महाराष्ट्रातील चांदी व्यवसाय
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेला खामगाव हा एक सुप्रसिद्ध तालुका असून शुद्ध चांदीच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. या व्यवसायाच्या बळावर हे शहर खामगाव म्हणूनही छान विकसित झाले आहे. अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती खामगावात शुद्ध चांदीच्या खरेदीसाठी येतात. येथील चांदी व्यवसाय फार वर्षांपासून चालत आलेला आहे. तसेच खामगाव ही कापसाचीसुद्धा फार जुनी बाजारपेठ मानली जाते. येथील चांदी फार प्रसिद्ध आहे. खामगावची चांदी शुद्धतेमुळे प्रसिद्ध असल्यामुळे या शहराला ‘रजतनगरी’ म्हणूनही देशभरात ओळखले जाते.

वर्षभरातील शुभमुहूर्तावर या नगरीतून चांदीचे दागिनेच नव्हे, तर चांदीची भांडीसुद्धा ग्राहक खरेदी करून नेतात. खामगाव येथील चांदी देशभरात शुद्धतेसाठी प्रसिद्ध आहे. देशातील अनेक भागातील ग्राहक चांदी खरेदीसाठी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खामगावात येतात. अनेक मोठे नेते, अभिनेते, क्रिकेटपटू खामगावातील चांदी आवर्जून खरेदी करतात. या चांदीचे वैशिष्ट्यपूर्ण दागिने, मूर्त्या, भांडी येथील कारागीर सुबकतेने करतात. अभिनेता अमिताभ बच्चन ते क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या घरातील चांदीच्या मुर्त्यादेखील खामगावातील आहेत, हे विशेष ! येथील सराफा व्यावसायिक ही बाब अभिमानाने अधोरेखित करतात.
खामगावातील चांदीच्या मुर्त्यांना आणि भांड्यांना शुद्धतेमुळे जास्त लकाकी येते. अभिनेत्यांनासुद्धा या चांदीने भुरळ घातली आहे. देशभरातील नेते याठिकाणाहून चांदीची भांडी खरेदी करतात. काही ग्राहक तर मागील 40-50 वर्षापासून याठिकाणी दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी खरेदीसाठी येत असतात, असेही व्यापारी सांगतात.

खामगावच्या व्यावसायिकांनी जवळपास भारतातील ८०% चांदीची मंदिरे बांधण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. खामगाव देशभरात चांदी पाठवीत असते. दर महिन्याला जवळपास २५ हजार किलो चांदी खामगावातून वितरीत केली जाते. लाखो रुपयांच्या आगाऊ ‘ऑर्डर्स’ खामगावच्या सराफांकडे आलेल्या असतात. राजस्थान आणि बनारसमधील कारागिरांची ही हस्तकला आहे.
खामगावात हा चांदीचा व्यवसाय वाढत चालला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच तरुण या व्यवसायात येत आहेत. इस्रोच्या उपग्रह कार्यक्रमासाठीसुद्धा औद्योगिक चांदीचा पुरवठा खामगावातून केला जातो. लोकोमोटिव्हज, रेल्वे उत्पादक, इंजिन यामध्येसुद्धा खामगावच्या चांदीचा वापर केला जातो. चांदीची खाण असलेले खामगाव प्रसिद्धीच्या विळख्यात न पडता शांतपणे आपले काम करीत असते. भारताला चांदी पुरवून मोठी उलाढाल खामगावात केली जाते. महाराष्ट्रातील या गावात देशभरातील चांदीच्या मुर्त्यासुद्धा बनविल्या जातात. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही गर्वास्पद बाब आहे.
एकूणच, या चांदी व्यवसायाने येथे मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. येथील व्यावसायिक तो इमानेइतबारे करतात. मुळात, चांदीची शुद्धता कायमस्वरूपी टिकवून ठेवल्याने हा व्यवसाय एवढी वर्षे टिकून आहे. हेच कोणत्याही व्यवसायाच्या यशस्वितेचे खरे गमक आहे. आपल्या सेवेची, वस्तूची गुणवत्ता टिकवून ठेवणे, यासारखे अन्य सुत्र नाही!