वांगी
भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली वांगी लोकप्रिय भाजीपाल्यातील एक पीक आहे. वांगी प्रामुख्याने गोल, लांब-सडपातळ व ठेंगणी, जाड आणि मोठी अशा विविध प्रकारात आढळतात. आयुर्वेदात वांगे हे मधुमेह, रक्तदाब आणि वजन कमी करण्यासाठी गुणकारी असल्याचे मानले जाते.

लोकसंगीत, म्हणी, वाक्प्रचारातसुद्धा वांगी आढळतात. भारतात सुमारे ५.५ लाख हेक्टर जमिनीत वांग्याचे पीक घेतले जाते. चीननंतर भारत हा सर्वात मोठा वांगी उत्पादक देश आहे.
कोरड्या आणि उष्ण हवामानामध्ये वांग्याची वाढ चांगली होते. ढगाळ हवामान व एकसारखा पाऊस वांगी पिकाला मानवत नाही. सरासरी 13 ते 21 सेल्सिअस तापमानाला वांग्याचे पीक चांगले येते. सर्व प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत वांग्याेचे पीक घेता येते; परंतु सुपीक चांगला पाण्याेचा निचरा होणाऱ्या मध्यम काळ्या जमिनीमध्ये वांग्याचे झाड जोमाने वाढते. वांग्याची लागवड तीनही हंगामात करता येते.
जगातील एकूण उत्पादनापैकी २.६ टक्के वांगी भारतात होतात. देशात सर्व प्रांतात वांगी पिकवली जातात. हिरव्या व जांभळ्या रंगाची वांगी भाजीमंडईत मुबलक प्रमाणात असतात.
वांग्यामध्ये प्रामुख्याने काळी व पांढरी असे दोन प्रकार आहेत. काळी वांगी अधिक गुणकारी असतात. जेवढी कोवळी तेवढी ती अधिक गुणयुक्त व शक्तिवर्धक मानली जातात. कफ प्रकृतीच्या व समप्रकृतीच्या लोकांनीही हिवाळ्यात वांग्याचे सेवन करणे, गुणकारी ठरते. लहान कोवळे वांगे कफ व पित्तनाशक असते.

वांगी या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर खरीप, रब्बी हंगामात आणि उन्हाळ्यातही करता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्र पीक म्हणूनही वांग्याची लागवड करतात. आहारात भाजी, भरीत, भजी, भात इत्यादी अनेक प्रकारे वांग्याचा उपयोग होतो. वांग्याीमध्ये खनिजे, जीवनसत्वे तसेच लोह, प्रथिने यांचे प्रमाण पुरेसे असते. मांजरी , गोटा, वैशाली, प्रगती, अरूणा या काही वांग्याच्या जाती आहेत. रोप लावणीनंतर 10 ते 12 आठवड्यांनी फळे तयार होतात. फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी. फार कोवळी फळे काढल्यास उत्पादनात घट येते. तसेच जून फळे गिऱ्हाईकांच्या पसंतीस उतरत नाहीत. 4 ते 5 दिवसांच्या अंतराने 10 ते 12 वेळा वांग्याची तोडणी करता येते. वांग्याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते.
वांगी पिकाचे सरासरी हेक्टरी उत्पादन 100 ते 250 क्विंटलपर्यंत मिळते.
कोवळी वांगी विस्तवावर भाजून मधात कालवून संध्याकाळी चाटून खाल्ल्याने झोप चांगली येते. वांग्याची भाजी खाल्ल्याने लघवीचे प्रमाण वाढते व मूत्रमार्गातील मुतखडा विरघळून जाण्यासाठी मदत होते.