काहीतरी वेगळे समाजाच्या गरजेचे
आजीच्या कल्पनेला प्रत्यक्षात साकारून दोन युवकांनी किमया करून दाखविली. मध्यप्रदेशातील इंदौरमधील पेशाने अभियंता असलेल्या या दोघांचा व्यवसाय कोरोनाकाळात मंदावला होता. याच काळात त्यांनी लोकांच्या आरोग्याशी निगडित असा एक उद्योग सुरू केला, ज्यातून त्यांची भरभराट झाली.
सुपात्र उपाध्याय आणि हरिओम यादव अशी या दोन अभियंता मित्रांची ही गोष्ट आहे. 81 वर्षीय राधा राणी दुबे यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली. राधा राणी या सुपात्रच्या आजी आहेत. कोरोनाची लागण झालेल्या या आजींनी दहा दिवसात आजारपणावर मात केली होती. याचे श्रेय त्यांनी पूर्वीच्या शुद्ध आहारपद्धतीला दिले होते. आज असे सकस पदार्थ मिळत नाहीत, असेही आजींनी बोलून दाखविले होते.
हाच धागा पकडत सुपात्र उपाध्याय आणि हरिओम यादव या दोघांच्या डोक्यात लोकांना ‘सकस अन्न’ उपलब्ध करून देण्याची कल्पना आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून शुद्ध नैसर्गिक खाद्यपदार्थ भारतातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदौरमध्ये आणण्याचा पण दोघांनी केला.

या दोन्ही मित्रांनी वर्षभर देशातील 16 राज्ये आणि 90 शहरांचा दौरा केला. यात त्यांनी अनेक शहरांमधून बाजरी, नाचणी, जवस, सुका मेवा, मसाल्यांसोबत 150 हून जास्त प्रमाणित शुद्ध उत्पादने निवडली. तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी करार करून ही उत्पादने इंदौरमध्ये आणली. त्यांनी प्रसिद्ध उत्पादनांच्या आधारे शहरांची निवड केली. जसे की मंगळुरूचा काजू प्रसिद्ध असल्याने त्यांनी काजू त्या शहरातून आणले. याच पद्धतीने नाशिकहून मनुका, काश्मीरमधून अक्रोड, कन्याकुमारीतून लवंग, राजस्थानमधून अश्वगंधा, तामिळनाडूतून वेलची आणि काळी मिरी आदी पदार्थ मागविले. त्याचबरोबर त्यांनी विविध राज्यांतून नाचणी, कंगणी, सनवा, कोडो, चेना अशी भरडधान्ये मागविली. छत्तीसगडहून तांदूळ मागविला.
उत्पादनाची ‘शुद्धता’ राखण्यासाठी त्यांनी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत थेट करार केले आणि अशा प्रकारे ‘रूट्स’ या कंपनीची सुरूवात झाली. रूट्स कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी 2019-20 मध्ये एक आरोग्यविषयक कंपनी सुरू केली होती. लोकांची जीवनशैली बदलण्याच्या उद्देशाने हा व्यवसाय सुरू केला होता.
यामध्ये ‘जिम बुकिंग’, ‘योगा बुकिंग’ आणि ‘प्रोटीन डाएट’ चा समावेश होता. यासाठी त्यांनी इंदौरमधील सुमारे 60 जिमशी करार केला होता; परंतु 5 लाख रुपये खर्चून उभा केलेला हा व्यवसाय कोरोनाच्या काळात बंद पडला
त्यानंतर या दोघांनी हा उद्योग पूर्णपणे बंद केला. भविष्यात असा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला जो कोणत्याही साथीच्या रोगामुळे बंद होणार नाही.
‘रूट्स’ची सुरुवात करण्यापूर्वी सकस अन्न कुठे मिळेल आणि ते इंदौरमध्ये कसे आणता येईल, यासाठी सुपात्र आणि हरिओमने 2021 मध्ये संशोधन करायला सुरुवात केली.

दोघांनीही पूर्ण नियोजन करून काश्मीरमधून सुरुवात केली. ते सांगतात, “आम्ही काश्मीरपासून सुरुवात करून महाराष्ट्रात पोहोचलो. तिथल्या सरकारच्या मदतीने आम्ही अस्सल सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोललो. आम्ही एक आराखडा तयार केला. गुजरातसह 16 राज्यांचा दौरा केला. प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांची उत्पादने इंदौरपर्यंत पोहोचतील याची तजवीज केली. एक पुरवठा साखळी तयार केली. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे सव्वा वर्ष लागले.”
ते सांगतात, “आमचे सुरुवातीचे नियोजन 25 ते 30 लाख रुपये होते; पण आत्तापर्यंत आम्ही त्यात 38 ते 40 लाख रुपयांची गुंतवणूक केली.”
आता दोघांनीही या व्यवसायातून नफा कमावण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे संकेतस्थळही लवकरच सुरू होईल.
ते सांगतात, “मागील चार महिन्यांपासून ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्रीतून आमचा निव्वळ नफा वाढत आहे. या वर्षाच्या अखेरीस महिन्याला 10 लाख रुपयांची विक्री आणि निव्वळ नफा तीन लाख रुपये होईल, असा आमचा अंदाज आहे.”
“रूट्स’चे सह संस्थापक हरिओम यादव सांगतात की, आजकाल तरुणांमध्ये हृदयाच्या झटक्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. आम्ही सकस अन्नावर भर देतो, कारण सेंद्रिय उत्पादने माती आणि शरीरासाठी हानिकारक मानल्या जाणार्या कीटकनाशकांपासून मुक्त असतात. ही उत्पादने भरपूर प्रमाणात पोषक असतात, ज्यामुळे शरीराला फायदा होतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.”
ते पुढे सांगतात, “जेवणात तेलाचा सर्वाधिक वापर होतो. सरकारी मार्गदर्शक नियमांनुसार यात 30 टक्क्यांपर्यंत पामतेल मिसळता येते. पण नेमके यात काय मिसळले जाते याची कोणालाच काही माहिती नसते.”
हरि ओम दावा करतात की, “आम्ही कच्च्या घाण्यावर जे तेल काढतो त्यात कोणत्याही प्रकारचे रसायन नसते. आम्ही शुद्ध तेलाचीच विक्री करतो. आम्ही स्वतः यापूर्वी रिफाइंड तेल वापरायचो, पण या गोष्टी समजून घेऊन आम्ही स्वतः शुद्ध तेलाचा वापर करायला सुरुवात केली आहे.”
या दोघांना अभियंता व्हायचे होते; पण कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नव्हती. समाजासाठी काहीतरी वेगळे आणि गरजेचे करायचे होते.”
त्यांच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या सेंद्रिय मालाला बाजारपेठ मिळाली.लोकांनाही सकस, पौष्टिक, रसायनमुक्त पदार्थ मिळू लागले.