांदा प्रक्रिया करताना अशा टप्यांद्वारे काम करता येते. कांद्यापासून चकत्या किंवा भुकटी बनविण्यासाठी शक्यतो पांढरा कांदा वापरतात. लहान कांदा हा प्रक्रिया करण्यासाठी सर्वात चांगला असतो.
कांद्याचा टोकाच्या बाजूचा बाजूचा भाग कापून साल काढून साधारण ५ ते १० मि. मी. जाडीच्या चकत्या केल्या जातात. या बनविलेल्या चकत्या मिठाच्या पाण्यात साधारण २ तास भिजवल्या जातात. त्यानंतर अंदाजे ५५ ते ६५ अंश सेल्सिअस तापमानात सुकविण्याच्या यंत्रात 12 तास ठेवतात. या तयार झालेल्या मालाला हवाबंद डब्यात बंद करतात. कांद्याचे बाहेरील आवरण काढण्याचे स्वयंचलित यंत्र वापरून आपण कांद्याच्या बाहेरील आवरण काढण्यास त्याचा उपयोग करू शकतो. या यंत्राचा वापर करून साधारण ४०-५० किलो कांद्यावरील आवरण प्रतितासाला काढू शकता. एवढी क्षमता असलेले यंत्र अंदाजे १५००० रुपयांना मिळू शकते. यापेक्षा अधिक क्षमता असलेली यंत्रेदेखील बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत.

कांद्याचे शेंडे तसेच मुळ्या कापण्यासाठीची यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. याची किंमत सुद्धा क्षमतेनुसार १२००० पासून पुढे आहे. काही यंत्रे जी बाजारात उपलब्ध आहेत, त्यांची क्षमता १०० किलो ताशी आहे. सुरूवातीच्या काळात हे काम यंत्र न घेता स्वतः देखील करू शकता; व आपली गुंतवणूक वाचवू शकता. मुळ्या कापलेला व बाहेरील आवरण काढलेला कांदा धुण्यासाठी यंत्र बाजारात मिळते. या यंत्राचा वापर हा मुळ्या, शेंडे व बाहेरील आवरण काढलेला कांदा धुण्यासाठी केला जातो.
या प्रक्रियेमुळे धूळ व अन्य खराब घटक कांद्यापासून वेगळे करता येतात; व कांदा स्वच्छ होतो. अशा प्रकारचे यंत्र बाजारात १० हजार रुपयांपासून पुढे क्षमते नुसार उपलब्ध आहे. कांदा कापून चकत्या करण्यासाठीचे यंत्रही बाजारात आहे. या यंत्राद्वारे कांद्याच्या लहान-लहान चकत्या केल्या जातात. अशा प्रकारच्या यंत्रामध्ये ०.४ मि. मी. पासून ०.८ मि. मी. पर्यंत चकत्या करता येतात. हे यंत्र स्वयंचलित असून बाजारात अशा प्रकारची बरीच यंत्रे पाहायला मिळतील, ज्यांची किंमत क्षमतेनुसार कमी-अधिक असेल.
कांदा वाळविण्यासाठीसुद्धा यंत्र आहे. या उपकरणामध्ये चकत्या केलेला कांदा वाळवला जातो. या यंत्रामध्ये कांद्यातील पाणी काढून टाकले जाते व कांदा पूर्णपणे वाळवला जातो. असा चकत्या केलेला कांदा हा १० ते १२ तास ५५ ते ६० अंश से. एवढ्या तापमानाला ठेवायचा आहे. त्यामुळे नुसत्या उन्हात या चकत्या वळवल्या तर चालेल, असे नाही. हे यंत्र तुम्हाला घ्यावेच लागेल. कारण यामध्ये तेवढे तापमान तयार केले जाते, जे आपल्या आजूबाजूला कितीही ऊन असले तरी होत नाही.
वाळवलेल्या या कांद्याच्या चकत्या गिरणीच्या सहाय्याने भुकटीमध्ये रूपांतरित करतात. अशा प्रकारच्या कांद्याची भुकटी करणाऱ्या गिरण्या बाजारात क्षमतेनुसार उपलब्ध आहेत. प्रति तासाला ५० किलो क्षमता असलेली मशीन सुरुवातीच्या काळात तुम्हाला पुरेशी ठरू शकते, ज्याची किंमत बाजारात १५ हजारच्या जवळपास आहे. त्यापेक्षा अधिक क्षमता असलेले ‘ग्राइंडर’ देखील बाजारात उपलब्ध आहेत.
अशा प्रकारचा कांदा प्रक्रिया उद्योग चालू करण्यासाठी कमीत कमी रु. २ लाखपासून ५ लाखा पर्यंत खर्च येऊ शकतो. जो एक शेतकरी किंवा शेतकऱ्यांचा गट देखील करु शकतो. आखाती देशांमध्ये कांद्याच्या चकत्या आणि पावडर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. सध्या इंग्लंड, जर्मनी, जपान, आफ्रिका, हॉंगकॉंग यांसारख्या देशांमध्ये अश्या प्रकारच्या चकत्या आणि पावडर केलेल्या कांद्याची निर्यात होत आहे. या कांद्याच्या प्रक्रिया केलेल्या भुकटीला चांगला बाजारभाव मिळत आहे, ज्यामुळे परकीय चलनप्राप्तीत देखील वाढ होत आहे. सध्या आपल्या देशातील उत्पन्नापैकी केवळ २-५ टक्के मालावर प्रक्रिया होते. उर्वरित माल हा विकला जातो; किंवा खराब होतो. यावरूनच आपल्या लक्षात येईल की या कांदा प्रक्रिया उद्योगाला किती वाव आहे.