धर्मादाय रुग्णालयातील आरोग्य योजना
राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब व निर्धन रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा माफक दरात मिळण्यासाठी योजना सुरु आहे. या योजनेअंतर्गत रुग्णालयांच्या एकूण क्षमतेपैकी १० टक्के वाटा निर्धन रुग्णांसाठी, आणखी १० टक्के वाटा आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या योजनेद्वारे निर्धन रुग्णांना मोफत, तर आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना एकूण बिलामध्ये निम्मी सवलत देणे बंधनकारक आहे.

येथे वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु. १ लाख ६० हजार किंवा त्यापेक्षा कमी असणाऱ्या रुग्णांच्या उपचारादरम्यान बिलामध्ये ५० टक्के सवलत देण्याची योजना धर्मादाय रुग्णालयांमध्ये होती. ती आता 3 लाख ६० हजार किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पात्र रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ घेता येणार आहे. उत्पनाची मर्यादा दाखवून उपचारांमध्ये सवलत नाकारणाऱ्या रुग्णालयांच्या मनमानीला आळा बसू शकणार आहे. विधी व न्याय विभागाने अधिसूचना जारी करून या वार्षिक उत्पन्न मर्यादेत बदल केले आहेत. यापूर्वी रु. ८५ हजार किंवा त्याच्या आतील उत्पन्न असणाऱ्या रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा होती, ती वाढवून रु.१ लाख ८० हजार किंवा त्यापेक्षा कमी केली आहे.

महाराष्ट्रातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन आणि गरीब रुग्णांसाठी 20 टक्के खाटा या राखीव असतात. त्यापैकी 10 टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी मोफत, तर 10 टक्के खाटा या गरीब रुग्णांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात असतात. राखीव ठेवलेल्या या खाटा आणि उपचार हा या गरीब-निर्धन रुग्णांचा हक्क आहे. जिथे ते कुणाकडूनही शिफारस न घेता सन्मानाने उपचार घेऊ शकतात. विशेष म्हणजे धर्मादाय आयुक्तालयाच्या https://charity.maharashtra.gov.in/mr-in/ या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध असते. प्रत्येक जिल्ह्यानुसार तिथल्या ट्रस्ट रुग्णालयांची यादी आणि उपलब्ध असणाऱ्या खाटांची संख्या पाहता येते. संबंधित जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्तांचे संपर्क दिलेले असतात. काहीही अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांना संपर्क करता येऊ शकतो.