रोहित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांची धडपड
ठाणे खाडीतील रोहित पक्षी अभयारण्यातील ‘रोहित’ पक्षी ‘भांडुप पम्पिंग स्टेशन’ येथे आवर्जून येत असतात. त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी येथे अनेक पर्यटक येत असतात. गेल्या आठवड्यात काही विद्यार्थ्यांना येथील ‘रोहित’ पक्ष्यांच्या अधिवासामध्ये एक प्रवासी बोट फिरताना दिसली. या बोटीमुळे पक्ष्यांना धोका पोहोचण्याची शक्यता होती. हे लक्षात घेत जागरुक विद्यार्थ्यांनी याबाबत कांदळवन प्रतिष्ठानकडे ऑनलाइन तक्रार केली आहे. पुस्तकातील पर्यावरणाच्या धड्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समजावून घेतल्याची प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

‘रोहित’ पक्षी ज्या ‘भांडुप पम्पिंग स्टेशन’ परिसरात विश्रांतीसाठी किंवा खाण्यासाठी बसले आहेत, तिथूनच खासगी बोटी जाताना दिसत असल्याचे निरीक्षण प्रसाद खाड्ये आणि त्याच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी नोंदवले. त्यापैकी एका बोटीचे नावही विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे ठाणे खाडी रोहित पक्षी अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे यांनी सांगितले.
ठाणे परिसरातून ‘रोहित’ पक्षी ‘भांडुप पम्पिंग केंद्र’ परिसरात खाण्याच्या शोधात येतात. या ‘रोहित’ पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटनफेऱ्यांची व्यवस्था खासगी बोटमालक करतात. या पर्यटनाच्या वेळी पक्ष्यांना त्रास दिला जाऊ नये, अशी अपेक्षा असते; मात्र काही वेळा बोटमालक अधिक पैशांच्या लोभापायी विश्रांती घेणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांमधून बोट नेताना यापूर्वीही आढळले आहेत, असे निरीक्षणासाठी आलेला विद्यार्थी प्रसाद खाड्ये याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पर्यटकांना चांगले फोटो मिळावे, त्यांना ‘रोहित’ पक्षी जवळून पहायला मिळावेत, यासाठी बोटमालक पक्ष्यांना त्रास होईल, असे वागतात. यामुळे पक्ष्यांना धोका निर्माण होण्याची अधिक भीती आहे. ‘रोहित’ पक्ष्यांना संरक्षणात्मक दर्जा दिलेला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्राणी, पक्ष्यांचा पाठलाग करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे ‘रोहित’ पक्षी अभयारण्य परिसरात घडणारे हे प्रकार थांबवावे आणि संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या खाड्ये आणि अन्य विद्यार्थ्यांनी केली आहे.

लहान ‘रोहित’ पक्षी हा ‘आययुसीएन’च्या ज्या पक्ष्यांची संख्या कमी होत आहे, अशा पक्ष्यांच्या यादीत आहेत. त्यामुळे याकडे विशेष लक्ष देणे अपेक्षित आहे, असे खाड्ये याचे म्हणणे आहे. स्थानिक बोटींसोबत करार करताना बोटी चालविण्याच्या अटीसंदर्भात त्यांना माहिती दिलेली असते. पक्ष्यांच्या थव्यापासून किती अंतर असावे, हे त्यामध्ये नमूद नसते; मात्र त्यांना त्रास होणार नाही अशा अंतरावर बोट राहणे अपेक्षित असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या नियमांचे पालन प्रत्यक्षात होणेही तितकेच आवश्यक वाटत आहे. त्यासाठी त्यांनी ‘रोहित’ पक्षी अभयारण्यात पर्यटनाच्या नावाखाली पक्ष्यांनाच त्रास देणाऱ्या काही गोष्टी घडत असल्यास त्या थांबवणे आवश्यक आहे, असे आवाहन केले आहे.