
‘जल व भूमी व्यवस्थापन संस्था’ अर्थात ‘वाल्मी’ ही महाराष्ट्र शासनाने १९८० मध्ये स्थापन केली. औरंगाबाद शहरापासून सहा किमी अंतरावर असलेली ही संस्था स्वायत्त आहे. जल व भूमी या संसाधनांचा एकात्मिक विचार करून पाणी-जमीन-पिक यांच्यातील परस्परसंबंधांचा कार्यक्षम वापर व्हावा, म्हणून शेतकरी ते अभियंते यांना प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करते.
शेतकरी तसेच शेतीत काम करणाऱ्या स्त्रिया यांना जल व भूमी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी येथे काही विशेष प्रयोग राबविले जातात. शेतकऱ्यांना प्रयोगशाळेत काम करण्याची संधी दिली जाते. सिंचनाच्या विविध पद्धती, ठिबक व तुषार सिंचन, पाण्याची मोजणी, जमिनीतील ओलावा मोजणे याचे प्रात्यक्षिक शेतीत काम करून घेता येते. त्यासाठी स्थापत्य अभियंते, कृषी अभियंते, कृषी शास्त्रज्ञ, संगणक शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, माध्यमतज्ज्ञ हे सर्व एकत्रितपणे काम करून शेतकऱ्याला तसेच जलसंपदा खात्यात काम करणाऱ्या अभियंत्याला प्रशिक्षण देतात.

‘वाल्मी’ ने यासाठी स्वत: अनेक चित्रफिती निर्माण केल्या आहेत. शेतकऱ्यांना उपयुक्त असे संशोधन येथे केले जाते. त्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतावर केला जातो. काही वेळेस प्रत्यक्ष शेतावरच प्रयोग करतात. दुष्काळी भागासाठी जलव्यवस्थापन कसे करावे, पाणी वापर, संस्थांचा व्यवहार कसा चालवावा, प्रवाहाचे मापन करून शेतकऱ्याला पाण्याचे बिल कसे द्यावे, कालव्यातून होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी बंद पाइपद्वारे पाणी वितरण व्यवस्था कशी तयार करावी, ठिबकद्वारे होणारी पाण्याची बचत, असे अनेक संशोधन प्रकल्प, कृती कार्यक्रम संस्थेने त्या-त्या ठिकाणी जाऊन पूर्ण केले आहेत.
शेतकऱ्यांसाठी येथे मराठी प्रकाशने उपलब्ध आहेत. प्रकाशनाद्वारे विविध संशोधनाचे निष्कर्ष प्रसिद्ध केले जातात. शेती व सिंचनासंबंधी नियम करणे, पाणी वापरविषयक संस्थांच्या कार्यपद्धतीत सुधारणा सुचविणे, सिंचन कायद्याचा अभ्यास करून त्यात सुधारणा सुचविणे ही कार्येदेखील ‘वाल्मी’ करते. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची संधी तसेच मागणीनुसार प्रशिक्षण देण्याची सुविधाही ‘वाल्मी’मध्ये आहे.