विद्यार्थ्यांनी बनविली अंधांसाठी काठी
नाशिकच्या ‘इगतपुरी’ तालुक्यातील ‘महात्मा गांधी हायस्कूल’ मध्ये इयत्ता आठवी आणि नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अंध बांधवांसाठी एक काठी बनवली आहे. अशी काठी, जी चालत असताना समोर काही अडथळा आला, तर त्यांना लगेच कळेल आणि ते आपला मार्ग सुरक्षितपणे बदलतील. या शालेय विद्यार्थ्यांनी हा एक यशस्वी प्रयोग केला आहे. याचा फायदा अंध व्यक्तींना निश्चितच होणार आहे. अंध व्यक्तींसाठी ‘इलेक्ट्रॉनिक सेंन्सर’ असलेली काठी बनवल्यामुळे समोरचा अडथळा अंध बांधवांच्या लक्षात येईल. खरे तर, आपल्याला विश्वास बसणार नाही की शाळेतील मुले असे काही करू शकतील! परंतु हे खरे आहे. प्रथम विद्यार्थ्यांनी काठीची निर्मिती करायचे ठरविले. ही काठी काही दिवसांत तयार केली आहे. त्याला ‘ब्लाइंड स्टिक’ असे म्हटले जात आहे.

विद्यार्थ्यांनी पाईप, अल्ट्रासोनिक सेंन्सर, बझर, मायक्रो कंट्रोलर, आरडीनो बोर्ड, बॅटरी आदी सामानाचा वापर करून ही अत्याधुनिक काठी बनविली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांनी या अत्याधुनिक काठीचा यशस्वी प्रयोगदेखील आपल्याच शाळेत केला आहे. ‘आयओटी’ या प्रशिक्षणाच्या माध्यमातून या शालेय विद्यार्थ्यांना अत्याधुनिक वस्तू बनविण्याचे मार्गदर्शन केले जाते. हे प्रशिक्षण एक वर्षाचे असून यामध्ये विद्यार्थी नवनवीन वस्तू तयार करतात. त्यातीलच हा एक अंध बांधवांच्या उपयोगी येईल असा एक यशस्वी प्रयोग त्यांनी केला आहे. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी काठी तयार केली आहे. लवकरच या शाळेतील विद्यार्थी ‘स्मार्ट डस्ट बिन’, ‘स्मार्ट कार’ आणि ‘स्मार्ट संगणक’ बनविणार आहेत. त्यादिशेने विद्यार्थ्यांनी वस्तू बनविण्याचे काम सुरू केले आहे.

आजच्या डिजिटल युगात अत्याधुनिक वस्तूंचा आणि यंत्रांचा वापर अधिक वाढला आहे. त्यातच विद्यार्थ्यांना शाळेत मिळणाऱ्या अशा मार्गदर्शनाद्वारे आणि अशा प्रशिक्षणाच्या माध्यमातून भविष्यात नवनवीन लोकोपयोगी वस्तू बनविणे शक्य होणार आहे. ‘आदिवासी भाग’ म्हणून ओळख असलेल्या इगतपुरीतील विद्यार्थ्यांनी ही काठी तयार केली असून अंध व्यक्तींना मोठी मदत होणार आहे. हृदय बागल, प्रितेश भागडे, निखिल चव्हाण, जगदीश राक्षे, अनिल चौधरी, सुनील चौधरी, हर्षद भागडे, रोहित गांगुर्डे, जय शिंदे, अंकुश मोरे, सार्थक मुळीक, जयेश भागडे आणि वैभव पाटील या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.