वणीची सप्तशृंगी देवी

महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील ‘वणी’ येथील सप्तशृंगी माता ही ‘देवी भागवत’ तसेच ‘दुर्गा सप्तशती’ या दोन्ही ग्रंथात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक आहे. महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे.

बाकीची तीन म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका होय.  

‘सप्तशृंग’ हा गड नाशिकजवळील ‘नांदुरी’ गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांचे आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे.  या  १८ हातांच्या  जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. ‘सप्तशृंग’ गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘दरेगाव’ मध्ये उत्तम खवा मिळतो.   

ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या ‘गिरिजा’ महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मूळ स्थान आहे, असे मानले जाते. ही देवीची मूर्ती स्वयंभू आहे. येथील गाभाऱ्याला ‘शक्तिद्वार’, ‘सूर्यद्वार’ आणि ‘चंद्रद्वार’ असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजातून देवीचे दर्शन घडते.

या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रोत्सवही साजरा केला जातो. आईसमोरची सजावट फळे आणि भाज्यांनी केली जाते.

देवीची मूर्ती ९ फूट उंचीची आहे. ही मूर्ती शेंदुराने लिंपली आहे.  देवी सप्तशृंगीने प्रत्येक हातामध्ये वेगवेगळी आयुधे धारण केली आहेत. देवीला अकरा वार पैठणी  किंवा शालू प्रकारातील साडी लागते. चोळीला तीन वार खण लागतात. डोक्‍यावर सोन्याचा मुकुट, कर्णफुले, नथ आहे. तसेच गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्यांचे गाठले आहे. कंबरपट्टा, पायात तोडे असे अलंकार देवीच्या अंगावर घालण्यात येतात. हे स्थान  नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्‍यांच्या सरहद्दीवर आहे.  सह्याद्रीच्या पूर्व-पश्‍चिम डोंगररांगेत हे स्थान मोडते. सह्याद्रीच्या पठारावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे. येथे माकडांची भरपूर वस्ती आहे.  प्रदक्षिणा घालता येते; मात्र हा मार्ग खडतर आणि धोकादायक आहे. ‘नांदूर’ गावातून गडावर पायी जाण्यासाठी रस्ता आहे. पायी जाण्यासाठी अनेक भाविक येथून सुरुवात करतात. 

पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते पैठणी अथवा शालू नेसवून तिचा साजशृंगार केला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. बारा वाजता महानैवेद्य, आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते व मंदिराचे दरवाजे बंद होतात. देवीच्या पूजेचा मान ‘देशमुख’ आणि ‘दीक्षित’ या घराण्यांना आहे. नवरात्र आणि चैत्र पौर्णिमेला विशेष गर्दी असते. तशी पौर्णिमेलाही गडावर मोठी गर्दी होते. यांत भारतभरातून आलेले भाविक असतात. सप्तशृंगीचा नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो. सोबतीला चटणी, वरण, भात, भाजी पोळीही नैवेद्य म्हणून असते . पर्वताच्या शिखरावर चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील ध्वज फडकवतात. हा मान त्यांचा असतो. या ध्वजाची सवाद्य मिरवणूक निघते. हा ध्वज ११ मीटर लांबीचा असून केशरी रंगाचा असतो.

या मंदिरात जाण्यासाठी साधारण 472 पायऱ्या आहेत. या गडावर पाण्याची एकूण 108 कुंंडे असून यामुळे या प्राचीन आणि पुरातन मंदिराची सुंदरता अधिक वाढते. ‘महिषासुर’ राक्षसाच्या विनाशासाठी जेव्हा प्रार्थना करण्यात आली तेव्हा  सप्तश्रृंगी देवीने रूप धारण केले, अशी आख्यायिका आहे. सप्तश्रृंगीला ‘अर्धशक्तिपीठ’ मानण्यात येते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *