
तांदूळवाडी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील एक गाव आहे. हे आदिवासीबहुल गाव ‘सफाळे’ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस ७ किमी अंतरावर वसलेले आहे. येथील ‘तांदूळवाडी किल्ला’ इतिहासाचा वारसा जपत उभा आहे, मात्र त्याला संवर्धनाची गरज आहे. या गावात शेतकरी तसेच जंगलात काम करणारे आदिवासी लोक वर्षानुवर्षे राहत आहेत. गावात प्राथमिक शाळा आहे. जवळच असलेल्या डोंगरावर हा ‘तांदूळवाडी’ किल्ला आहे. येथे पावसात भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. या भाज्या खोकला, पोटाचे विकार आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.
येथे जाण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या कोणत्याही स्थानकावरून डहाणू लोकल पकडावी आणि सफाळे स्थानकावर उतरावे. उतरताच बस थांबा कोठे आहे याची चौकशी करून पुढे जावे. जवळच बस थांबा असून तिथून एस टीने साधारण अर्ध्या तासाच्या आत तांदुळवाडी गावात पोहोचता येते. येथे उतरल्यावर एक शाळा लागते. तिथून पुढे गेल्यावर गाव संपताच पुढील मार्ग घनदाट जंगलातून जातो. पायऱ्या असल्याने मार्ग चुकण्याची शक्यता कमी असते. हा चढाव मंद व कमी थकवणारा आहे. एक तासानंतर एक पठार मिळते. तिथून डाव्या बाजूला गडावर जाण्यासाठी मार्ग आहे. हा मार्ग अतिशय अवघड नक्कीच नाही, पण तरीही जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. या किल्ल्याला तटबंदी नाही.

किल्ला पाहण्यास सुमारे 30 मिनिटे लागतात. गडाच्या पूर्वेला आणि पश्चिमेला खोल दरी आहे, त्यामुळे निसर्गानेच किल्ल्याला संरक्षण दिल्याचे लक्षात येते. हा किल्ला प्रामुख्याने जवळपासच्या ठिकाणांवर नजर ठेवण्यासाठी वापरला जात असावा. किल्ल्याच्या पूर्वेकडून ‘सूर्या’ आणि ‘वैतरणा’ नद्यांचा सुरेख संगम पाहता येतो. पुढे किल्ल्याला समांतर वाहत जाणाऱ्या ‘वैतरणा’ नदीचे दृश्यही फार सुखद आहे. या गडावर अनेक पाण्याच्या टाक्या आहेत. त्यातील एक पाण्याची टाकी प्रसिद्ध आहे.
उन्हाळ्यातही या टाकीत पुरेसे पाणी असते, हे आश्चर्य आहे. परंतु ते पाणी पिण्यास योग्य नाही. गडावर राहणाऱ्या लोकांच्या गरजा भागविण्यासाठी ती वापरली जात असावी. जल-साठवणुकीच्या तत्कालीन रचना आणि प्राचीन वास्तुकलेचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यांमध्ये वापरले जाणारे हे तंत्र विचार करण्यास प्रवृत्त करते. अन्य पाण्याच्या टाक्या भग्नावस्थेत आहेत, काही पार सुकल्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. येथूनच उजव्या बाजूकडील रस्त्याने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. या किल्ल्याला संवर्धनाची अतंत्य गरज आहे, हे सर्व पाहून लक्षात येते. सोबत पुरेसे पाणी ठेवावे, कारण या गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.