पुन्हा एकदा तू तू मी मी

केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘तू तू मी मी’ हे सुपरहिट नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर आणण्याचा घाट सुपरस्टार भरत जाधव यांनी घातला आहे. इ. स. १९९८ साली हे नाटक प्रथम रंगभूमीवर आले. या नाटकाचे तेव्हा सुमारे १ हजार प्रयोग झाले होते. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांनी या नाटकात केलेल्या विविधरंगी भूमिका आता स्वत: भरत जाधव साकारताना दिसणार आहेत .

भरत यांच्या साथीला कमलाकर सातपुते, निखिल चव्हाण, रुचिरा जाधव, ऐश्वर्या शिंदे हे कलाकार असतील. दि.७ एप्रिल रोजी बोरिवली येथे या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग होणार आहे. सध्या या नाटकाच्या तालमी सुरू आहेत. मला एक नवीन नाटक करायचे होते. नव्याचा शोध घेताना काही नाटकांचे वाचन केले. पण त्यातून कुठलेही नाटक पसंतीस उतरले नाही. मग केदारने ‘तू तू मी मी’ हे नाटक पुन्हा करण्याविषयी सुचविल्यावर ते करण्याचा निर्णय घेतल्याचे अभिनेते भरत जाधव यांनी सांगितले.

शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर लवकरच सुरू होणारा सुट्ट्यांचा काळ आणि गुढीपाडव्याच्या आसपासचा मुहूर्त साधत नव्या वर्षात अनेक नवी नाटके मराठी रंगभूमीवर दाखल होत आहेत. उत्साही जोडी चमकवणारी, लोकप्रिय अभिनेते असणारी, त्याबरोबरच नव्या दमाचे कलाकार असलेली, यापूर्वी रंगभूमी गाजविलेली अशा नाटकांचा यात समावेश आहे. त्यामुळे नाट्यरसिकांसमोर भरपूर नाटकांचे पर्याय खुले होत असून, नाटकांचा हा नवा गोडवा अनुभवण्याची संधी त्यांना मिळेल.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *