विषमुक्त आहारासाठी नैसर्गिक शेती
आजकाल प्रत्येकाच्या तोंडी तब्बेतीच्या काही ना काही तक्रारी असतात. गेली साठ दशके शेतीत होत असलेल्या रासायनिक खते आणि किटकनाशकांच्या वापरामुळे आपल्या संपूर्ण सजीव सृष्टीवर, मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाले आहेत. यासाठी या रसायनांचा वापर कमीच नाही, तर बंद करून पूर्वीप्रमाणे शेती करण्याकडे आता शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. कोणत्याही रसायन आणि किटकनाशकांशिवाय भरघोस पीक घेता येते हे सिद्ध झाल्यावर आता विषमुक्त अन्नधान्य पिकवली जाऊ लागली आहेत, यातील एका प्रकाराला ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ म्हणतात.

जंगलांमध्ये कोणी रसायने टाकायला जात नसूनही तिथे दाटीवाटीने उभी असणारी झाडे कशी काय उगवतात आणि तगून राहतात बरे? ह्याच विचाराने नैसर्गिक शेतीच्या संकल्पनेचा जन्म झाला. भारतात रासायनिक शेतीचा प्रवेश झाला तो दुष्काळात भरडल्या जाणाऱ्या देशवासियांना अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा करता यावा या उद्देशाने सुरु केलेल्या हरित क्रांतीने. १९६८ साली शेती विशेषज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांच्या मार्गदर्शनात इंदिरा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांनी हरित क्रांतीची नांदी केली. तंत्रज्ञानाच्या मदतीने बनलेली ‘हायब्रीड’ म्हणजेच संकरीत बियाणी, आधुनिक सिंचन पद्धती, नवी अवजारे, रासायनिक खते, किटकनाशकांचा प्रवेश शेतात झाला आणि रसायनांनी आपल्या सृष्टीचक्रात, अन्नचक्रात आणि शरीरात प्रवेश केला. वंदना शिवा यांच्यासारख्या पर्यावरण तज्ज्ञांनी हे दूरगामी दुष्परिणाम लक्षात आणून दिले, पण त्याला ना सरकारकडून प्रतिसाद मिळाला, ना श्रीमंत होत असलेल्या मोठ्या शेतकऱ्यांकडून.
शेतीत उत्पन्न कमी आले, तर ते अधिक यावे म्हणून अधिक रसायने टाकण्याचा सल्ला रासायनिक शेती तज्ज्ञ देऊ लागले आणि शेतकरी त्याचे वर्षोनुवर्षे पालन करत असल्यामुळे जमिनीचा पोत आणि उत्पादन क्षमता घटली. परिणामी, अतिरिक्त रसायनांच्या माऱ्याने शेतजमीन अधिक नापीक बनत गेली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेतीच सोडली, तर काहींनी पिकांसाठी आणलेले किटकनाशक पिऊन हे जगच सोडले! आज मात्र नैसर्गिक शेतीतील संशोधनाने उपभोक्ते आणि शेतकऱ्यांची उमेद वाढली आहे.
जपानमधील मसानोबू फुकूओका यांनी शोधलेली ही पद्धत भारतात सुभाष पाळेकर यांनी ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ म्हणून विकसित केली. पाळेकर यांनी कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात त्यांनी लाखो शेतकऱ्यांच्या मार्फत यशस्वी प्रयोग करून दाखवले. ह्या शेतीत महागडी संकरीत बियाणी, रसायने आणि किटकनाशके वापरली जात नाहीत. म्हणून पाळेकरांनी याला ‘झिरो बजेट नैसर्गिक शेती’ असे नाव दिले. पुढे पाळेकरांनी ह्या शेतीला ‘सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती’ किंवा ‘विषमुक्त शेती’ असे नाव दिले आहे.
ही विषमुक्त नैसर्गिक शेती चार गोष्टींवर आधारित आहे. ते म्हणजे जीवामृत, बीजामृत, आच्छादन आणि वाफसा.

जीवामृत : यामध्ये पाणी, शेण, गोमूत्र, गूळ किंवा उसाचा रस, पिकलेल्या फळांचा लगदा, कोणत्याही डाळीचे पीठ आणि शेतातील रसायनमुक्त माती यांचा समावेश होतो. शेतीत सर्वात महत्त्वाचे काम आहे ते जमिनीतील जीवाणूंचे. पिकांच्या वृद्धीसाठी आवश्यक असलेले नायट्रोजन वातावरणातून आणि मातीतून मिळते. मूळ स्वरूपातील नायट्रोजन वनस्पतीची मुळे शोषून घेत नाहीत. जमिनीतील जीवाणू ह्या नायट्रोजनचे रुपांतर नायट्रेटमध्ये करतात जे वनस्पती शोषून घेतात आणि त्यांची वाढ होते. ह्या जीवाणूंची वाढ होण्यासाठीच आपल्याला शेतात जीवामृत टाकावे लागते.
बीजामृत : हे करण्यासाठी पाणी, शेण, गोमुत्र, कडुलिंबाची पाने, चुना आणि शेतातील रसायनमुक्त मुठभर माती ह्या मिश्रणाचा उपयोग कीटक व्यवस्थापनासाठी केला जातो. शिवाय यांचा वापर बियांवर उपचार करण्यासाठीही होतो म्हणून याला ‘बीजामृत’ म्हणतात.
आच्छादन : हे आच्छादन गवत आणि पालापाचोळ्याचे असते. ह्यामुळे शेतांच्या मुळांशी आर्द्रता टिकून राहते. जीवाणूंना पुरेशी हवा, तापमान आणि फिरण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आच्छादन टाकावे लागतं.
वाफसा : मातीच्या दोन कणांमधील पोकळ्यांमध्ये पाण्याऐवजी 50% हवा आणि 50% वाफ असावी लागते. हे करण्यासाठी एखाद्या वनस्पतीला पाणी घालण्याची पद्धत म्हणजे वाफसा. दुपारी बारा वाजता वनस्पतीची सावली जिथे पडते त्यांच्या सीमेवर आवश्यक मात्रेत पाणी द्यावे. यामुळे तिथे पसरलेली मुळं पाणी शोषून घेतात आणि त्यांच्यात वाफ आणि हवेचे संतुलन रहाते.
ह्या प्रकारांनी केलेल्या शेतीत आंतर पिके घेतली जातात. शेतीमध्येच वेगवेगळ्या वृक्षांची लागवड केली जाते. यामुळे संपूर्ण वर्षभर शेत पिकांनी अच्छादालेले असते. एका जमिनीत एकच एक पीक न घेता मिश्र शेती केली जाते. अशा प्रकारे पूर्णपणे पिकांच्या मुळांचा आणि शेतीत सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाच्या स्वभावाचा विचार करून ही पद्धत विकसित केली गेली आहे. आपल्याला जर या प्रकारे कोणतीही लागवड करायची असेल, तर नीट अभ्यास करावा. योग्य पद्धतीने ही शेती केल्याने केवळ अन्नच विषमुक्त होणार नाही, तर शेती सुद्धा सुजलाम सुफलाम होईल.