रसरशीत टोमॅटो
महाराष्ट्रात टोमॅटो लागवडीखाली अंदाजे 29,190 हेक्टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हे महाराष्ट्रातील टोमॅटो पिकविणारे महत्वाचे जिल्हे आहेत. खरीप, रब्बी, उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख फळपिक आहे. टोमॅटोमध्ये पोषक अन्नघटक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्व अनन्यसाधारण आहे. टोमॅटोत ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वे तसेच चुना, लोह इत्यादी पोषक अन्नद्रव्येही पुरेशा प्रमाणात असतात.
टोमॅटोची कच्ची अथवा लाल रसरशीत फळे भाजी किंवा कोशिंबीरीसाठी वापरली जातात. तसेच टोमॅटोच्या पिकलेल्या फळांपासून सुप, लोणचे, सॉस, केचप, जाम, ज्युस इत्यादी पदार्थ बनविता येतात. यामुळे टोमॅटोचे औद्योगिक महत्व वाढलेले आहे.

टोमॅटो हे उष्ण हवामानातील पिक असले तरीही महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. अति थंडी पडल्यास टोमॅटोच्या झाडाची वाढ खुंटते. तपमानातील चढउताराचा फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो.
टोमॅटो पिकासाठी मध्यम ते भारी जमिन लागवडीयोग्य असते. हलक्या जमिनीत फळे लवकर तयार होतात, पाण्याचा निचरा चांगला होतो; आणि पिकांची वाढ चांगली होते; परंतु अशा जमिनीत सेंद्रीय खतांचा भरपूर पुरवठा करावा लागतो. वारंवार पाणी देण्याची सोय असावी लागते.
‘पुसा रूबी’,’पुसा गौरव’,’पुसा शितल’,’अर्का गौरव’,’रोमा’ रूपाली, वैशाली, भाग्यश्री, अर्का विकास, पुसा अर्ली या टोमॅटोच्या काही जाती आहेत.
रोपे तयार करण्यासाठी बियांची पेरणी गादी वाफ्यावर करावी. गादी वाफा तयार करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या 2, 3 पाळ्या देऊन जमिन भुसभुशीत करावी. गादी वाफा हा 1 मी. रूंद, 3 मी लांब व 15 सेमी उंच असावा. रोपांच्या लागवडीनंतर 3 ते 4 दिवसांनी हलके पाणी द्यावे. त्यानंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.

जमिनीच्या मगदुराप्रमाणे पावसाळ्यात टोमॅटो पिकास 8 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हिवाळी हंगामात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने व उन्हाळी हंगामात 3 ते 4 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. भारी काळ्या जमिनीत नेहमी हलके पाणी द्यावे. पिकावर फुलधारणा झाली असताना व फळांची वाढ होत असताना नियमित पाणीपुरवठा होणे महत्वाचे आहे. अन्यथा फुलगळ, फळे तडकणे, यासारखे नुकसान संभवते. उन्हाळ्यात टोमॅटो पिकाला पारंपरिक पध्दतीने पाणी दिल्यास 77 हेक्टर सेमी पाणी लागते. ठिबक सिंचनाने पाणी दिल्यास 56 हेक्टर सेमी पाणी लागते. ठिबक सिंचनामुळे पाण्याची 50 ते 55 टक्के बचत होऊन उत्पन्नात 40 टक्के वाढ होते.
नियमित खुरपणी करून तण काढून टाकावेत. खुरपणी करताना मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी; जेणेकरून त्याचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होणार नाही.
‘करपा’, ‘भुरी’ हे टोमॅटो पिकास लागणारे रोग आहेत. टोमॅटोचे खोड व फांद्या कमकुवत असतात, त्यामुळे त्यांना आधाराची आवश्यकता असते. आधार दिल्यामुळे झाडांची आणि फांद्यांची वाढ चांगली होते. फळे भरपूर लागतात. फळे, पाने आणि फांद्या यांचा जमिनीशी व पाण्याशी संपर्क येत नाही. त्यामुळे फळे सडण्याचे आणि रोगाचे प्रमाण कमी होते. खते देणे, फवारणी करणे, फळांची तोडणी करणे इ. कामे सुलभतेने करता येतात.