पूर्णगड किल्ला

भारतातील महाराष्ट्र राज्यात रत्‍नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण सागरकिनाऱ्यावर वसलेले आहे. येथे पावस हे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र असून येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे. पूर्णगड किल्ल्याच्या दाराजवळ प्राचीन मारुती मंदिर आहे. या मंदिरास गावकऱ्यांनी रंग देऊन सुशोभित केले आहे. या मंदिराजवळ पूर्णगडाचे प्रवेशद्वार असून त्यावर श्री गणेश तसेच चंद्र-सूर्याची शिल्पे आहेत.

प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. येथे दगडामध्ये कोरलेली सुंदर कमळे पहायला मिळतात. तटबंदीवर चढण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग असून तटबंदीवरून गडाची पूर्ण फेरी करता येते. किल्ल्याच्या पश्चिम भागाकडील तटबंदीचा काही भाग पडलेला आहे. इतर तटबंदी काळ्या पाषाणातील असून अजूनही भक्कम आहे. किल्ल्याला पश्चिमेकडे लहानसा दिंडी दरवाजा आहे.

या गडावर अनेक अवशेष पहायला मिळतात. अर्ध्या तासात आयताकृती पूर्णगड फिरून पूर्ण होतो. या किल्ल्यावर राहण्याची सोय उपलब्ध नाही. येथून पूर्णगड हे जवळचे गाव असून येथे निवासाची सोय उपलब्ध आहे. पूर्णगडावर पाण्याची सोय नाही. त्यामुळे येथे जाताना सोबत पाणी न्यावे. पूर्वी गडाबाहेरील विहिरीतून गडावर पाणीपुरवठा केला जात असे. काहींच्या मते, छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावरील कामानंतर किल्लेबांधणीचे काम थांबविले असावे, म्हणून याला ‘पूर्णगड’ नाव पडले. या किल्ल्यावर १० ते १५ मिनिटांत चढता येते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *