बदक पालन
बदके पाळून त्यांची अंडी, मांस व पिसे विकण्याचा व्यवसाय बदक पालन व्यवसाय म्हणून ओळखला जातो. हा व्यवसाय भारतात पूर्वेकडील राज्यांमध्ये तसेच तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्या ठिकाणी कुक्कुटपालनास पोषक हवामान नाही, तेथे हा व्यवसाय करतात.

साधारणपणे समुद्र किनाऱ्यालगत किंवा ज्या भागात भाताचे पीक जास्त होते, अशा भरपूर पाऊस पडणाऱ्या भागामध्ये बदक पालन चांगले करता येते. अर्थात, कोकण हा भाग बदक पालनासाठी अनुकूल आहे. त्याचबरोबर चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यातही बदकपालन करायला काहीच हरकत नाही. तुलनात्मक विचार केल्यास बदकांना कोंबडीपेक्षा कमी खाद्य लागते. बदकाचे पालन पिंजऱ्यात न करता साचवलेल्या पाण्यात केले जात असल्यामुळे त्यांना पाण्यातच बरेचसे खाद्य सापडते. बदकाची मादी कोंबडीपेक्षा वर्षाला ४० ते ५० अंडी जास्त देते. शिवाय बदकाचे अंडे कोंबडीच्या अंड्यापेक्षा १५ ते २० ग्रॅम जास्त वजनदार असते. त्यामध्ये कोंबडीच्या अंड्यापेक्षा अधिक पोषकद्रव्ये असतात.
बदके सकाळी 8 वाजेपर्यंत अंडी घालतात. त्यामुळे वेळ आणि मजुरीवरील खर्च कमी होतो. बदक पालनासाठी मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे. बदक पालनासाठी जवळ नदी, नाला, छोटे तलाव किंवा सरोवर असले तर उत्तमच, अन्यथा सहा फुट व्यासाच्या व 15 इंच खोलीच्या पाण्याने भरलेल्या कृत्रिम टाक्यांचा वापर करता येईल. बदकांची घरे बांधताना ती उंच, हवेशीर असावीत. घरापुढे मोकळे तारेचे कुंपण असावे. बदकांच्या खाद्यात प्रथिनांचे प्रमाण 16 ग्रॅम तर ऊर्जेचे प्रमाण 2700 कॅलरीज असावे. पाण्याचा हौद किंवा लहान सरोवर असल्यास खाद्यावरील खर्च बऱ्याच प्रमाणात कमी केला जाऊ शकतो. बदकांचे खाद्य थोड्या प्रमाणात बनवून त्यांना वेळेवर ओले करून किंवा कोरडे खाऊ घालावे. बदकांना बुरशीमुळे विषबाधा फार लवकर होते; व त्यामुळे बदकांचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण वाढते. म्हणून बुरशी येणारे खाद्यपदार्थ, मका व शेंगदाणे यांचा वापर न करता त्याऐवजी गहू, ज्वारी आणि सोयाबीन वापरावेत.

नियमित पाणी पुरवठा, हिरवे गवत यांची उपलब्धता असावी. बदकांच्या पिल्लांचे संगोपन काळजीपूर्वक करावे लागते. त्यांच्या वाढीच्या काळामध्ये विशिष्ट तापमान असणे आवश्यक असते. पहिल्या महिन्यामध्ये ते २८ ते ३२ अंश सेल्सियस असावे. नंतरच्या काळात ते हळुहळु कमी केले तरी चालते. बदकांचे संगोपन ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. बदकांची अंडी उबवणी कृत्रिम व नैसर्गिक पद्धतीने केली जाते. पहिले चार आठवडे पिल्लांची काळजी घेणे जरूरी आहे. तीन ते चार आठवड्यानंतर जर वातावरण अनुकूल असेल तर मोकळ्या जागेत सोडण्यास हरकत नाही. आवर्जून स्वच्छता ठेवावी. बद्कांवर योग्य औषधोपचार पशुवैद्यकाकडून करून घ्यावेत.