त्रासदायक नात्यातून बाहेर पडताना

विवाहानंतर घटस्फोट होणे, प्रेमजीवनात अपयश येणे या घटना अलीकडे वाढू लागल्या आहेत. यामुळे नैराश्य येते. मानसिक तणाव वाढतो. जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीबरोबर नाते जुळवतो, तेव्हा सहवासाने हळुहळु आपण अपेक्षाही करू लागतो. अपेक्षाभंग होऊ लागला की वाद होऊ लागतात. तरीही हे नाते टिकविण्याचा खूपजण प्रयत्न करतात. काही वेळा असे घडते की समोरची व्यक्ती खूप हेकेखोर असते. त्या व्यक्तीमुळे आयुष्य खराब होते. अशा वेळी समोरच्या माणसाला काही कठोर निर्णय घेऊन त्या नात्यातून बाहेर पडावे लागते. जरी मनाला माहित असले की हे हेकेखोर नाते तोडणे आवश्यक होते, तरीही नाते तुटल्यावर अपयशी वाटू लागते; कारण माणसाला कायम एकटे राहण्याची भीती वाटत असते. या परिस्थितीला तोंड देणे खूप कठीण होऊन बसते. जीवनात पुढे जाण्यासाठी त्रासदायक नात्यातून बाहेर पडणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

स्वतःच्या भावनांना वेळ द्या. आपण नेहमी स्वतःच्या भावना स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे; कारण जर आपण त्या स्वीकारल्या नाहीत तर आयुष्यात पुढे जाणे कठीण होते. काहीवेळा भूतकाळाची आठवण झाल्याने वाईट वाटणे यात काहीही चुकीचे नाही; स्वतःच्या भावना व्यक्त करा. त्यांच्याबद्दल बोला आणि प्रामाणिक रहा. त्यांना लपविण्याची घाई केल्याने परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. स्वत: चे दुःख स्वीकारा आणि त्यापासून लांब पळणे टाळा. समाजमाध्यमांपासून लांब रहा. जेव्हा आपण एखाद्या वाईट गोष्टीतून बाहेर पडत असतो, अशा वेळी समाजमाध्यमांपासून लांब राहणे हा योग्य निर्णय आहे; कारण समाजमाध्यमावरील काही गोष्टी वाचून, बघून तुमच्या भावना दुखावू शकतात. त्यामुळे त्यापासून लांब राहणे शहाणपणाचे आहे.

स्वतःची काळजी घ्या. एखाद्या नात्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण जर तुम्हीच स्वतःची काळजी घेतली नाही तर इतर कोण घेईल? स्वतःच स्वतःची काळजी घेणे ही उपचारांची सर्वात महत्वाची पायरी आहे. विशेषत: या काळात मानसिक ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. म्हणून स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. चांगल्या आरोग्यासाठी योग्य पोषण आणि चांगली झोप मिळणे खूप महत्वाचे आहे. आवडेल ते पौष्टिक पदार्थ खा, फिरायला जा. जवळच्या मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवा. स्वत: चा आवडता छंद जोपासा. आवडत्या लोकांना भेटा. आपल्या आवडीची माणसे आपल्याबरोबर असली तर आपली मन:स्थिती सुधारण्यास मदत होते. आवडत्या लोकांबरोबर घालवलेले क्षण तुमचे मानसिक आरोग्य आणि शेवटी तुमचे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत करतील. आवडता छंद जोपासा. आपल्या सर्वांनाच कुठला ना कुठला छंद असतो. हे जीवनात पुढे नेणारे उपक्रम आहेत.


छंद पुन्हा नव्याने जोपासल्याने मानसिक आरोग्य सुधारेल. मग ते वाचन असो, पोहणे असो किंवा कुटुंबासोबत वेळ घालवणे असो. तुम्ही नवीन छंद जोपासू शकता; जेणेकरून तुमचा वेळ सकारात्मक पद्धतीने घालवता येईल. तुम्हाला नैराश्याचा त्रास होत असल्यास तज्ज्ञांची मदत घेतल्यास या परिस्थितीला सामोरे जाण्यास मदत होऊ शकते. हा बरे वाटण्याचा आणि समस्या सोडविण्याचा एक उत्तम मार्ग आहे. कोणतेही बंधन तोडणे सोपे नाही; पण तरीही भूतकाळ मागे सोडून पुढे जा.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *