
हिरव्यागार वनराईने नटलेला डोंगर, स्वच्छ व निळाशार समुद्र, डोलणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा, पायाला मुलायम वाटणारी रुपेरी वाळू आणि याच वाळूच्या किनाऱ्यावर वसलेले सुंदरसे कौलारू हरिहरेश्वरचे मंदिर ! श्रीवर्धन तालुक्यातील भगवान शंकराचे हे मंदिर ‘दक्षिण काशी’ क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. रायगड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर हरिहरेश्वरचे दर्शन झाले नाही, असा भाविक विरळाच !
श्रावण महिन्यामध्ये हरिहरेश्वरचा परिसर भाविकांनी फुलून जात असतो. हरिहरेश्वरचे मंदिर पुरातन आहे. बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार १७२३ मध्ये केल्याचे पुरावे आहेत. पेशव्यांच्या घराण्याचे हे कुलदैवत आहे. येथील सर्व मंदिरे खास कोकणी पद्धतीची उतरत्या छपरांची आहेत. हरिहरेश्वर क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाचे देऊळ ‘काळभैरवा’ चे आहे. बळीराजाकडून तीन पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरपासून सुरू झाले, अशी श्रद्धा आहे. अगस्ती मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करीत होते, तेव्हा हरिहरेश्वर येथील चार स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले, अशा दोन वेगवेगळ्या आख्यायिका या मंदिरात सांगितल्या जातात. अगस्ती ऋषीमुनींनी तिथे तपश्चर्या केली होती. श्री हरिहरेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात ब्रह्मा-विष्णू-महेश आणि पार्वतीचे स्थान आहे. काळभैरव मंदिर, महालक्ष्मी मंदिर, आदी हरिहरेश्वरच्या परिसरातील इतर मंदिरे आहेत. या मंदिराला शंकराचा आशीर्वाद आहे, असे म्हणतात.

हे मंदिर ‘ब्रह्मगिरी’, ‘विष्णूगिरी’, ‘शिवगिरी’, ‘पार्वती’ या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. या क्षेत्राच्या दक्षिण आणि उत्तर दिशेला बारा ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात ‘हरिस्वरूप’ व ‘हरस्वरुप’ या दोन्हींचा संगम झाला आहे. मंदिर जरी समुद्र किनाऱ्यावर असले, तरी प्रदक्षिणा मार्ग मात्र डोंगरावरून आहे. ‘सावित्री’ नदी जिथे अरबी समुद्राला मिळते, तेेथेच ‘हरिहरेश्वर’ नावाचे हे गाव आहे. नदीच्या दुसऱ्या तीरावर ‘श्रीवर्धन’ हे गाव आहे. ही दोन्ही गावे रायगड जिल्ह्यात येतात. हरिहरेश्वरला मुंबई-गोवा रस्त्यावरील ‘दासगाव’पासून फाटा फुटतो. श्रीवर्धनवरूनही होडीने हरिहरेश्वरला जाता येते.
कोकणपट्टीतील हे एक निसर्गरम्य स्थान आहे. हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी मंदिरे तसेच समुद्रकिनारी विष्णूपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णूतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे, अशी प्रथा येथे आहे. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यावर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकांवरून जातो. या मार्गावरील शे-दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर एक कोस असल्याने तिला ‘कोसाची प्रदक्षिणा’ असेही म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टीसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे.